Sarita Sawant Bhosale

Others

1  

Sarita Sawant Bhosale

Others

रक्षाबंधन : राखीतील प्रेम

रक्षाबंधन : राखीतील प्रेम

3 mins
917


रक्षाबंधन जवळ येतेय. सगळीकडे राख्यांची लगभग चालू आहे. दुकानाभोवती मोठ्या दिमाखात, नटूनथटून उभ्या राहून त्या डोकावतायत आपल्याकडे. या मला घेऊन जा आणि भावाच्या हातांवर बांधा आणि काय मागा हवं ते भावाकडून. वर्षातून एकदाच येते मी, भावाला आठवण करून द्यायला की आहे रे तुझी पण एक बहीण तिचा पाठीराखा म्हणून कायम सोबत राहा तिच्या. अस त्या ऐटीत सांगत असतात. रक्षाबंधन आहे म्हंटल्यावर भावाला राखी पाठवायचं प्रयोजन चालू होतं. नवरोबाला म्हंटले," एक भाऊ बंगलोरला आहे तिकडे राखी पाठवू. बाकी दोघे मावस भाऊ आहेत, तस नात्यानेच मावस पण आहेत सख्खेच. तर त्या दोघांना आईला तिकडेच सांगते घे आणि दे. तिकडे आणि कधी पाठवत बसू. प्रश्न सख्खे मावस असा नाही तर अनायसे आई आहे तिकडे तर देईलच ती. उलट ते दोघे जास्त जवळचे आहेत माझ्या." नवरोबांनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले," पाठव न पाठव तुझा प्रश्न आहे पण बहीण राखी पाठवताना फक्त राखीच पोहचत नाही भावापर्यंत तर त्या बहिणीच प्रेम, जिव्हाळा, माया, काळजी, आपुलकी सगळ्या भावना पोहचतात. तू राखी पाठवणं आणि आईने तिकडे नेऊन देणं यात जमीन आसमानाचा फरक आला. एका आईने मुलाला वाढवणे आणि कोणी दुसऱ्या नातेवाईकाने वाढवणे यात जेवढा फरक तेवढाच बहिणीने भावाला राखी पाठवणे आणि कोणी दुसऱ्याने ती देणे यात आहे. तुझा बंगलोरचा भाऊ खूप खुश होईल, कदाचित त्याचे डोळे पाणावतीलही तुझी राखी हातात पोहचताच पण ते दोन भाऊ म्हणू शकतील ताईला आता आम्हाला राखी पोहचवायलाही वेळ मिळत नाही का? राखी हे फक्त एक निमित्त झालं, पण या एका क्षणाने तुमच्यातील नात्याची वीण अजून घट्ट होते. राखीच्या त्या धाग्याने तुमचं नात अजून दृढ बांधलं जात. तेव्हा राखी दोन्हीकडे पाठवायच्या". नवरोबांच ऐकून माझे डोळेच उघडले. रक्षाबंधनचा अर्थ नव्यानेच समोर आला आणि काही जुन्या आठवणीही डोळ्यासमोरून तरळून गेल्या. मागच्या वर्षी घरच्या कामांमुळे थोडा उशीर झाला राखी बांधायला तर तिघेपण नाक फुगवून बसले होते. "ही वेळ आहे का राखी बांधायची? सकाळची संध्याकाळ झाली तरी राखी नाही हातात"अस म्हणून चांगलाच त्रास दिलेला आम्हा बहिणींना. शेवटी मनधरणी करून राखी बांधून घेतली आणि सगळ्यांना हवं ते गिफ्टपण मिळालं. गिफ्टवर तर हक्क असतो बहिणींचा. खरं आहे भावाबहिणीच नात खेळकर, खोडकर, मजेशीर आणि प्रेमाने भरलेलं असत. दाखवत नसले तरी भावांना काळजी असतेच बहिणीची आणि ते त्या सासरी जात असताना त्यांच्या डोळ्यात दिसत. किती भांडण, चिडवचिडवी, मस्ती, मारामारी काही झालं तरी आई बाबा एकाला बोलत असले की दुसऱ्याला दया येतेच आणि एकमेकांच्या बाजूने एकमेकांसाठी बोलतातच. आपली भारतीय संस्कृती खरंच खूप अदभुत आहे जिथे प्रत्येक नात्याचा सण साजरा करता येतो. हाही भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आनंदाने सगळे साजरे करतात. कितीही दूर असले तरी त्यादिवशी भेटून हा दिवस साजरा होतोच आणि काहींना भेटणं शक्य नसेल तर प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, माया आणि थोडी मस्ती या राखीसोबत बांधून पाठवतात. अलगद डोळे ओले झाले आणि तीन राखी आणून तिघांना पाठवल्यासुद्धा. नवरोबाचे धन्यवाद मानायला नक्कीच विसरले नाही,रक्षाबंधन नव्याने उमगवले म्हणून. तुमची तयारी कुठपर्यंत आली मैत्रिणींनो? तुमच्याही या नात्याच्या काही आठवणी,अनुभव नक्कीच असतील. शेअर करा कंमेंट्स मध्ये. आणि आनंदाने साजरा करा रक्षाबंधन.



Rate this content
Log in