Apurva Jadhav

Others

3  

Apurva Jadhav

Others

घड्याळ

घड्याळ

4 mins
426


      असं म्हणतात की माणसाच्या आयुष्याचा अंदाज लावता येत नसतो.एखाद्या माणूस आज आहे तर उद्या नाहीये.कोणाच मरण कधी येईल काहीच सांगता येत नसतं.असंच काहीसं अजिंक्य सोबत घडलं होत.त्याच्या ध्यानीमनी ही नव्हते की त्याच्या सोबत काय घडणार आहे.अजिंक्य हा पदव्युत्तर होता.त्याने व्यवसाय प्रशासन मास्टर म्हणजेच एम.बी.ए केले होते.त्याची इच्छा होती की त्याने स्वतःचा एक व्यवसाय सुरू करावा.पण व्यवसाय म्हणलं की त्यात थोडाफार धोका असतोच.त्यामुळे अजिंक्यच्या कुटुंबाचा त्याला पाठिंबा नव्हता.त्यांचे म्हणणे असे होते की,अजिंक्यने एक चांगल्या पगाराची नौकरी करावी.पण अजिंक्यला नोकरीत रस नव्हता.त्याला स्वतःचे व्यवसायचं सुरू करायचे होते.त्याने मनात ही गोष्ट पक्की केली होती की कितीही विरोध झाला तरी,तो व्यवसायाचा विचार सोडणार नाही.पण नशिबाने मात्र अजिंक्य समोर वेगळाच डाव मांडला होता.अजिंक्य ला काही वर्षांपासून डोकेदुखीचा त्रास सुरू होता.तो त्रास साधासुधा नसून त्याच्यासाठी खूप भयंकर होता.याबाबत त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला.डॉक्टरांनी काही महिने अजिंक्यवर उपचार केले.पण डॉक्टरांना त्यावेळी काही गंभीर जाणवले नाही.त्यावेळी अजिंक्यच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या.पण त्यातही काही गंभीर आढळले नव्हते.अजिंक्य त्यावेळी एम.बी.ए करत असल्यामुळे त्याच्यावर अभ्यासाचा ताण होता म्हणून त्याचे डोके दुखत असावे असे सगळ्यांना वाटले.नंतर काही वर्षांनी त्याचे एमबीए पूर्ण झाले आणि त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले.सगळं सुरळीत सुरु असताना अजिंक्यला तो डोकेदुखीचा त्रास परत सुरू झाला.पण यावेळी ते दुखणे पूर्वीपेक्षाही जास्त त्रासदायक होते.अजिंक्यला त्याचा खूप त्रास होत होता.त्यामुळे त्याने डॉक्टरांना त्याची कल्पना दिली.त्यामुळे डॉक्टरांनीही पुन्हा एकदा त्याच्या चाचण्या केल्या.पण यावेळी मात्र त्या चाचण्यांचा अहवाल हा गंभीर होता. अहवालात अजिंक्यला ब्रेन ट्यूमर असल्याचे प्रमाणित झाले.त्याचबरोबर डॉक्टरांची हे देखील सांगितले की तो आता फार काळ जगु शकणार नाही.हे ऐकून अजिंक्यच्या पायाखालची जमीनच सरकली.अजिंक्यच्या कुटुंबाला कळत नव्हते की आता काय करावे.घरात प्रचंड दुःखाच वातावरण निर्माण झालं होत.इतक्यात अजिंक्य म्हणाला,"आईबाबा,मला माझे रेस्टॉरंट सुरू करायचे आहे".हे ऐकून,अजिंक्यची आई ढसाढसा रडू लागली.सर्वांनाच धक्का बसला.अजिंक्यचे मरण त्याच्या दारी उभे असताना तो त्याच्या व्यवसायाचा विचार करत होता ही सगळ्यांसाठीच आश्चर्याची गोष्ट होती.अजिंक्यचे बाबा अजिंक्यला म्हणाले,"बाळा असा काय करतोयस.तुला भिती वाटत नाहीये"?त्यावर अजिंक्य म्हणाला,"हो वाटत आहे ना,पण मला माझा व्यवसायही सुरू करायचा आहे आणि तो मी करणारचं".अजिंक्यची ही शेवटची इच्छा म्हणून सर्वांनी त्याचे समर्थन केले.अजिंक्य त्याच्या खोलीत जाऊन शांत बेडवर बसला.त्याला खुप भिती वाटत होती.त्याला त्याची भिती व्यक्तही करता येत नव्हती.त्याच्या समोर एक घड्याळ होते.तो त्या घड्याळाकडे बघत होता.जसा घड्याळाचा काटा पुढे सरकायचा तसाच त्याच्या काळजाचा ठोकाही चुकायचा.दिवसरात्र अजिंक्य त्या घड्याळाकडे बघायचा.त्याला असे वाटायचे की त्याला आता काहीतरी होईल.त्या घड्याळाच्या काट्याकडे बघुन तो त्याचे उरलेले क्षण मोजत होता. 


      शेवटी अजिंक्यच्या जिद्दीपणामुळे त्याचे रेस्टॉरंट सुरू करण्याचे स्वप्न तब्बल ६ महिन्यांनंतर पूर्ण झाले.त्याचे रेस्टॉरंट सुरू झाल्यावर त्याला जणू त्याचे उरलेले आयुष्य जगण्याची नवी उमेद मिळाली.रेस्टॉरंचे उद्घाटन झाल्यानंतर तो आत गेला आणि त्याची नजर समोर असलेल्या घड्याळावर पडली.पुन्हा एकदा घड्याळ पाहून त्याला घाम फुटला.त्याला परत भीती वाटू लागली.उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी रेस्टॉरंट वर पहिला कस्टमर आला.पहिल्या कस्टमर चे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.त्यांना तिथले मेन्यू आणि जेवण दोन्ही आवडले.पहिल्या कस्टमरने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे अजिंक्यला खूप आनंद झाला आणि पुन्हा एकदा त्याचे लक्ष त्या घड्याळाकडे गेले.पण यावेळी मात्र त्या घड्याळाकडे बघून घाबरून न जाता,त्याच्या चेहर्‍यावर स्मितहास्य फुलले.तेव्हा त्याचा भाऊ त्याला म्हणाला,"तू तर घड्याळाकडे बघून घाबरून जायचा ना,आणि आज चक्क हसतोयस".तेव्हा अजिंक्य हसत म्हणाला,"आधी जेव्हा मी घड्याळाकडे बघायचो तेव्हा मला माझं संपत चाल्लेलं आयुष्य दिसायचं.मला वाटायचं की,माझ्याकडे किती कमी वेळ उरला आहे.पण आज जेव्हा माझे स्वप्न पूर्ण झाले,आणि मी यशाच्या मार्गावर उभा आहे,तेव्हा मला कळाले की आपल्याकडे किती वेळ उरला आहे याचा विचार करण्यापेक्षा उरलेल्या वेळेत आपण काय काय करू शकतो याचा विचार करायला हवा.एक गोष्ट खरं सांगतो.आधी जेव्हा मी घड्याळाकडे बघायचो तेव्हा घड्याळाचा पुढे सरकणारा काटा मला माझे संपत चाल्लेले आयुष्य वाटायचे.त्यावेळी मरणाची भीती तर वाटायचीच,पण त्यापेक्षाही जास्त भीती मरणाआधी माझे स्वप्न अपूर्ण राहून जाण्याची वाटायची.पण सुदैवाने माझे स्वप्न पूर्ण झाले.आता माझे जेवढे आयुष्य उरले असेल तेवढ्या आयुष्यात मी आणखी यशस्वी होण्याचा प्रयत्न करेन.कारण मला माझ्या मरणापूर्वी माझी एक सन्मानपूर्ण ओळख निर्माण करायची आहे".हे ऐकून अजिंक्यच्या भावाला अजिंक्यचा खूप अभिमान वाटला.पुढच्या दीड वर्षात अजिंक्यचा रेस्टॉरंट शहरात खूप प्रसिद्ध झाला.रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची गर्दी होऊ लागली.हे सर्व पाहून अजिंक्यला खूप आनंद होत होता.पुढच्या दोन वर्षात अजिंक्यच्या रेस्टॉरंटच्या आणखी दोन शाखा शहरात सुरु झाल्या.अजिंक्यने जी स्वप्न पाहिली होती ती सर्व स्वप्नं पूर्ण झाली.


      स्वकर्तृत्वाने कमावलेल्या यशाची,आठवणींची आणि आशीर्वादाची शिदोरी घेऊन अजिंक्यने या जगाचा निरोप घेतला.त्या ४ वर्षात त्याने ज्या जिद्दीने यश आणि ओळख कमावली त्याच कौतुक करावे तेवढे कमीच.पण मृत्यू हा अजिंक्यच्या देहाचा झाला होता.त्याच्या अस्तित्वाचा नाही.अजिंक्य नंतर अजिंक्यचा मोठा भाऊ म्हणजेच विजय याने अजिंक्यचे स्वप्न जिवंत ठेवून त्याचे रेस्टोरेंट चालवले.अजिंक्यची ही गोष्ट ऐकून प्रत्येकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल याची मला खात्री आहे.


Rate this content
Log in