रक्षाबंधन लेख स्पर्धा
रक्षाबंधन लेख स्पर्धा
श्रावण महिना लागला कि,आम्हां सगळ्या बहिणींना वेध लागतात ते रक्षाबंधन सणांचा. आपल्याला एक भाऊ असणं म्हणजे खुप अभिमानाची गोष्ट असते. कारण,आयुष्याला सामोरे जातांना बऱ्याच वेळेला आपण एकटेच पुरे पडतो असे होतच नाही. तेंव्हा,आपल्या पाठीराखा, सच्चा मित्र असणाऱ्या भावांकडून मिळणारा प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष मानसिक आधार आपल्याला बरेच काही देऊन जातो. आपल्याला एक भाऊ असणं हि भावना , त्यांच्याशी जोडलं गेलेलं नातं कठीण प्रसंगी लढायला खुप बळ देऊन जात. जगातलं सर्वांत रेशीम आणि तेवढंच हळवं नातं कुठलं असेल तर ते भाऊ-बहिणीचं असत. आम्हां तिघं भावंडाचं देखील तसंच नातं आहे. मी माझ्या भावांपेक्षा लहान असल्यामुळें त्यांचा माझ्यावर खुप जीव आहे. आम्ही लहान असतांना तो माझ्यासोबतं भरपूर खेळायचा. मिळालेलं एखादं चॉकलेट देखील न विसरता मला दिल्याखेरीज खायचा नाही. सायकल खेळतांना सुध्दां मला त्यांच्या मागे बसवुन मला फिरवून आणतं असत. अश्या त्या छोट्या-छोटया गोष्टीमुळे तेंव्हापासून ते आत्तापर्यंत घडलेल्या प्रत्येक गोष्टींच्या घटनेमुळे हे नातं अधिक घट्ट झाल्यासारखं जाणवत. आणि अश्याच आमच्या नात्याला अजुन मजबुत आणि सूंदर बनविण्यासाठी रक्षाबंधनाचा सण येतो. यादिवशी बहीण आपल्या भावाला हातांवर राखी बांधून त्यांस दीर्घआयुष्य व सुख लाभो ह्याकरिता प्रार्थना करते. आणि तिचा दादा ह्या सणांची आठवण म्हणून एक छान गिफ्ट तिला देत असतो. ह्यावेळेस मात्र आम्ही दोघी बहिणींनी दादाला गिफ्ट द्यायचं ठरवलं. ते देखील जरा वेगळं. जे आमच्या नात्यासारखं सदा टवटवीत आणि ताजेतवाने राहील. ह्या इच्छेने, विचाराने,त्याला आम्ही गुलाब आणि शेवंतीचे रोपटे भेट म्हणुन दिले. ज्याप्रमाणें ते वाढेल आणि त्यांचा सुगंध दरवळत राहील. तो पर्यंत आमचं नातं असंच राहिलं कायमसाठी . .