करपत चाललेली माणुसकी
करपत चाललेली माणुसकी
सध्याचे युग धावपळीचे आहे. कुठे माणूसकी झिरपताना दिसते तर कुठे करपताना!! माणूस हा ओळखला जातो त्याच्या अंगी असलेल्या माणूसकीतून. केरळमधील हत्तीणीची घटना काय सांगते? अघोरी पदार्थ तिला खायला घालून तिचा व तिच्या बाळाचा जीव घेण्याचे काम कुणी नराधमानेच कसे काय केले? माणुसकीला काळिमा फासण्याचेच हे काम आहे.
आई वडील आपले जन्मदाते. आपल्याला चालणे बोलणे शिकवून शिक्षण देऊन पायावर उभे करतात. सर्वतोपरि आपली काळजी घेतात. त्याच आईवडिलांना आमेरिकेला घरी नेण्याचे आश्वासन देऊन इथली इस्टेट खिशात घालून त्यांना विमानतळावर सोडून पसार होणे हे माणुसकीचा अंशही अंगी नसल्याचे निदर्शकआहे. त्यावेळी त्या आईवडिलांना काय ब्रम्हांड आठवले असेल ह्याची कल्पनाच करू शकत नाही.
आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारी मुलेही तेवढीच कठोर म्हणायला हवीत. आयुष्याच्या संधीकालात मुला-सुना-नातवंडांबरोबर आनंदात राहू असेच प्रत्येकाचेस्वप्न असते. काहींच्या नशिबी असा वृद्धाश्रमवास येतो. तरीही त्यात ते आनंदाने रहातात. आपल्या समवयस्कांबरोबर गप्पागोष्टी करतात. काही मुले परदेशी स्थिरस्थावर होतात. आईवडिलांकडून सर्व काही करून घेतात. त्यांना हवा असतो तुमचा मायेचा स्पर्श... प्रेमाचे आश्वासक शब्द... जे त्यांना मानसिक आधार देतात. ते तर ही मुले नाहीच देऊ शकत, पण जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी कळते तेव्हा इकडे येण्याचे सोडून त्यांचे विधी उरकून घ्या असे बेमुर्वतखोरपणे कळवताना ह्यांना काहीच कसे वाटत नाही?
दोघांमधला एक मागे राहिला असेल त्याला आधार देण्याचे ह्यांचे कर्तव्य आहे. ज्यांनी आपल्याला वाढवले, मोठे केले त्यांना शेवटचे बघावेसेही वाटू नये हे खरोखरीच करपत चाललेल्या माणुसकीचे निदर्शक आहे.
हा असा बदल कलियुगात कशाने झाला? भौतिक प्रगती, स्वार्थीपणा, ज्या शिडीवरुन वर गेलो ती नंतर लाथाडून द्यायची हिणकस वृत्ती खरोखरीच करपलेली माणुसकी दर्शविणारी आहे.