मित्रांसोबत एक दिवस
मित्रांसोबत एक दिवस
आपण सगळेच जण पूर्व प्लॅनिंगने कुठेतरी भेटायचे ठरवतो व नंतर सगळा लवाजमा घेऊन पिकनिक स्पॉटवर जातो. हे सगळे ठरवून केल्याने त्याला एवढा आनंद लाभत नाही जेवढा कधी अचानक सहज भेट घडून आल्यावर होतो. सगळे मित्र जमू शकले नसले तरी चार पाच जण भेटलो तरी खूप धमाल येते आणि विस्मरणीय होते. आता आठवलं तरी त्याचे नवल वाटते.
त्याचं काय झालं, एकदा मी दोघा मैत्रिणीं बरोबर गोवा फिरायला गेले होते. जास्त फिरण्या पेक्षा मंदिर परिसरातच आम्हाला वेळ घालवायचा होता म्हणून तिथे रहायला देवालयाचीच खोली घेतली. माझं शालेय शिक्षण गोव्यालाच झालं होतं. पण अकरावी नंतर घर सोडलं व पुढील शिक्षणास मुंबई गाठली. मध्ये कधी गेले तर एका दोघांची भेट व्हायची पण वर्ग मित्र मैत्रिणी सगळे काही भेटत नव्हते. एक दोनंच संपर्कात होते.
पण गेल्या वेळी असा योग जुळून आला की ध्यानी मनी नसताना वर्ग मित्र मैत्रिणींची भेट घडली. गोव्याला पोचल्याच्या तिसऱ्या दिवशी मी माझ्या शाळेच्या खास मैत्रिणिला फोन लावून मी आल्याचे कळवले व तिला भेटायला रुमवर बोलावले. तिने ही बाकीचे वर्ग मित्र आहेत त्यांना ही घेऊन येते म्हणून निरोप पाठवला व लगेच आले ही.
प्रत्येक जण काही ना काही घेऊन आले होते. त्याचा स्वाद घेता घेता गप्पा एवढ्या रंगल्या की शालेय जीवनातले शिक्षक, सहपाठी, तेव्हा शाळेत घडलेल्या काही गमतीशीर तर काही कडू आठवणींना उजाळा मिळाला. पुन्हा एकदा बालपण व शालेय जीवन जगल्याचा आनंद प्राप्त झाला.
नंतर आम्ही सर्वजणांनी आमच्या शाळेला भेट द्यायचं ठरवलं. परवानगी घेऊन आम्ही आत शिरलो. एवढ्या वर्षांनी मी शाळेच्या आवारात आणि इमारतीत शिरत होते. तेव्हा असेच वाटले जणू मी माझ्या आईलाच भेटायला आलेय. आईला भेटल्यावर जसा आनंद होतो आणि हृदय भरून येतं तसच मला झालं होतं. माझ्या वर्ग मित्र मैत्रिणींचे मला माहीत नाही. ते जवळ पास राहत असल्याने किंवा जाता येता शाळा नजरेत येत असल्याने म्हणा त्यांच्या चेहऱ्यावर एवढा उत्साह दिसत नव्हता जेवढा माझा आनंद ऊतू जात होता. एका मजल्यावरून दुसऱ्यावर जाताना, जिने चढत असताना, मला खरंच मी लहान होऊन शाळेचा गणवेश घालून चढते आहे असा भास झाला. आणि वरच्या मजल्यावर तर अक्षरशाः मला माझे सगळे गुरूजन, मुख्याध्यापक, शिपाई सर्वच्या सर्व चित्र डोळ्या समोर तरळले आणि आनंदाने उचंबळून आले. मी काही शिक्षिका शिकवत होत्या त्या वर्गात ही डोकावले. स्टाफला भेटून ओळख सांगितली. त्यांना ही खूप बरे वाटले. शाळा संपूर्ण बघितल्यावर मी कवायतीच्या मैदानाला ही भेट दिली. तेथे ही आमचे पी. टी. शिक्षकांचा मला भास झाला. एवढ्या सगळ्या शालेय आठवणी घेऊन आम्ही बाहेर आलो.
नंतर सगळे जण एका मस्त हॉटेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या मेनूचा स्वाद घेत त्याच्या जोडीला एकमेकांच्या घरच्या, मुलांच्या गप्पा गोष्टी केल्या. वेळ कशी सरली कळलेच नाही. आम्ही तेथेच थांबणार होतो पण बाकिच्यांना आप आपल्या घरी जायचं होतं. निरोप घेताना शाळेच्या शेवटच्या दिवसाची आठवण झाली पण सगळ्यांनी एकमेकांच्या संपर्कात रहायचे व लगेच पुन्हा आणखी वर्ग मित्रांना घेऊन भेटायचे आश्वासन दिले आणि आम्ही खोलीवर परतलो. त्या दिवसाचा अमूल्य ठेवा आठवतच मी शांत झोपी गेले.
