पत्र...
पत्र...
प्रिय मित्रा,
तुला तुझ्या वाढदिसाच्या खूप खूप शुभेच्छा! मी तोच जो तुला जन्मोजन्मीच्या मैत्रीचे वचन देऊन तुला काही वर्षातच सोडून निघून गेला. मी तुझ्याशी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी मी त्याचे परिणाम काय होतील ह्याचा विचार करुन बोलने टाळले. पण मला आज ह्या पत्रातुन खुप काही बोलायच आहे. आपण लहानपणी एका छोट्याश्या चाळीत राहायचो. मला अजूनही आठवतंय तू कधीही माझ्याशिवाय खेळायला जायचा नाहीस. मला माझे बाबा खेळायला पाठवण्यासाठी नकार द्यायचे तेव्हा तू त्यांना समजवायचा आणि मला खेळायला सोबत घेऊन जायचा. बॅट तुझी असली तरीही बॅटिंग मात्र सर्वांत आधी मीच करायचो. अगदी कोणचा वाढदिवस असो किंवा कोठे फिरायला जायचा असो आपण नेहमी सोबतच जायचो. जिथे तू नाही तिथे मी ही नाही.
तुला आठवत का होळीला मी चुकून बाजूच्या चाळीतल्या राजूला पाण्याचा फुगा मारला, तर त्याने मला मारला. तेव्हा तू तेथे नव्हतास. जेव्हा तुला हे समजला तेव्हा तू धावत जाऊन त्या राजूला एक कानाखाली पेटवून दिलीस आणि त्याला म्हणालास, "आज फक्त कानाखालीच मारली आहे पुन्हा हात लावलास तर..." खरंच तू माझ्यासाठी काहीही करायला तयार होतास. मात्र मी काय केला! तुला मैत्रीच्या वाटेवर एकटाच सोडून निघून गेलो.😔
दिवाळीला मी आणलेल्या फटाक्यांवर तुझा पूर्णपणे हक्क असायचा.एकदा तर मी लावलेला रॉकेट मेडिकलमध्ये गेला. तेव्हा मला ओरडा पडू नये म्हणून तो रॉकेट तू लावलेलास असा सांगितला आणि मला धमकी दिलीस की, "तू जर खरं सांगितलंस तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही." त्या क्षणीच तुझे बाबादेखील तिथे आले. त्यांना सगळी हकीकत समजल्यावर ते तुला मारत मारत घरी घेऊन गेले. माझ्यामुळे तुला विनाकारण मिळत असलेली शिक्षा पाहून मला रडू येत होते. खरंच तू माझा खरा मित्र होतास. मात्र मी काय केलं! तुला जीवनाच्या खडतर प्रवासात एकटा सोडून निघून गेलो.
मला माझ्या काही जवळच्या व्यक्तींनी असे सांगितले की, "तू चुकीच्या संगतीत आहेस." मला हे ऐकून फार वाईट वाटले. माझ्या मनात खूप विचार येऊ लागले. मी ठरवले की आजपासून तुझ्याशी मैत्री तोडायची. त्यावेळी माझ्या मनात तू माझ्यासाठी जे काही केलंस ह्याचा एकदाही विचार नाही आला. मी तुला काहीही न सांगता तुझ्यापासून दूर गेलो. तू मला खूप समजावण्याचा प्रयत्न केलास मात्र मला त्यावेळी काहीच समजत नव्हते. तेव्हा तू एका शब्दानेही मला तू माझ्यासाठी काय काय केलेस ह्याची जाणीव करून नाही दिलीस. मात्र काही दिवसांनी मला कळाले की ती व्यक्ती चुकीची होती आणि मी घेतलेला निर्णयही चुकीचा होता. पण तेव्हा मात्र वेळ निघून गेली होती. कारण आपल्या दोघांचेही मार्ग आता वेगवेगळे होते.
जमलंच तर मला माफ कर. मी तुला खूप वेदना दिल्या, तुला तुझ्या मैत्रीचे फळ अशा स्वरुपात दिले. पण तू पुन्हा माझ्या आयुष्यात यावे, अशी माझी खूप इच्छा आहे. एकदा तुटलेली मैत्री पुन्हा कधीच भक्कम होऊ शकत नाही, असे लोक म्हणतात. मात्र मला खात्री आहे, आपण पुन्हा एकदा चांगले मित्र होऊ.
तुझाच मित्र
शुभांकर