krishnakant khare

Others

4.3  

krishnakant khare

Others

जाणता राजा

जाणता राजा

5 mins
861


जाणता राजा असं जरी आपण बोललो तरी आपल्या डोळ्यांसमोर शिवछत्रपती शिवाजी महाराजच उभे राहतात. "जाणता राजा" म्हणजेच प्रजेचा कष्ट, दुःख जाणनारा राजा आणि ते दुःख कष्ट दूर करणारा राजा म्हणजे "जाणता राजा."

शिवछत्रपती शिवाजी महाराज नुसतेच राजे नव्हते, तर शक्तीबरोबर युक्तीने खेळणारे राजे होते.


जीवावर उठणाऱ्या अफजलखानाचा शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा काढून त्याला मरण दिले होते, दुसरा कोणी राजा असता तर त्याने अफजलखानाचे मृत शरीर वाऱ्यावर सोडून दिले असते जसं उकिरड्यावर कचरा पडलेला असतो तसा, पण छत्रपती शिवाजी महाराज एक मुत्सद्दी तसेच न्यायीप्रिय राजा होते, त्यांनी तसे केले नाही, त्यांची तत्वे हिंदू राजाला शोभणारी असेच होती, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या मृत शरीराची विल्हेवाट न लावता मुस्लिम धर्माच्या पद्धतीने दफनविधी केला. अफजलखान दुष्ट होता, धोकेबाज होता जिवंत असेपर्यंत त्याची तशी वृत्ती होती. आता तो मेला. त्याची वृत्ती, दुष्ट स्वभाव त्याच्याबरोबरच गेलं, आता राहिलंय ते फक्त मेलेले गलितगात्र शरीर. ती मृत व्यक्ती  सर्वसामान्यांसारखीच आहे. ज्या मनुष्य जातीतून व्यक्तीचा जन्म झालेला आहे आणि आता त्याच मेलेल्या व्यक्तीच्या शरीराचा आदर म्हणून शिवछत्रपती महाराजांनी आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा मुस्लिम धर्माच्या पद्धतीने दफनविधी केला. असे हे शिव छत्रपती शिवाजी महाराज 


"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" असा कधीही भेदभाव केला नाही ते दूरदृष्टीचे होते, शिवाजी महाराजांना राष्ट्रीय एकता घडवायची होती. राजा फक्त एकाच धर्माचा न राहता सर्व धर्माचा असावा आणि प्रत्येक धर्माला समानता बंधुभाव व राष्ट्रीय एकात्मतेची जोड द्यावी असे समजूनच शिवछत्रपती महाराजांनी आपल्या कारकीर्दीचा उपयोग प्रजेच्या सेवेसाठी केला म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटलंय ते उगीच नव्हे.

शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे वडिलांचे नाव शहाजी होते आणि आईचे नाव माता जिजाऊ होते शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे वडील विजापूरच्या बादशहाचे सरदार होते. शहाजींची पुण्यात जहागीर होती, म्हणून शिवाजी महाराज, माता जिजाऊ हे पुण्यातच राहात. लहानपणी शिवाजी महाराजांना गोष्टी ऐकण्याची फार आवड म्हणून जिजाऊ माता रोज रामायण व महाभारत यातील छानछान गोष्टी सांगत, या गोष्टींच्याच माध्यमातून त्यांची स्वराज्यप्रेरणा जिजामातेने जिवंत ठेवली होती, शिवाजी महाराज गोष्टी ऐकून तल्लीन होत. त्यांनाही वाटे आपणही श्रीरामासारखे, अर्जुनासारखे, श्रीकृष्णासारखे, हनुमंतासारखे हुशार व्हावे. शिवाजी महाराजांना आपल्या धर्माचा फार अभिमान वाटे. जसजसे शिवाजी महाराज मोठे होऊ लागले तसतसे ते मावळ्यांच्या मुलांना जमवून लढाईचे खेळ खेळत, भाल्याची फेक अचूक धरत, तलवारी, दांडपट्टा चालवायला, घोड्यावर बसायला शिकले. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र यांचा अभ्यासपण लहाणपणापासून कुशलतापूर्वक केला आणि ते रोजच्या दिनक्रमात त्यांची ही अत्यावश्यक दिनचर्या असायची. पुण्यात आल्यावर त्यांनी मुसलमानांच्या गुलामगिरीतून जनतेला सोडवायचा प्रयत्न केला. त्यांनी तरुण मावळे व त्यांनाच लढाईचे शिक्षण दिले.

त्यांचे एक मोठे सैन्य बनवले या सैन्याच्या मदतीने त्यांनी विजापूरच्या सुलतानाचे किल्ले जिंकायला सुरुवात केली. त्यांनी शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराज कमालीचे वस्ताद. त्यांनी एकालाही दाद लागू दिली नाही. शिवाजी महाराज तसे फार शूर होते तसेच ते युक्तीवानसुद्धा होते. शिवाजी महाराजांना औरंगजेबाने भेटीस बोलावले पण औरंगजेब आतल्या गाठीचा, त्याने शिवाजी महाराजांना त्यांच्याहून काही लायकी नसलेल्या अशा राजांच्या रांगेत मागे उभे राहायला दिले होते. शिवाजी महाराजांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांना कमालीचा राग आला होता. छ्त्रपती शिवाजी महाराज भर दरबारातून थेट आपल्या वाड्याकडे गेले. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कैद करून वाड्यावर रात्रंदिन कडक पहारा ठेवला होता.


आपण कैद झालो हे समजल्यावर आता आपल्याला शक्तीपेक्षा युक्तीने खेळलो तर आपला निभाव लागेल, अशा जाणत्या राजाने जाणलं आणि औरंगजेबाला शिवाजी महाराज आजारी असल्याचं कळविण्यात आलं आणि बाहेरून औषधे आणण्याची परवानगी मागितली. पुढे त्यांना बरे वाटले. आता त्याकरीता गोरगरीबांना व आपल्या मित्रांना वाटण्यासाठी मिठाईचे पेटारे पाठवण्याची परवानगी काढली. सुरुवातीला पहारेकरी ते मिठाईचे पेटारे तपासत पण पुढेपुढे ते पहारेकरी मिठाईचे पेटारे न तपासता सोडू लागले पण शिवाजी महाराजांनी याच गोष्टीचा वेळेवर फायदा उठवला. एके दिवशी याच मिठाईच्या पेटार्‍यातून पसार झाले व प्रत्यक्ष महाराष्ट्रात दाखल झाले. अशा रितीने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या पद्धतीने आपली सुटका करून घेतली होती.


काही दिवसांनी रायगड ही आपली राजधानी करून शिवाजी महाराज गादीवर बसले. त्या दिवशी आपल्या वजनाइतक्या सोन्याच्या मोहरा गोरगरीबांना दानधर्म म्हणून वाटून टाकल्या. आठ प्रधान नेमले. त्यांना त्यांची कामे वाटून दिली आणि त्या दिवसापासून शिवाजी महाराजांना लोक "छत्रपती शिवाजी महाराज" म्हणू लागले. शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींच्या आज्ञेवरून आपल्या राज्याचा भगवा झेंडा फडकवला. महाराज फार मोठे नीतिमान होते. स्त्रियांचा ते फार आदर करीत.


एकदा काय झाले, शिवाजी महाराजांनी आबाजी सोनदेवास विजापुराकडे जाणारा कल्याणचा खजिना लुटण्यासाठी 

पाठवले होते. त्याने तर खजिना लुटला पण कल्याणच्या सुभेदाराची अत्यंत देखणी सूनही पकडून आणली होती. आणलेली लूट, सुभेदाराची सून शिवाजी महाराजांना आबाजी सोनदेवाने भेट दिली होती. शिवाजी महाराजांनी त्या सुंदर मुलीला पाहिलं. शिवाजी महाराजांना अत्यंत राग आला. आबाजी सोनदेवास तेथून घालवून दिले. त्या सुभेदाराच्या सुनेला म्हणाले "मुली तू घाबरू नकोस', तू माझी बहिण आहेस मी तुला तुझ्या नवऱ्याकडे सुखरूप पाठवण्याची व्यवस्था करतो." लगेच तिला लुगडे चोळी देऊन खणा-नारळाची तिची ओटी भरून तिला मेण्यात बसवून तिच्या नवर्‍याकडे पाठवून देण्यात आले.


अशीच सत्यकथा हिरकणीविषयी आहे. उंच अवघड बुरुजावरून आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता घरी येते, ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळते तेव्हा शिवाजी महाराजसुद्धा आश्चर्यचकित होतात, कारण त्या बुरुजाची स्थिती अशी आहे की बुरुजावरुन पाणी खाली जाईल आणि बुरुजाखालून वर हवा येईल पण कोणाला चढता उतरता येणे अशक्य आणि तो अवघड बुरुज पार करायला भल्याभल्यांची पायाखालची वाळू घसरेल. म्हणून शिवाजी महाराजांना जाणून घ्यायचे होते, की हिरा ह्या बुरुजावरून खाली उतरली कशी? तेव्हा हिरा शिवाजी महाराजांच्या समोर नम्रपणे बोलते "महाराज त्या अंधाऱ्या रात्री मला माझ्या बाळाशिवाय कुणीच दिसत नव्हतं, कोल्हा-लांडग्यानी माझ्या बाळाला खाल्लं असतं म्हणजे... हाच मला विचार करवत नव्हता, पहाटेच्या आत अंधाऱ्या राती कोल्हे-लांडगे शेताभातातन, नदीनाल्यातनं, जंगल, गावातनं शिकारीसाठी भटकत असतात. त्याआधी मी बाळापर्यंत पोहोचले तर बरं होईल हया विचारात धडपडत ह्या बुरुजावरून खाली घराकडे गेले. मग शिवाजी महाराज हिराला प्रश्न करतात "मग आता आम्हाला दाखव तू ह्या बुरूजावरुन खाली कशी उतरली?”


पण आता रात्रीपेक्षा तो दिवसातला बुरुज अजून कठीण वाटत होता,  तो भयंकर बुरुज बघून हिराला बुरूजावरुन खाली उतरण्याची हिंमत होत नाही ती साध्यापणाने, नम्रपणे बोलते, "महाराज जी हिरा ह्या बुरूजावरुन संकटात पडलेल्या बाळासाठी खाली उतरली ती बाळाची आई होती. आता माझं बाळ सुखरुप आहे म्हणून आता ह्या बुरूजावरुन खाली उतरण्याची माझी हिम्मत होणार नाही" ह्याच हिराच्या बोलण्यावरून आपल्या जाणत्या राजांनी हिराला काय ओळखायचे ते ओळखले, छत्रपती शिवाजी महाराजांना हिराच्या ह्या प्रत्येक गोष्टीतनं हेच दिसलं, हिराचं आपल्या बाळावरचं निरपेक्ष प्रेम व बाळाला संकटातून वाचवण्यासाठी जीवापलीकडची धडपड...


छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं ताडलं, हे सगळं जाणलं आणि आईने बाळासाठी केलेल्या धडपडीचे प्रतीक म्हणून व हिराचा एक सन्मान म्हणून रायगडाच्या ह्या कठिण बुरुजाला हिरकणी नाव देऊन इतिहासाच्या पानावर रायगडाचा हिरकणी बुरूज अजरामर केला. हिरकणीला साडी चोळी देऊन, खणानारळाची तिची ओटी भरून, बाळाला झुंजारराव नाव देऊन, गावाला हिरकणीगाव नाव देऊन, घरी येण्यासाठी सन्मानाने मेण्यात बसवून दिले. अशी ही सन्माननीय कार्ये शिवछत्रपतीं शिवाजी महाराजांनी केल्यानंतर, आपल्या ह्या जाणत्या राजाकडून त्यांच्या कथेतून अशी स्फूर्ती मिळल्यावर आपणही अशीच काही चांगली कामे करावी व आपल्या वरिष्ठांकडून शाबासकी मिळवावी, असं वाटायला लागतं.

वंदन आपल्या जाणत्या राज्याला.


Rate this content
Log in