STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

4  

शिल्पा म. वाघमारे

Others

ग्रामीण भारत

ग्रामीण भारत

1 min
111

भारताच्या गावांची रे

रम्य मंजूळ ती पहाट

वासुदेवाच्या मधूर वाणीनं

न्हाते अमृत वर्षावात . . .॥१॥


दिसारंभीच ते श्रवण

विठू नामाचा गजर

मन होई रे प्रसन्न

कर्णमाधुरी तो स्वर. . .॥२॥


भास्करही तो प्राचीचा

डोकावतो डोंगरातून

त्याच्या सहस्त्ररश्मींनी

घालतोया दिव्य स्नान. . .॥३॥


धरणीच्या देहावरी

जळ झुळुझुळु वाहे

तान्हलेल्या चराचरांची

नदीमाय वाट पाहे . . .॥४॥


पाखरांची किलबिल

कुठे मोर ते नाचरे

गंध चंदनी दरवळ

का न होई मन बावरे. . .॥५॥


येता जाता रामराम

बंधुभाव ठायी ठायी

प्रसंगे मग तो वैरीही

मदतीला धावून येई. . .॥६॥


रक्ताच्या नात्यांहूनही

मायेच्या त्या शेजारणी

शुद्ध प्रितीचाच झरा 

सदा वाहे त्यांच्या मनी . . .॥७॥


माझा शेतकरी दादा

दिन रात्र राबतोयं

न्हातो घामांच्या धारांत

मोती पीक काढतोयं. . .॥८॥


अवखळ चंचल उनाड

वारा छेडतो अंगाला

साजनाच्या आठवाने

जीव सखीचा भुलला. . .॥९॥


खरी श्रीमंती सृष्टीची

खेडेगावाच्या मातीत

हरवलेला हा सुगंध

विदेशांच्या डोलार्‍यात. . .॥१०॥


Rate this content
Log in