मृत्यू
मृत्यू
मृत्यू एक विचार, भिती की सत्य? मृत्यू एक अटळ सत्य! कधीच असत्यात परिवर्तन न होणारे. एका प्रवासाला घातलेल्या लगामाची निश्चित अधोरेखित केलेली रेख! इहलोकीच्या मार्गक्रमणाचा शेवटचा टप्पा. कधी विचार नाही केला तर खुप सुंदर प्रवास आहे पण, प्रत्येक वेळेस आठवण काढली तर प्रवासात यातना आहेत. जन्म झाला तर मृत्यू आहे पण तरीही मनुष्य घाबरतो हे एक आश्चर्य आहे. ही एक अशी वेळ आहे, ज्यावेळी आयुष्याचे पुस्तक लिहिता लिहिता नियतीच्यादेखील लेखणीमधील शाई संपून जाते. हे पुस्तक असे आहे की ज्याला अनुक्रमणिका आहे पण पानांना नंबर नाहीत. प्रत्येकाकरीता वेगवेगळी बांधणी! विज्ञान आणि अध्यात्म या दोन वेगवेगळ्या नजरेतून मृत्यूची संकल्पना खुप वेगळी आहे. इहलोकीच्या प्रवासाकरीता आत्म्यास फक्त शरीराचा आधार असतो आणि जेव्हा आत्मा निघून जातो तेव्हा उरते ते फक्त स्तब्ध शरीर. पण, यास विज्ञानाची मान्यता नाही. विज्ञानाच्या दृष्टीकोनातून आपल्या आकाशगंगेतील पृथ्वी आणि त्यावर रहाणारे आपण सजीव आणि मग त्यांच्या उत्क्रांती मध्ये होत गेलेले बदल आणि सजीवतेचा शेवट म्हणजे मृत्यु एवढीच काय ती संकल्पना. पृथ्वी, जल, वायू, आकाश आणि अग्नी या पंचमहाभूतांचे मिश्रित आपले शरीर आहे. अधिष्ठाता भगवान विष्णु असणाऱ्या गरूड पुराण मध्ये जीवनाचे संपूर्ण सार साचेबद्ध पद्धतीने मांडले आहे पण, जिवंतपणी गरूड पुराण वाचल्याने आपत्ती ओढवते या अंधश्रद्धेपायी जास्त कोणी समजून घेण्यासाठी धजवत नाही.
हिंदू धर्म असो किंवा इतर धर्म, मृत्यू पावल्यानंतर विधीवत अंत्यसंस्कार करून त्याच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते. काहीं मध्ये दफन करण्याची रीत आहे. सध्या एका कंपनीने अशी तरतूद केली आहे ज्यामध्ये शरीर दफन केल्यानंतर त्यासोबत बी सुद्धा पुरायचे , कालांतराने झाड तयार होऊन नक्कीच पर्यावरणाचा नाश कमी होण्यास मदत होईल. त्याउलट काही ठिकाणी मृत शरीर जतन करूनही ठेवले आहेत जेणेकरुन भविष्यात पुनश्च जीवीत करायचे सुञ निघालेच तर! आणि काहींनी आपली नोंद ही केली आहे! हे कितपत योग्य आहे? शोध लागेल की नाही ते पुढील गोष्ट आहे पण, यामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याची भिती रहाते. मृत्यू एक सत्य आहे. शरीर जरी नष्ट झाले तरी काहीजण कायम मनात रहातात. हे महत्वाचे नाही की तुम्ही किती जगलात, पण कसे जगलात हे नक्कीच महत्वाचे आहे. असे म्हणतात की किती लाखो जन्मानंतर मानव जन्म प्राप्त होतो. नक्कीच अशी सुवर्णसंधी प्रत्येकास लाभत नाही. मग एक चांगले काम करून, चांगले विचार मनाशी का बाळगत नाहीत? नक्कीच आपला मानव जन्म आपल्या हातून एक चांगले कार्य मार्गी लावण्यासाठी झाला असणार. तेच कार्य आपल्याला शोधून काढून आयुष्यात चांगले कामे करणे गरजेचे आहे. मृत्यू सत्य जरी असले तरी ते भविष्यात घडणारे आहे, मग त्याचा विचार आतापासूनच करून जीवन जगण्याचा आनंद का घालवायचा? माणुस जीवनात खूप सारे कमवतो. जगतो ते पण दुसर्यासाठी. मरताना सुद्धा त्यास चिंता लागुन रहाते की माझ्या मागे काय होईल. अंत्यविधी करताना एक प्रथा आहे ज्यानुसार मृत व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले जातात. कावळ्याने ते शिवले तर आत्मा शांत पण नाही शिवला तर आत्मा अशांत आहे, त्याच्या काही इच्छा अपुर्ण राहिलेल्या आहेत. आत्मा आहे की नाही हे माहीत नाही. पण अध्यात्म नुसार आत्मा पवित्र आहे मग निष्फळ इच्छा उराशी बाळगून त्या आपल्या स्वतःच्या पवित्र आत्माचे रुपांतर भयावह भुतात का करावे? माणसाने इच्छा आकांक्षा नक्कीच बाळगल्या पाहिजेत पण त्यामागे किती धावायचे, काही गोष्टी प्राप्त नाहीत झाल्या तर आयुष्यभर उदास रहावे का ते आपल्या हातात आहे. आयुष्य आपले आहे, ते आपल्या पद्धतीने जगले गेले पाहिजे. जेवढे आयुष्य सुंदर कराल तेवढा सुंदर मृत्यु सुंदर असेल. महाभारत पाहताना एक प्रश्न मनात येतो की, पितामह भिष्मांना इच्छामरण चा वर प्राप्त होता, मग बाणांच्या मृत्यूशयेवर असूनही त्यांनी मरण लवकर का मागितले नसेल? महाभारताचे साक्षीदार ठरले ते.
अनेक महापुरुष होऊन गेलेले आहेत ज्यांनी आपले आयुष्य लोकांसाठी खर्ची केले आणि अंत एकदम निर्घृणपणे, हालांत झाला. ते जर मृत्युचा विचार करीत बसले असते, घाबरले असते तर महान कार्य कधी घडलेच नसते. आपण तर सामान्य मनुष्य, तरी पण एक गोष्ट मनाविरुद्ध झाली तरी आत्महत्येचा विचार मनात यावा? जीवन एवढे सोपे नक्कीच नाही. जेवढे ते जगणे अवघड आहे त्याहुन जास्त ते संपविणे. माणुस कधीच एकटा नसतो त्यामागे किती गोष्टी, बंधने जोडलेले गेलेले असतात. ज्याचे मन सुरक्षित नाही, तो आपल्या मनाचा मालक नाही, मनात वाईट विचार जागणार आणि जीवंतपणी मरणाचा अनुभव घेणार. कधी कधी भय फक्त मृत्युचे नसते तर, मला पुढील कोणता जन्म प्राप्त होईल? पुढील आयुष्य कसे असेल? याचे ही रहाते. माणुस आताच्या क्षणात नव्हे तर भविष्यातील आनंद आता शोधण्याचा प्रयत्न करतो. आयुष्य पैसा कमविण्यात जाते आणि जाताना सोबत काय असते? जेवढा कमी विचार तेवढा सुंदर प्रवास! घाबरट व्यक्ती मृत्यूच्या आधी कितीतरी वेळा मरतो पण, शुर लोक मृत्युचा आस्वाद एकदाच घेतात.