माझे गाव माझे घर
माझे गाव माझे घर
पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामध्ये करंजखोप नावाचे एक छोटेसे खेडेगाव आहे. ते माझे जन्म ठिकाण आहे. आम्ही तिघी बहिणीच असल्यामुळे लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी राहतो. आणि आई-वडिलांना जाऊन पंधरा वर्षे झाले. सदर राहते घर आम्ही दुसऱ्याला विकले आहे व ती लोक सुद्धा आता तेथे कोणी राहत नाहीत पुण्यात राहतात .
पण जन्मगावाची आणि जन्म घराची ओढ काही केल्या सुटत नाही. जेव्हा खूप वर्षाने आम्ही तिघी बहिणी आमच्या माहेरी गेलो आणि बंद घर बघून खूपच रडायला आले ,तिथे साऱ्या लहानपणाच्या आठवणी साठलेल्या आहेत. आई-वडिलांचा वावर, त्यांची प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट आठवते .जोपर्यंत माहेरी आई वडील होते तोपर्यंत गावी जाण्याची ओढ होती आता राहिली नाही. आमच्याकडे विठ्ठलाचे देऊळ पूजेला होते त्यामुळे आम्ही खूप वर्षांनी गेल्यानंतर प्रथम त्या विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवले आणि तिघी बहिणी त्याच्या पायावर डोके ठेवून ढसा ढसा रडलो." विठ्ठला मायबापा आता तूच आमचे आईबाप तुझ्याशिवाय या गावात आता आमचे कोणी नाही"
त्या प्रसंगानंतर वर्षातून किंवा एक-दोन वर्षातून मी माझ्या माहेरच्या गावाला जाते. तिथल्या बंद घराच्या बंद दरवाज्यात बसते ,आई वडिलांची आठवण येते. त्या घराचा चिरा-चिरा परिचयाचा होता. प्रत्येक वस्तू परिचयाचे सारं जागच्या जागी जस्साच्या तस आहे. पण त्यात माझे आई-वडील नाहीत डोळ्यात थोडंसं पाणी येतं आणि विठ्ठलाच्या पायावर जाऊन डोके ठेवते तिथून थोडीशी ऊर्जा मिळते पुन्हा पुढच्या वर्षी परत येण्यासाठी.