आठवणीतील गाव
आठवणीतील गाव
ऊन्हाळ्याची सुट्टी म्हणजे, व्हायचे गावाकडे जाणे
बालपणातील ते 10-12 दिवस, पण किती रम्य होते ते जगणे
मोठा असायचा प्रवास, ती गावाकडची वाट
रात्रीचे चांदणे पाहत निघालो की थेट गावाकडेच पहाट
तिथला गार वारा नि परिसर काही औरच असायचा
सगळा शीण निघून जाऊन, पावलांत उत्साह संचारायचा
मुंबईहून आल्याने वेगळाच थाट असायचा
सगळंयाच्या भेटी गाठी करण्यात पहिला दिवस संपायचा
साधी भोळी माणसे, जरी बोली होती अशुध्द
किती गोडवा असे त्यात, आणि मायेने समृद्ध
म्हातारे आजी आजोबा जेव्हा प्रेमाने जवळ घ्यायचे
वर्षभराचे अंतर त्या मायेच्या एका स्पर्शात संपायचे
आपण कितीही शिकलो, मोठी पदवी जरी घेतली
पण आपली परंपरा आणि संस्कृती खरतर त्यांनीच जपली
ते सुट्टीचे दिवस जायचे खुप खेळण्यात नि कोड कौतुकात
परतीचा दिवस उजाडल्या वर मात्र खंत मनात नि अश्रू डोळ्यांत
आता कधीच ती ऊन्हाळ्याची मोठी सुट्टीच येत नाही आणि गावी जाणे होत नाही
गावदेखील शहरासारखे बदलल्याचे ऐकलेय, पण मनात कोरलेले त्या वेळचे चित्र कधीच बदलणार नाही