बापमाणुस
बापमाणुस
संसार हा बैलगाडीच्या चाकासारखा असतो त्यात एक चाक आई तर दुसरं बापाच्या नावाने असत. जिथे आई म्हणजे वास्तल्य तिथेच बाप हा खंबीर हे मनात आपोआपच रुजून जात. प्रत्येक मुलांच आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम असत ह्यात काहीच दुमत नाही पण ते व्यक्त फक्त आई समोरच जास्त वेळा होत, बापासमोर नाही.
अरे छोटीशी इजा काय झाली तर आपण लगेचच कळवळून " आई गं " म्हणून ओरडतो. तश्याच आयुष्याच्या मोठ्या मोठ्या ठेसा लागल्यावर मोठ्याने सगळ्यात आधी आपण " बाप रे " असच म्हणतो, नाही का ..! खरतर बापावर फार काही कविता केल्या जात नाहीत अन त्याच त्याला काहीच दुःख नसत.
१९ मे ला माझा जन्म झाला. मी तर कल्पना सुदधा करू शकत नाही, माझ्या जन्मावेळी माझ्या वडिलांना त्यावेळेस किती आनंद झाला असेल. प्रत्येक वडिलांच आणि मुलाचं एक वेगळंच नातं असत, जस माझं आणि माझ्या वडिलांचं आहे. अगदी साधं, सुंदर पण ते अनुभवण्यासाठी आपल्याला वडिलांच्या जवळ जावं लागतं. जास्तीत जास्त संवाद, गप्पा गोष्टी ह्या वडील आणि मुलगा ह्यांच्यात झाल्या पाहिजे. जेणेकरून आयुष्याचे चढउतार, अनुभव, सुखद - दुखत क्षण हे वडील मुलांसोबत शेअर करतील त्यामुळे वडिलांचं आणि मुलाचं नात एखाद्या फुलांप्रमाणे फुलतच जाईल.
फक्त फादर्स डे, च्या दिवशी वडिलांवर प्रेम करावं किंवा फक्त ह्याच दिवसाची वाट आपण का पाहावी ? कित्येकदा असे प्रश्न मनात उपस्थित होतात. ह्याच दिवशी जास्तीत जास्त किंबहुना सगळेच जण वडिलांना प्रेमाच्या शुभेच्छा देतात. वडिलांना गिफ्ट, प्रेम किंवा ते प्रेम व्यक्त करण्यासाठी फादर्स डे ची वाट बघण्यापेक्षा वडिलांना योग्य तो आदर, त्यांना आयुष्यभर सुखात आणि जास्त नाही पण निदान म्हातारंपणात त्यांना तुमचा दोन मिनिटांचा फक्त वेळ द्या. त्यांच्यासाठी हेच खूप मोठं गिफ्ट असेल आपल्या मुलाकडून भेटलेल.
आपण बऱ्याच वेळा बोलतो चांगले आई वडील भेटायला भाग्य लागत, पण आई वडील हे सगळे चांगलेच असतात. आपल्याला चांगला मुलगा वा मुलगी होणं हेच महत्त्वाचं आणि जास्त चांगलं असत. कारण त्यांच्याच सहवासात राहून आपलं व्यक्तिमत्त्व टिकेल, फुलेल आणि घडेल. त्यामुळे आयुष्यातल्या येणाऱ्या कठीण प्रसंगांना आपण आरामात लोळवू शकतो.
प्रत्येक मुलाचे वडील हे त्याचे आयकॉन असतात. तसेच माझे वडील सुद्धा माझे आयकॉन आहेत. शक्यतो मुलाचं आणि वडिलांचं एकमेकांसोबत जास्त पटत नाही. मुलगा जसा आईला सर्वकाही सांगू शकतो तस वडिलांसोबत त्याला काही शेअर करता येत नाही. म्हणजेच आई वर ज्याप्रमाने तो प्रेम व्यक्त करतो तस त्याला वडिलांसमोर व्यक्त होता येत नाही. पण मित्रांनो, वडिलांचा मुलांना जो छुप्पा पाठिंबा असतो ना त्याची तुलना जगातल्या कुठल्याच पाठिंब्याशी करता येत नाही. आणि हाच एक माणूस असा असतो ज्याला आपला मुलगा आपल्याही पुढे जाताना जास्त आनंद होतो आणि हे तो गर्वाने चारचौघात अभिमानाने सांगू शकतो.
कधी कधी आपल्याला वडिलांचा भरपूर राग येतो मग त्यात लहानपणी ओरडुन, गप्पा करून तर कधी आयुष्यचं महत्त्व पटवून देताना तर कधी आयुष्याचे धडे गिरवताना असो वा पैश्याचं महत्त्व सांगतांना पण त्यांनी बजावलेल्या ह्याच भूमिकेमुळे आज आपल्याला समाजात नाव मिळालं आहे. मला तर माझ्या वडिलांनी वेळोवेळी चांगलीच मदत आणि पाहिजे तेव्हा भक्कम असा पाठिंबा दिलाय.
खरंतर वडील आणि मुलगा ह्यांच्यातील नात्यांचा सुखद असा अनुभव सर्वांनी मनसोक्तपणे घ्यावा व त्यासाठी एकमेकांसोबत जास्तीत जास्त संवाद साधायला हवा. तेव्हाच ह्या सुंदर नात्यांचा अनुभव घेता येईल, मी तो अनुभव घेतलाय आणि पुढेही घेत राहील ह्यापेक्षा अजून भारी नशीब काय असू शकत माझं..!