पर्यावरण - ऱ्हास व परिणाम
पर्यावरण - ऱ्हास व परिणाम
आजकाल वेगळेच वातावरण अनुभवायला येते. पावसाळ्यात सुद्धा उकाडा जाणवतो. थंडीच्या दिवसात कडाक्याची थंडी केव्हा आली, केव्हा येणार यांची स्मृती जाणवावी लागते. उन्हाळा हा बारमाही असतो. आपले पर्यावरण निसर्गनियमाचे काटेकोर पालन करण्यावर अवलंबून आहे. मनुष्य ही या जगातील सर्वात मोठी निर्मिती आहे. योग्य अयोग्य याचा विचार करण्याची क्षमता मनुष्याकडे आहे. संवर्धन की संहार यावरच पर्यावरणाचे संरक्षण अधोरेखित आहे.
जगाची वाटणी श्रीमंत देश आणि अविकसित गरीब देश अशी दोन गटांमध्ये करण्यात आली आहे. विकसित देश साधन संपत्तीचा वापर दरडोई खूपच जास्त करतात, परंतु तेथील लोकसंख्या मर्यादित आहे. याउलट अविकसित देशामध्ये गरिबी आणि मोठी लोकसंख्या यामुळं नैसर्गिक साधन संपत्ती कमी वापरून ही पर्यावरणाचा ऱ्हास जास्त होत आहे. पर्यावरण रक्षण कि गरिबी निर्मूलन ह्या दुहेरी पेचात देश सापडले आहेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी औद्योगिकीकरण, वाढत्या लोकसंख्येसाठी जंगलतोड व शेती आणि निसर्गसंपदाच पैसे मिळवण्याचे साधन झाल्याने या देशात पर्यावरण रक्षणाचे काम अधिकच बिकट बनले आहे. माणसांच्या गरजा सुद्धा वाढल्याने विकासाचा वेगही तितकाच वाढण्यावाची धडपड सर्वत्र चालली आहे. मात्र हा विकास करत असताना विकासाच्या पुढील संधी सुद्धा माणूस नाहिशा तर करून टाकीत नाही ना? ह्याचा विचार सुद्धा माणूस फारसा करताना दिसत नाही. आजची गरज भागली म्हणजे झाले. उद्याचे कोणी बघितले आहे? असे जर का माणसाने ठरवले तर ते पर्यावरणास खूप घातक ठरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यास जमीन चांगली ठेवण्यास पिकांची फेरपालट घ्यावी, रासायनिक आणि खतांचा कमी वापर, परंतु जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी दुसरी पिके घ्यावी असे कितीवेळा जरी सांगितले, तरीसुद्धा ते पाळले जात नाही. जमीन नापीक होते आहे हे दिसत असताना सुद्धा त्यागोष्टीकडे फारसे लक्ष देण्यात येत नाही. त्वरित लाभ मिळवण्याच्या हव्यासापोटी दूरदर्शी योजनेकडे दुर्लक्ष होते. जे शेतकऱ्याचे तेच उद्योगधंद्याचे. जुन्या गाडयांमुळे भरपूर प्रदूषण होते.त्यामुळे त्यांच्या वापरास बंदी किंवा पेट्रोल, डिझेल ऐवजी प्रदुषणरहित इंधनाचा वापर याची कायद्याने सक्ती केली तरी त्याची अंमलबजावणी करणे कठीण होते.
कारखान्यातून बाहेर पडणारा धूर व वाहनांतून पेट्रोल जाळण्याने निर्माण होणार दूषित वायू, शिसे व काजळी ह्याने हवा खूप प्रदूषित होत आहे. उद्योगधंदे आणि शहरांच्या सांडपाण्यामुळे जमिनीवरील नदी, तलाव ह्याचे पाणी दूषित होत आहे. शिवाय जमिनीखाली असणारे पाणी सुद्धा दूषित होत आहेत. शेतीसाठी वापरली जाणारी रासायनिक खते पाणीप्रदूषणास कारणीभूत तर आहेच. शेतीसाठी अतिरिक्त पाणी वापरल्याने क्षार वाढून जमीन नापीक होण्याचे प्रमाण तर वाढलेच आहे. पायाभूत विकासासाठी होणारे प्रकल्प सुद्धा आज पर्यावरणाच्या समस्या बनत आहेत. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी विकास थांबवा म्हटले तर वाढत्या गरजा भागविणे अवघड होणार आणि विकास केला तर पर्यावरण प्रदूषित होणार. कोणताही विकास प्रकल्प उभा करायचा तर पर्यावरणात बदल होणे कर्मप्राप्त आहे.
अगदी आपल्या घरांपासून आपण पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो. यासाठी अगदी लहान उपाय करावे लागतील. जर जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करून वाढते कार्बनडाय ऑक्सडाईड कमी करून ओक्ससिजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामानातील फरक लक्षात घेता शीतगृहातून निघणाऱ्या क्लोरो-प्लॉरो कार्बन वायूचे प्रमाण कमी करणे खूप आवश्यक आहे. कचऱ्याचा व्यवस्थित विल्हेवाट लावणे, घातक वायूगळतील आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे. पर्यावरण व प्रदूषणासंदर्भात केंद्र सरकारने घातलेलं नियम काटेकोर पाळणे हे सर्वासाठी बंधनकारक आहे आणि ह्या प्रकारचे वेग-वेगळे उपक्रम राबवल्यास आपण खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशने नक्कीच वाटचाल करू यात शंका नाही. आपला देश सर्व क्षेत्रांत प्रगतीपथावर असताना पर्यावरणाकडे कानाडोळा करून अजिबात चालणार नाही.
