जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते
प्रिय रोजनिशी,
आज माझी इकडे ठाण्यामध्ये मिटींग होती कोरोनावरती एक दिवसाचे प्रशिक्षण होते. दुपारी बारापासून चार वाजेपर्यंत. त्यामुळे सकाळी उठायची घाई नव्हती. तरी पण सकाळी लवकर उठून रोजच्याप्रमाणे स्वयंपाक करून ठेवला. एकतर खूप गरम होत असल्याने सकाळी सकाळीच पोळ्या करून ठेवला तर बरे पडते. त्यातून आज रामायणामध्ये रावणवध होता. आम्ही आतापर्यंत अत्यंत भक्तिभावाने एखादी पोथी वाचावी त्याप्रमाणे सीरियल बघत आलो त्यामुळे रावणवध झाल्यानंतर एक नारळ फोडला. रामाचा जयजयकार केला आणि देशावरील संकट लवकर टळू दे, अशी प्रार्थनापण केली.
लहानपणी घरांमध्ये ग्रंथ लावला की रामाच्या किंवा कंसाच्या वधाच्या वेळी एक नारळ फोडला जाई हे मी बघितले होते त्याप्रमाणे बाबा वाक्यं प्रमाणम् पद्धतीने केले.
दुपारी मीटींगला गेले त्यात कोरोनाबद्दल अजूनअजून नवीन माहिती व पीपीई कीट कशी घालावी याबाबत डेमो दाखवला. शिकवणारे सर एक गमतीशीर वाक्य बोलले. ते म्हणाले, केसात पण कोरोनाचे विषाणू वाढतात त्यासाठी सर्वांनी टक्कल करून घ्या. डोळ्यासमोर चित्र आले की सगळ्या बायका टकल्या झाल्या तर कशा दिसतील...
पाच वाजता घरी आले. थोडीशी झोप काढली मग संध्याकाळचा स्वयंपाक रामायण महाभारत. महाभारतामध्ये युधिष्ठिराला द्युत खेळण्यासाठी हस्तीनापूरला पाचारण केले आहे.