इंद्रप्रस्थ - भाग 1
इंद्रप्रस्थ - भाग 1
द्वारकाधीश 'श्रीकृष्णांचे' वीर धनुर्धर 'अर्जुन' यांच्या समवेत प्रथमच कलियुगास प्रस्थान.....
अर्जुन - असे अचानक आपले येणे कलियुगवासीयांच्या किती पथ्यावर पडेल हे आपणच जाणता माधव...
माधव - त्यात जाणायचे काय आहे पार्थ? समस्त विश्वाचा तारणहार मी...सर्व जाणकार मीच... युगेयुगे चालत आलेल्या धर्म आणि अधर्म लढ्यातील सारथी तो मीच! चिंता नसावी, दैवास जाणणारी दृष्टी अजून तरी मनुष्यास लाभली नाही...
अर्जुन - परंतु, माझे काय माधव? मी ही एक मनुष्य आहे. मी नाही का दृष्टीस येणार?
माधव - एक विसरतो आहेस तु पार्थ, पंचतत्वात विलीन झालेला एक आत्मा आहेस तु.. आणि आत्म्यास आपल्या दृष्टीक्षेपात बांधून ठेवणारी नजर विध्यात्या शिवाय तरी इतर कोणास प्राप्त नाही!
अर्जुन - माझी मोठी चिंता दुर केलीत आपण. चला आज पुनश्च आपणासमवेत भ्रमणाचा योग आलाच.. मी आपलं इंद्रप्रस्थ प्रथम पाहणे अधिक पसंद करेल, आणि माधव आपण?
माधव - मी? माझे काय त्यात? अख्खे ब्रम्हांड सामावलेले आहे माझ्यात. खरे परिवर्तन तर मी आजवर अनुभवत आलेलो आहेच..
अर्जुन - आपणासाठी अशक्यप्राय ती गोष्ट कोणती? आणि हो मला वाटतं आपणासारखं साजेस आणि मादक सौंदर्य क्वचितच परत कुणास प्राप्त झालं असेल. जरा जपून हं माधव...
माधव - हो काय? मला तर वाटलं तूच परत आणखी माशाचा डोळा भेदण्यास आसुसलेला असशील.
अर्जुन - काही ही काय माधव... आता परत एक महाभारत करायचे त्राण नाहीत हं माझ्यात....
माधव - भेदलास तरी आता सारथ्य मी काही करणार नाही...
माधव - काय मग इथे राहूनच इंद्रप्रस्थ अनुभवायचा आहे काय?
अर्जुन - कसे निराळेच वाटते आहे सगळे.. खुप परिवर्तन झाले आहे..असे वाटते या मनुष्याहून चार पावले अत्यंत मागे आहे मी.. हे माझे वस्ञ, माझे रहाणीमान या घडीस कसलेच साधर्म्य दाखवत नाही माधव.. रंगभूमीवर सादर होणाऱ्या कलेतील पाञासारखा भासत आहे मी!
माधव - खरेच पार्थ, मती युगेयूगे साथ देत नाही म्हणतात ते हेच..
अर्जुन - काय बोध माधव?
माधव - अरे वेड्या अदृश्य आत्म्यास कोण पाहणार? मग चिंता ती कसली?मनाचे घोडे विखरूदेल दाही दिशां फक्त वेग मात्र हातात ठेव..
अर्जुन - कधी कधी आपले कोड्यातील बोलणे अनाकलनीय होते माझ्याकरीता... तसे नाही माधव.. या दोन युगातील अंतर मला अनुभवायचे आहे.. आजचा अर्जुन... आजचे सारथ्य... आजचे विश्व आणि स्वः अनुभवायचा आहे.. कृपया काही काळाकरीता आपण मला देह अर्पण करावा माधव..
माधव - ते शक्य नाही पार्थ.. जरी मी विश्व मालक असलो तरी मीही सारथी आहे नियतीचा.. नियतीच्या बंधनात मी ही बांधलो आहे...
अर्जुन - आपणास अशक्य ती गोष्ट कोणती माधव?
माधव - आज तू मला नियतीच्या विरोधात उभा केले आहेस.. मी तुला देह नाही अर्पण करू शकत. मृत्यू एक अटळ सत्य आहे. कळीच्या फुलामध्ये परिवर्तित प्रवासाचा काळ मार्गदर्शक विधाता! परंतु तिच्या अंकुरीत आणि विखुरण्याच्या प्रवासाची साक्षीदार मात्र नियतीच आहे!
माधव - मी तुला देह तरी अर्पण नाही करू शकत पार्थ परंतु, कालानुरूप परिवर्तित जगाची बांधणी समजण्याची उमज नक्कीच देऊ शकतो.... तथास्तू!