अभंग
अभंग
जाणा वेळ काळ । मग कुटा टाळ
तुम्ही हो वाचाळ । शांत रहा
दिस नाही बरे । व्यर्थ नको जिव्हा
चालवूस भावा । ऐक जरा
इखाची पेरणी । शब्दांची करणी
नको ती भरणी । टकुळ्यात
पक्ष आणि झेंडे । कशास मिरवी
तिरंगा थोरवी । ठेव ध्यानी
निरर्थक गप्पा । करितो नेत्यांच्या
बघ तू स्वतःच्या । योगदाना
उचलली जीभ । लावितोस टाळ्या
बऱ्या नव्हे खेळ्या । या घडीला
ऐवढे का सोपे । देशाचे दायित्व
निभावणे सत्व । कठीण रे
कशापायी बोल । लावितो तू वेड्या
बुध्दीच्या तोकड्या । ठेव भान
द्वेष तिरस्कार । तूझा रे पोकळ
बिषारी मोहोळ । आगडोंब
तू जप स्वतःला । होईल अनर्थ
सांडू नको व्यर्थ । बोल खोटे
धुरंधर पार्थ ।आहे एकजूट
तुझी काथ्याकूट । वेगळीचं
अती तिथे माती । म्हणं ठेव ध्यानी
देशापेक्षा कोणी । मोठा नाही
मिनू म्हणे देवा । क्षमा कर त्यांना
परिस्थिती ज्यांना । समजेना