*काहे दिया परदेस*
*काहे दिया परदेस*
अभिनंदन जोशीकाकू!!! बातमी ऐकली ती एकदम शंभर टक्के खरी ना, आपल्या सायलीचे लग्न ठरलं म्हणे आणि तेही परदेशातल्या मुलासोबत...उड्या मारतच सायलीची मैत्रीण नितु घरात आली आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपतच जोशी काकू म्हणाल्या ,,"हो ग बाई आता तुझी मैत्रीण लवकरच विमानात बसून सातासमुद्रापार जाणार हो."हे बोलताना एकीकडे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर दुसरीकडे लेकीचा विरह हे दोन्ही भावनांचे तरंग त्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते . सायली आणि नीतू दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी लहानपणापासूनच एकत्र वाढल्या मोठ्या झाल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी आणि दुखाच्या क्षणी तिची मैत्रीण तिच्या पाठीशी अगदी ठाम उभी...
बरं जोशी काकूंना एक समाधान होतं की मुलगा मूळचा इथलाच घरचे सगळे चांगले फक्त नोकरीसाठी तो तिकडे गेलेला पण संस्कार सगळे इथलेच.
नुकताच सायली चे शिक्षण पूर्ण झालं आणि एक-दोन महिन्यातच हे स्थळ आलं सायली उच्चशिक्षित दिसायला सावळी पण देखणी उंचीपुरी तसा कुलकर्ण्यांचा सौरभ देखील अतिशय हुशार स्कॉलरशिप वर आपला अभ्यास पूर्ण करून कॅम्पस सिलेक्शन तेही परदेशात आणि दिसायला पण राजबिंडा. दोघांची जोडी अगदी शोभून दिसत होती.
मुलाला मुलगी आवडली आणि काही दिवसातच थाटामाटात लग्न सोहळा देखील पार पडला आणि नंतर चे सगळे देवकार्य आटपून निघायचे दिवस आले तसं सायली आणि सौरभ दोघांच्या आईचे डोळे पाणावले.
सायली जाणार तसा सौरभ देखील आई-वडिलांना सोडून जाणार होता पण आता सौरभ च्या आईला सौरभ ची काळजी नव्हती त्यांनी सायलीला दोन-तीन महिन्यांत त्याच्या आवडीनिवडी आणि इकडच्या चालीरीती सगळे व्यवस्थित समजून सांगितलं आणि सायलीने देखील तेवढेच प्रेमाने ते आत्मसात केलं दिवस ठरला.
जोशी काकू काका आणि नितू तिला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन तिला भेटायला आल्या आणि सायली ला निरोप देताना आईची घालमेल बघून ,सौरभ अगदी हात जोडून नमस्कार करताना म्हणाला, ," सायली ची काळजी तुम्ही नका करू सायलीला अगदी फुलासारखे जपेन राणी सारखं ठेवणे." हे त्याचे आश्वासक शब्द आणि डोळ्यातल्या त्याच्या विश्वासाने जोशी काकूंच्या चेहऱ्यावर हसू उमटलं
सगळ्यांचा निरोप घेऊन सायली सौरभ निघाले एका नव्या प्रवासाला सायलीच्या मनात अनेक स्वप्नांचे मनोरे रचू
लागले एकमेकांच्या साथीने समजूतदारपणे संसार फुलू लागला. सुरुवातीला एक दोन वर्षात भारतात येणं व्हायचं आल्यावर सगळ्यांच्या गाठीभेटी व्हायच्या त्या आठवणीने पुढची काही वर्षे सहज पार पडायची ,पण नंतर नंतर त्यांच्या संसाराच्या वेलीवर फुल फुलु लागली तेव्हा निमित्ताने कधी सौरभ ची आई बाबा तर कधी सायली तिचे आई-बाबा यांचा जाणं व्हायचं नंतर तेही कमी झालं.
सायली आणि सौरभ ने आपल्या संस्कारातल्या आपल्या शिदोरी तून दोन मुलांना घडवायला सुरुवात केली .
आजी आजोबा त्यांना कम्प्युटर वरच मोठे होताना बघून समाधान मानायला लागली हे हल्ली इंटरनेट मुळे शक्य होतं पण मायेचा स्पर्श आजी आजोबांच्या गोष्टी आजी ची कुशी हे सगळं कुठेतरी ही नातवंड मिस करतात आणि मुलांच्या सुखासाठी मुलांच्या प्रगतीसाठी आपलं मन मारून फक्त त्यांना आठवणीतच भरून भरून पावणारी ही आई-वडील देखील मनातून दुखी असतात; आणि चेहऱ्यावर हसू आणतात.
चित्रात रेखाटा व तसं सुंदर मोठे घर तसेच प्रत्येक सण उत्सव तिकडे सुद्धा सेलिब्रेट होतो जणू मिनी इंडियाज सायली सौरभ सारखे अनेक जोडपी कामानिमित्त तिथं वास्तव्य करतात, आपले एक छोटसं घरकुल देखील बांधतात तिथं सुबत्ता ऐश्वर्य आहे पण पण तरीदेखील ज्या ज्या वेळेस भारतात सणावाराला सायली सौरभच्या घरचे एकत्र येतात त्या त्या वेळेसचा प्रेमाच्या ओलाव्याची कमतरता त्या दोघांना नक्कीच भासते जो आपलेपणा जी मायेची थाप, थट्टामस्करी, भावंडांसोबत ची मस्ती हे कुठेतरी मिसिंग असतं मनातल्या एका कोपर्यात ठेवलेल्या त्या आठवणींना कुरवाळीत सायलीच काय तर अशा कित्येक जणी सहज बोलून जातात काहे दिया परदेस......