जाणीव
जाणीव
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
आज एकदम खुशीत होता राघव. प्रमोशनची ऑर्डर ठेवली होती बॉसनी हातात. हां ...आता बदली जरा लांब ठिकाणी झाली होती 'भोपाळ'ला. पण प्रमोशनची ख़ुशी जास्त होती. पंधरा दिवसातच नवीन जागी हजर व्हायचे होते.
घरी आल्याबरोबर त्याने आईबाबा आणि पत्नी जानकीला हि आनंदाची बातमी सांगितली आणि लगेच आपल्या मित्रांना हे सांगायला तो नाक्यावर गेलाही. रोज मित्रांना भेटल्याशिवाय राघवला मुळी चैनच पडायचे नाही. शाळेपासूनचे सोबती होते सारे.जन्मापासून राघव इथेच तर वाढला होता त्यामुळे हे गाव,हे सवंगडी सारे त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले होते.
पंधरा दिवस कसे भुर्रकन उडून गेले साऱ्यांचा निरोप घेण्यात. मित्र,नातेवाईक सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन राघव जानकी भोपाळला रवाना झाले.
नवीन गावी रुजू होऊन महिना झाला राघवला. प्रमोशनवर आल्यामुळे मस्त बंगला मिळाला होता त्यांना राहायला. कंपनीने गाडीही दिली होती शोफरसहित येण्याजाण्यासाठी. सारे आयुष्य साध्या फ्लॅटमध्ये घालवलेल्या राघवचा आनंद त्यामुळे गगनात मावत नव्हता. घर लावण्यात आणि नवीन गावात सेटल होण्यात महिना गेला राघव आणि जानकीचा.
रुटीन सुरु झाले आणि एक दिवस राघव ऑफिसमधून घरी परतला तोच मुळी कंटाळून. संघ्याकाळ त्याला खायला उठली. इथे ना कोणी मित्र ना कोणी नातलग. करायचे काय रोज? खूपच बेचैन झाला राघव. "काय यार? कसं निभावणार आपलं इथं? मित्रांशिवाय, नातलगांशिवाय कसा राहू मी? उद्याच साहेबांना सांगून परत गावी बदली करून घेतो मी. प्रमोशन कॅन्सल झालं तरी चालेल." अगदी काकुळतीला येऊन राघव म्हणाला जानकीला.
" एवढं काय त्यात? उगाच आपलं इमोशनल व्हायचं? सारखं माझं गाव,माझं घर करायचं? सुंदर आयुष्य समोर असताना उगाच मागच्या आठवणींनी अश्रू ढाळत बसायचं. मुळीच चालणार नाही मला ते." उपहासाने जानकी म्हणाली.
जानकीचा एक एक शब्द ऐकताना राघवला जणू आपला प्रतिध्वनीच ऐकतोय असे वाटले. नवीन लग्न होऊन जेंव्हा जानकी सासरी आली तेंव्हा माहेरच्या आठवणींनी अशीच उदास व्हायची आणि ह्याच शब्दात राघव डाफरायचा तिच्यावर. शहरात सुखासीन आयुष्य जगताना खेडेगावातील काबाडकष्टाच्या जीवनाची एवढी कशी आठवण येऊ शकते ह्याचे कोडेच पडायचे राघवला.आत्ता तिच्या मनाची बेचैनी समजू शकला राघव. जानकीच्या घरी जरी अगदी हलाखीची परिस्थिती होती तरी सारे आपले जिवाभावाचे सोडून नवीन ठिकाणी मन रमवणे किती कठीण असते याची जाणीव होऊन तो हळूच पुटपुटला " सॉरी ".