मानवी जीवनाचा थांगपत्ता नाही
मानवी जीवनाचा थांगपत्ता नाही
आपल्याला जीवन जगण्यासाठी नको त्या उठाठेवी कराव्या लागतात. कोणता माणूस आयुष्यात कसा वागेल याचा नेम सांगता येत नाही. काल परवा बरा असणारा, चांगला असणारा माणूस आज पैशाच्या मोहामुळे बिघडलेला आपल्याला पहायला मिळत आहे. माणसाला सुखी, समृद्ध व श्रीमंत होण्याची फार हौस असते तशी प्रत्येकाचीच धडपड चालू असते. हे काही चुकीचे नाही. परंतु कमी वेळात खूप पैसा मिळवावा आणि त्या पैशाचा दुरुपयोग करून भविष्यातील पिढयान पिढया आपल्याला बसून खाता येईल याचे आराखडे माणूस बांधत असतो. एकदा राजकारणात निवडून आल्यानंतर किंवा भल्या मोठ्या पगाराची चांगली नोकरी मिळाल्यानंतर इमानेइतबारे सेवा करण्याऐवजी नको ते करायची आणि शासनाच्या, समाजाच्या डोळ्यात करायची अशी सवय अनेकांना लागलेली असते.
मी मागे कोण होतो, आज कसा आहे याचा विचार माणूस करत नाही. पण भविष्यात मी खूप मोठा व्हावा यासाठी नको त्या उठाठेवी माणूस करित असतो. खरे तर माणसाचे जीवन पाण्यावरच्या बुडबुडयाप्रमाणे आहे. पाण्यावर असलेला बुडबुडा बराच वेळ पर्यंत थांबलेला दिसून येतो. परंतु छोटयाशा वाऱ्याच्या झुळकेने तो बुडबुडा फुटून जातो. अगदी माणसाचे पण तसेच आहे. आज आहे तर उद्या नाही. पुढच्या क्षणाला माणसाच्या आयुष्याचे काय होणार आहे हे फक्त त्या विधात्यालाच माहीत.
अनेक वेळेला देवदर्शनासाठी किंवा राज्याच्या, देशाच्या राजधानीला आपण आपल्या कामासाठी जातो. जाताना मोठ्या दिमाखात एखाद्या चांगल्या नव्या, कोऱ्या गाडीत बसून जायची इच्छा असते. परंतु अशी भरतात वेगाने जाणारी गाडी केव्हा त्या गाडीला अपघात होईल आणि बाळगलेले स्वप्न भंग कोणत्या क्षणाला होतील हे कोणालाही कळले नाही. अनेक वेळेला माणसाच्या आयुष्यात जीवन जगण्यासाठी जेवढे दिवस असतील तेवढेच दिवस तो जगतो. असे आपण सांगत असतो. परंतु मानवी जीवनाचा थांगपत्ता कोणालाही लागलेला नाही. भूतकाळात आपण काय केलो याचे आपल्याला स्मरण राहते. वर्तमान काळात आपण काय करायचे आहे याचे भान आपण ठेवतो. परंतु भविष्य काळात आपले काय होणार आहे हे कोणालाही अद्यापपर्यंत समजलेले नाही. खरे तर आपले उद्या काय होणार आहे हे आज जर कळले असते तर खरोखरच माणूस अनेक अपघात टाळू शकला असता. परंतु विधात्याने आपल्या नशिबात काय लिहिले आहे हे फक्त त्या विधात्यालाच माहीत.
यासाठी माणसाने वर्तमान काळातील जीवन सुखाने कसे जगता येईल याचा विचार जरुर केला पाहिजे. आणि भविष्याचे काही खरे नाही. असे समजून जपून वागायला शिकले पाहिजे. भविष्याची चिंता, नियोजन माणसाच्या जवळ जरुर असली पाहिजे. परंतु अत्यंत बेफिकीरीने वर्तमान जीवन जगायचे आणि भविष्यातील कल्पनेसाठी नको ते खटाटोप करून पैसा मिळवायचा हे काम करता कामा नये.!