Meenakshi Kilawat

Others

4.2  

Meenakshi Kilawat

Others

हिरवळ

हिरवळ

4 mins
1.4K


आपल्या घरीच हिरवळीला आणायची राहायला. जर हिरवळीला आपल्या घरात राहायला जागा मिळाली तर हिरवळीला किती आनंद होईल आणि ती आपणास कितीतरी देवून जाईल. तसा आपणा सर्वानाच हिरवा बाग आवडतो. पण आपण तो स्वप्नातच बघतो. परंतु आपण त्या स्वप्नातली बाग कृतीत उतरवली तर आपल्या घरातच सुंदर बाग तयार होईल. त्यात अशक्य काहीच नाही. त्यासाठी आवड महत्वाची आहे. आपणास पहायला मिळत असेल, मोठ्या शहरांमध्ये टेरेसवर बाग तयार करतात. हिरवळ ही मातीवर कुठेही उगविते. ती एकटी रानावनात जगते. तिला कोणाचा आश्रय नसतो तरी ती प्रफुल्लित होवून हसत राहाते. जरा आपण विचार करावा की जर ती आपल्या घरी आली राहायला तर तिला किती आनंद होईल आणि किती हर्षाने जोमाने ती बहरेल, फुलेल, फळेल आणि आपला पूर्ण खजिना ती आनंदाने रिता करेल. तिच्या अंगातले समूळ गुणधर्म ती मानव कल्याणाकरीता खर्च करीत आहे आणि करीतच जाणार आहे.


आपणही काही प्रमाणात प्रेम, माया देवून तिला आपल्या घरात मानाचे स्थान देवू या.पोषक तत्वाने भरपूर व्यंजन भाजीरूपात ती आपल्याला परत देईल. ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे. आपल्या शरीराला तनामनाला तिच्यापासून मिळेल सुख, समाधान, आरोग्य. चला तर मग या शुद्ध औषधी तत्वाने भरलेल्या फळभाज्या कशा पद्धतीने तयार करू शकतो व त्याचे भरपूर उपयोग घेवू शकतो. थोडक्यात बघू या! 


आपला जर हिरवळीला घरीच नेहमीसाठी ठेवायचा विचार असेल तर आपल्याला थोडी थोडीशी मेहनत करावी लागेल. निरनिराळ्या प्रकारच्या फळभाज्या फुललेली, फळाने लगडलेली बाग आपल्या नजरेसमोर तयार करू या. ती आपणास उत्साह देऊन जाईल.


आपण थोड्या जागेत आपल्या घरीच फळभाज्या आणि सुंदर रंगीबेरंगी फुलांची बाग तयार करू या. आपले मन आल्हादक सुंगधाने नाचू गावू लागेल. आपला बगीचा तयार होण्यासाठी आपणास पूर्वतयारी करावी लागेल. सर्व प्रकारचे बी-बियाणे आपणास बाजारातून आणावे लागेल. काही घरी किचनमध्येच उपलब्ध असतात. तसेच माती आणून त्यास उन्हाळ्यातच थोडी वाळवून ठेवावी आणि शेणखत जैविकखत कृषी केंद्रातून विकत आणावे लागेल. आपल्या घरी पुरेशी जागा नसेल तर आपण आपल्या बाल्कनीत किंवा गच्चीवर काही वृक्ष लावू शकतो. त्यासाठी आपल्याला मोठे डबे, तेलाची कॅन, तुटलेले ड्रम्स, कुलरची टंकी, बकेट्स, बॉटल्स ज्या वस्तू आपण भंगारात फेकत असतो त्या वस्तू जमा करून त्याचा आपण भरपूर उपयोग घेऊ शकतो.


आधी आपण कोणते वृक्ष लावायचे आहेत हे ठरवून विचारपूर्वक बी-बियाण्याची निवड करायची. जागा जर लहान असेल तर त्यानुसार वृक्षांची निवड करायची आणि आपण थोड्या जागेत कोणती वृक्षवल्ली होईल किंवा फळभाजी होईल त्याची आधी आखणी करून घ्यायची."पेराल तेच उगवेल"


कोणती भाजी लावायची ते आधी ठरवून घेवू या. पालक, मेथी, सांबार, गवार, भेंडी, तुरई, दोडकी, कोहळे, दुधी, कारली, वालशेंग, वांगी, टोमॅटो, हिरवी मिरची या सर्व भाज्या आपण छोट्याही जागेत लावू शकतो. फक्त आपणास थोडी मेहनत करावी लागेल.


आपल्या संसारात पुरेल इतका भाजीपाला जरी आपण काढला तर आपल्या संसाराला हातभार लावू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनेही स्वास्थ्य चांगले राहील. छोटी झाडे् छोट्या कुंडीत लावायची. मोठी फळझाडे मोठ्या वस्तूत लावायची.


जशी भेंडी, गवार, मेथी, पालक, हिरवी मिरची, कोथिंबीर या छोट्या वस्तूत किंवा पसरट भांड्यात लावायची. वालाची वेल, काकडी वेल, दुधी भोपळा वेल, कारली वेल. कोहळ्याची वेल, पडवळ वेल या वेलीना मोठ्या वस्तूत किंवा जमीनीत लावायचे. सोबत कडीपत्ता, पुदिना अवश्य लावावी. मुळे. गाजर, वांगी, टोमेटो यासारख्या भाज्या आपण उंचीप्रमाणे वस्तूमध्ये लावू शकतो. या सर्वसाधारण सुर्यप्रकाश व तापमान लक्षपूर्वक हाताळावी. या वृक्षवल्लीची किमया ओळखून जातीने लक्ष दिल्यास आपल्या मेहनतीचे फळ जरूर मिळेल. चांगला परिणाम म्हणजे आपला रिकामा वेळ कामी लागेल. जर आपणास शेती-मातीचे ज्ञान नसेल तर ना फुल मिळेल ना फळ मिळेल. त्यासाठी घरच्या मोठ्यांचे किंवा शेजारच्या वयस्क व्यक्तींची मदत आपण घेवू शकतो आणि या हिरवळीचा भरपूर प्रमाणात फायदा घेवू शकतो.


बिया लावण्याआधी आदल्या दिवशी पाण्यात टाकून ठेवले असता त्या बिया मातीत लवकर रूजून वर येतात. काही बिया आधीच छोट्याछोट्या पॉट किंवा जमिनीमध्ये वेगळ्या मातीत लावावे. ते अंकुरलेले रोप मोठे होतात दोन-अडीच इंच झाल्यावर ते आपण दुसऱ्या ठिकाणी लावू शकतो.


जे वृक्ष मोठे होतात त्यासाठी मोठा पिंप किंवा ड्रम घ्यायचा. त्याच्यात आधी विटांचे तुकडे किंवा कौलांचे तुकडे खाली टाकून पाणी निघून जायला व्यवस्था केली पाहिजे. त्यानंतर रेती, माती, शेणखत टाकून तीन भाग भरले पाहिजे. त्यानंतर व्यवस्थित मोठी झालेली रोपे त्या ठिकाणी लावावीत. पाण्याचा हलक्या हाताने शिडकावा करावा. ती रोपे लवकरच मोठी होतात. जसजशी मोठे होतात आपल्याला खूप आनंद होतो. त्यामुळे आपले रक्ताभिसरण छान होवून आरोग्य छान रहातं. घरच्याघरी व्यायाम होऊन आपण तरतरीत होतो. हिरवळ ही जीवनात खूप आवश्यक गोष्ट आहे. तिच्याशिवाय आपण जगू शकत नाही किंवा विचारदेखील करू शकत नाही. आपण वृक्षवल्लीला जर मायेने गोंजारले तर तीदेखील आपल्याला माया, प्रेम आणि वासल्य देते. ती आपल्याशी बोलतेसुद्धा पण तिची भाषा समजायला आपले मन मायाळू पाहिजे. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे हा सृष्टीचा नियम आहे.


लाल, गुलाबी, केशरी, अबोली, जाई, जुई, चमेली, चाफा आकाशी रंगाच्या फुलांचे वेगवेगळे रंगसौदंर्य पाहून मन मुग्ध होते. तसेच अनेक फळे पेरू, लिंबू, अंजीर या सारखी फळे चाखायला मिळतात. मन प्रसन्न होवून आपण पुढील वर्षी अधिक जोमाने आपली बाग फुलविण्याच्या प्रयत्नात असतो. या सर्वासाठी पाणी आवश्यक आहे आणि सध्या पावसाळा असल्यामुळे आपण हिरव्या बागेला आणून खूप सजवू या. ती बागेचा संसार आपल्याला भरभरून बहारदार नजराणा हमखास देईलच. 


Rate this content
Log in