Priya Bhambure

Others

3  

Priya Bhambure

Others

बालपण

बालपण

2 mins
220


 बालपण जगातील सुंदर आठवण.असं म्हणतात, आयुष्यात कोणतीच गोष्ट आपल्याला कायमची मिळतं नाही. तेव्हा त्यांच्या मागे उरतात त्या फक्त आठवणी. आठवणी आपल्या प्रत्येकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक असतो.ह्यां आठवणींमुळे कधी ओठांवर हसू येतं नाहीतर डोळ्यांत वेदनेने पाणी .पण,तरीसुद्धा आठवणी आयुष्यात हव्याच असतात. त्यामुळें जगण्याला एक वेगळं वळण मिळते. माझ्या आयुष्यात सुध्दां लहानपणीच्या बऱ्याच अश्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यामध्यें एक आठवण दिवाळीची आहे. माझ्या आक्का(आजीशी ) निगडित. असंच एकदा आम्ही सारेजण दिवाळी मध्ये जमा झालो. यंदाची दिवाळी आजी कडेच जाऊन करायची असं ठरवून जमलो होतो.त्याचबरोबर कलेची आवड प्रत्येकाला असल्यामुळे आम्ही दिवाळीचा आकाश कंदील,पणत्या, किल्ला बनवण्याचं असं ठरवल होतं. त्याप्रमाणे आम्ही बच्चे कंपनी आणि घरातले मोठे कामाला लागलो. माझ्या आईने शंखाच्या आकाराचा आकाशकंदिल बनविला. आणि त्याचबरोबर आईस्क्रीमच्या काड्याचा देखील एक लॅम्प बनविला. मातीचा किल्ला बनविण्याचं काम आम्हां लहानांकडे सोपविलं . स्वतःच्या हाताने हे सर्व बनवण्याचा यंदाचा आनंद काही निराळाच होता. आणि त्यांत आजी -आजोबांकडे म्हटंल्यावर तर काही विचारूच नका! सगळेजणं अगदी मजेत होते. आक्का-आबांच्या चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद दिवाळीतील मिळणाऱ्या प्रत्येक दिव्याच्या उजळून टाकणाऱ्या त्या प्रकाशासारखा होता. हे बघून आम्हांला फार वेगळं वाटतं होतं . त्या त्या दिवसांची गंम्मत, तो उत्साह आणि त्या आठवणी आयुष्याला वेगळं वळण देत होते. आणि मोठा सण असल्यामुळें साहजिकच नटणं - थटणं तर आलच. आणि त्यांत प्रत्येक वयोगटातील स्त्री हि आवर्जून भाग घेते. कारण,प्रत्येक स्त्रीला नटणं हे आवडतंच असतं. आणि त्यांत दागिन्यांशी तिचं एक वेगळंच नातं असत.तिला ते सर्वात प्रिय आणि मौलिक वाटतं असतं. दागिना प्रिय नाही अशी जगांत कोणतीचं स्त्री आढळणार नाही. कारण, स्त्रीचं सौदर्य अलंकारा शिवाय अपुर्ण असतं. इतर वेळेस जरी मोजकेचं घालतं असली तरी सुध्दा सणांवाराच्या वेळेस तर हमखास ठेवणीतले दागिने बाहेर काढुन,हवे असल्यासं पॉलिश करुन नक्की घालते. मला देखील नटण्याची खुप आवड आहे.त्यामुळें तिने मला तन्मणी घेऊन दिला .मी पण छान नऊवार घालूंन माझ्या दागिन्यांसोबत तिने दिलेला दागिना घातला त्यादिवशी मला खूप वेगळं वाटतं होत. तिची ही मिळालेली आठवण माझ्यासाठी खूप अनमोल होती. आज जेव्हा परत सणांच्या निमित्ताने मी तो दागिना काढते. तेव्हा डोळे पाण्याने अलगद भरून येतात. कारण, आता ती आमच्यासोबत दिवाळीसाजरी करायला नव्हती. चार वर्षापुर्वी वार्धक्यामुळे खचलेल्या तब्बेतीमुळे ती खुप आजारी पडली.आणि तीने ह्या जगाचा निरोप घेतला. आणि आम्ही पोरक झालो.आम्हांला मायेने जवळ घेऊन डोक्यावरुन फिरणारा तिचा स्पर्श,ती कुशी मनाला खुप हेलकावणी देऊन जातो. पण, ह्या तनमणीच्या रूपात तीचं सर्व काही अनुभवायला मिळतं. 


Rate this content
Log in