साठवण
साठवण
दहा पैशाच्या गोळ्या आणि दहा पैशाच्या नळ्या मन आनंदित होई,
एक कपडे जोड आणि एक चप्पल जोडीत मन श्रीमंती देई..
सणाच्या पुरण पोळीला पंचपक्कवांचा थाट येई,घरभर भरलेल्या माणसांनी दुःखाला जागा नाही...
पावशेर खाऊत डझनभर वाटण्या होई, फाटक्या कागदावर खाताना मायेला पूर येई..
गल्लीतला विटीदांडू टेंगुळ आणून जाई, फुंकर घालताना मात्र मित्रांची तारांबळ होई...
एकच पाटी ,एकच पेन्सील ज्ञान शिकवून जाई,शिक्षण असे होते की गुरुजीमध्ये दिसायची आई...
चार आणे दिले पाहुण्यांनी उर भरून जाई, सवंगड्यात वाटून खाताना भलतीच मजा येई...
शेजारचे घर म्हणजे हक्काचे होई,भूक लागली हे आई आधी शेजारची काकू समजून जाई...
खेळात लागल्या ठेचा लई, मायेची फुंकरच जखम भरून नेई...
काळी पांढरी टीव्ही सगळ्यांसाठी रुबाब होई,दाटीवाटीने दूरदर्शन सुट्टीचा दिवस मजेत जाई...
एक रुपयात सायकलीचा एक तास जाई,चार मित्रांना लटकवून रुपयात श्रीमंती येई...
दिवाळीचा लाडू आई पहिल्या अंघोळीला देई,काणवल चकली पुरवून खाल्ली जाई...
फुसकी फटाकी चंदेरी रंग देऊन जाई,एक चक्री आणि एक भुईनळा आकाशाला गवसणी देई...
....अविस्मरणीय क्षण डोळ्यात तरळून जाई,कसली ही श्रीमंती?माणूस माणसाला ओळखत नाही,
रंगीत चित्रापुढे पिढी बरबाद झाली,
इंग्रजीच्या अट्टहासात मातृभाषा परकी होऊन गेली...
पिढीजात संस्कार दिखाव्यापुढे नष्ट होई,सोशल मीडियाचे सगेसोयरे एक न कामी येई..
रंगतदार दुनियापुढे आपल्यांचा विसर होई,पैशासाठी माणूस कुठल्याही थराला जाई...
बिझीच्या नावाखाली बंधनाला वाव नाही, छताची किंमत मोजताना दमछाक होई...
श्रीमंतीच्या हव्यासात समाधानाला जागा नाही, कोपऱ्यातील अडगळीत आईबापाचा विसर होई...
आदर ,प्रेम ,माया फक्त सुविचारत येई,गाठीभेटी घेताना अहंकाराचा दिखावा होई...
दोन जण दोन्हीकडे पोर अनाथ, म्हणे मुलांच्या आयुष्यासाठी झगडतो दिनरात...
खरच एवढं महत्त्वाचा झाला का हो अहंकार? चार भिंतीच्या आतच तुमच्या आयुष्याचा संसार?
मान्य... जग चंद्रावर गेल, पण अजून ऐकल नाही कधी की कुणी अमर झालं...
जगासोबत चालाव अस सगळेच म्हणतात,पण चालून थकल्यावर मायेचा हात कुठून आणता??...
बाहेरच्या दुनियेशी मैत्री असावी खरी,पण म्हणून माणुसकी माया सोडून द्यावी का बरी??
सोडा हो हा मायाजाल, सर नाही मायेची, चार आण्याच्या जिव्हाळ्यात गावभर माया यायची...
ते दिवस नाही परत येणार ,पण प्रयत्न तर करूया,आठवणींच्या गावात फेरफटका मारू या...
डोळे मिटून बघा कुठे गेला चेंडू,मनातून आठवून बघा विटी आणि दांडू....
बघा येते का चव उष्ट्या अर्ध्या गोळीची, पिझ्झा सोडून आठवण येईल आईच्या हातच्या पोळीची...
आयुष्याच्या शर्यतीत आपला 'न' धावणारा घोडा झाला,सगळ जिंकलं पण आनंद शोधायचाच राहून गेला....
आठवणींच्या जगात पुन्हा एकदा जावं वाटत, दिखावा सोडून साधसुद व्हावं वाटत...
धाव धाव धावून दम आला उरी,पण शांती आणि सुखाच्या पडेनात सरी, शांती आणि सुखाच्या पडेनात सरी.......