पाऊस एक अनुभव
पाऊस एक अनुभव
पहिला पाऊस, पहिली सर
पहिल्या सरीतला, मृदुवाल गंध
गंधातुनी उमटलेला, आनंदी तरंग,
तरंगातुनी भिजलेले, ते ओलेचिंब अंग
अंगावरुनी नितळलेले, मनाला स्पर्शलेले ते पाऊसथेंब
पहिला पाऊस पहिली सर...
पाऊस कोणाची आठवण ताजी करतो, कोणाला आठवणीत पडायला भाग पाडतो ,पाऊस कोणाचा आवडता असतो. अथवा नावडता. कारण, काहीजणांना ती झालेली चिकचिक आवडत नाही. पण,असे फार कमी आढळतात. तो बहरलेला निसर्ग, मातीचा तो धूंद सुवास, त्यांत गरम बटाटेवडा आणि हातात कॉफीचा वाफाळता कप. वा किती मस्त वाटत. पाऊस हा असा विषय जो कधीही संपत नाही. खास करून कवीसाठी . त्यांना ह्या मोसमांत असंख्य काव्य करायला सुचतात.भटकंती करणाऱ्यांना छान स्पॉट मिळतात. आणि त्या पावसाबरोबर खूप साऱ्या आठवणी जमा करून आपण ते क्षण पुढचा पाऊस येईपर्यंत तसेच जपून ठेवतो. माझ्या देखील मनात अशीच एक पावसाची आठवण आहे. तेव्हा आम्ही मुबंईला होतो. मुबंईचा पाऊस तर सगळ्यांनाच माहित आहे. तो त्यांना काही नवा नाही. ते पाणी भरणं, लोकल स्लो चालणं,कधी बंद पडणं, घरात पाणी येणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नेहमीच्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना काही वाटत नाही. पण,आमची नुकतीच तिथे बदली झाली होती. पावसाबद्दल अश्या गोष्टी ऐकलेल्या असल्याने थोडी धास्ती, आणि त्या पावसाची मजा पण घ्यायची ह्या दोन गोष्टीत खूप तारांबळ उडत होती. असाच मगपावसाने सुरुवातीला थोडा थोडा करून बरसल्याने त्याचा आनंद तर घेता आला. पण, नंतर दोन दिवस सतत पडल्याने मात्र खूप पाणी जमा व्हायला लागले होते. अक्षरशः गॅलरीच्या भितीच्या पातळीएवढे पाणी साचले. रस्त्यावर देखील तीच हालत होती. आणि आम्ही दोघी बहिणी क्लासला गेलो होतो. लोकल देखील बंद पडल्यामुळे मग पायी पायी येत आमचं घर गाठलं. घरी पोहचते पर्यंत मात्र जीवात जीव नव्हता. कसे हे लोक ह्या पावसात असे बिधास्त राहू शकतात. ह्याच मात्र मला कोड पडलं? कारण, त्या परिस्थितीमध्ये देखील त्याचा आनंद आनंदून घेणारे मला भेटले. आजही जेव्हा पाऊस पडायला लागतो . त्या पावसाच्या आठवणीने मन कुठे विसावत,तर कुठे पोटात गोळा आणतो. पण आजही तेवढाच मनांत घर करून गेलेला तो पाऊस बरेच काही शिकवून पण, गेला आणि बरेच काही सांगून सुद्धा...