हिराची शौर्य गाथा हिरकणी
हिराची शौर्य गाथा हिरकणी


हिरकणी बुरूज आम्हा सर्वांना माहितच आहे. समोर आव्हाने आली तर एक साधारण, अत्यंत घाबरट मुलगी, बाई, वेळेनुसार व वात्सल्य प्रेमा पोटी किती धाडसी कृत्य करू शकते याचे उदाहरण म्हणजे "हिरा". ज्याला शिवाजी राजेंनी हिराच्या शौर्याची कथा जोडली तो रायगडावरील एक अतिशय खोल कडा आज "हिरकणी बुरूज" म्हणून ओळखला जातो व तो एका माऊलीच्या धाडसाची हकिकत सांगतो.
हिरा एक गवळण, रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या झोपडीत आपला नवरा जीवा व लहान पाळण्यात झोपणाऱ्या बाळा बरोबर राहत होती. तिचा दूध विकण्याचा धंदा होता. आपली सगळी कामे आटोपून आणि बाळाला पाळण्यात झोपवून बाकीच्या आया बायां बरोबर ती दूध विकायला रायगडावर गेली. दूध विकले, पण तिथल्या बाजार पेठेत ती रमली आणि तिला वेळेचे भान राहिले नाही.
सूर्य मावळला, तोफ डागली गेली आणि आदेश मिळताच गडाचे दरवाजे बंद झाले. शिवरायांच्या कडक आदेशामुळे ते सूर्योदयालाच उघडणार होते. गडाचे दरवाजे बंद झाले की, "खालून वर येईल ती हवा आणि वरून खाली जाईल ते पाणी" असं म्हटलं जातं. पण ह्या गोष्टीला अपवाद ठरला तो म्हणजे 'हिरकणी' हिरा.
तोफेच्या आवाजाने हिरा भानावर आली. तिच्या बरोबरच्या बाया कधीच निघाल्या होत्या. ती पळत दरवाज्याकडे आली. तिने पहारेकऱ्यांना खूप विनवण्या केल्या. पण ते हुकुमाचे ताबेदार होते. तिचं त्यांच्या पुढे काही चालले नाही. हिरा तिच्या तान्ह्या बाळाच्या ओढीने अस्वस्थ झाली. तिचं तान्हूलं झोपडीत पाळण्यात रडत असेल ह्या चिंतेने ती व्याकुळ झाली. तिच्या विनवण्या सगळ्या निष्फळ झाल्या. आपल्या बाळाच्या काळजीपोटी हिराने गड उतरण्याचा निर्धार केला.
रायगडाचा हा कडा अतिशय खोल निमुळता होता. अंधार, वारा, पाऊस कशाचीच तमा न बाळगता ती आपल्या मातृत्वाच्या भावनेने ओथंबलेली आपल्या बाळासाठी सगळी संकटे सोसून गड उतरून आली आणि आपल्या तान्हुल्याला छातीशी धरून दूध पाजायला लागली तेव्हा कुठे तिला हायसे वाटले.
हिरा कडा उतरून आली ही बातमी गावात पसरली आणि शेवटी ही गोष्ट महाराजांच्या कानावर ही गेली. सगळे चकित झाले. कडा अत्यंत खोल, निमुळता, अतिशय अवघड. एवढीशी पोर भर अंधाऱ्या रात्री उतरली तर बलाढ्य शत्रुला सहजा सहजी दिवसा ढवळ्या चढून आक्रमण करता येईल. असे विचार महाराजांच्या मनात आले.
हिरा उतरली ह्यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार नव्हते पण हिरा खरोखर उतरली होती. महाराजांनी तिला बोलावून घेतले आणि विचारले आणि परत त्या कड्याकडे तिला नेले. तेव्हा हिरा ही चकित झाली. नुसतं खाली वाकून बघणही अश्यक्य वाटलं तिला. जेव्हा ती उतरली होती तेव्हा अंधार होता. तिच्या मातृवात्सल्या पोटी तिला फक्त तिचं तान्हूलं बाळ दिसत होतं. आपल्याला बाळाकडे जायच आहे एवढच तिच लक्ष्य होतं. त्या प्रेमामुळेच तिने तो अतिशय अवघड कडा उतरण्याचे धाडस केले. तो शत्रुला काय कुणालाही उतरता आला नसता. हिराने एवढं धाडस केलं ते फक्त बाळासाठी. एक माता आपल्या चिमुकल्या करता किती शौर्य करू शकते हे हिराने सिध्द करून दाखवले.
शिवाजी महाराजांनी साडी चोळी व इनाम देऊन हिराचे खूप कौतुक केले. तसेच त्या कड्याची आणखी उंची वाढवली आणि हिराच्या ह्या धाडसाची गोष्ट कायम लक्षात रहावी म्हणून त्या कड्याला हिराच्या नावे "हिरकणी बुरूज" हे नाव दिले. आजही रायगडावरचा तो हिरकणी बुरूज हिराच्या धाडसाची आठवण करून देतो.