हुंडा कोणी दिला?
हुंडा कोणी दिला?
मुलाला मुलगी पसंत, मुलीला मुलगा पसंत,
जरी जुना काळ होता.
तरी एक प्रकारे लव्ह मॅरेजच होते.
फक्त नात्यांमध्ये आणि जातीमध्ये होते.
ही कहाणी आहे दीपक आणि ज्योतीची.
यामध्ये प्रथम रीतसर कांदे पोहे झाले. एकमेकाला बघण्याचा कार्यक्रम ही झाला ,आणि दोघे एकमेकांना पसंत देखील पडले .
घरच्यांकडूनही ग्रीन सिग्नल मिळाला. कोणालाही आडकाठी
नव्हती .
त्याच्यामुळे दोघेजण परस्पर भेटू लागले, हिंडू फिरू लागले ,सिनेमाला जाऊ लागले.
पहिल्यांदाच गेले होते ते टिटवाळ्याच्या गणपतीला गेले.
त्याच्यानंतर सिनेमाला गेले, आता त्या काळामध्ये तरुण मुलं-मुली सिनेमाला कशासाठी जातात? थोडीच त्यांना पिक्चर बघायचा असतो?
आता तर काय सगळ्याच गोष्टींना परवानगी असते. आणि लिव्ह इन रिलेशन मध्ये सगळाच गोंधळ!
तो काळ तसा नव्हता. सगळ्या मर्यादा सांभाळून राहावे लागे, आणि रहात देखील असत .
कारण एकदा लग्न ठरलं आणि जर मोडलं तर ,मुलीचं काही लवकर लग्न होत नसायचं.
झालं! दोन-तीन महिने फिरण्यात गेले .आणि मग साखरपुड्यासाठी मंडळी एकत्र जमली.
तेव्हा असं होतं सकाळी दोन्ही बाजूच्या मंडळींनी एकत्र बसायचं. रीतसर आपल्या अटी शर्ती लिहून काढायच्या, त्यावरती दोन्हीकडच्या माणसांनी सह्या करायच्या.
त्यामध्ये किती तारखेला? किती वाजता?
कोणत्या मुक्कामी? कोणत्या ठिकाणी ?
लग्न करून द्यायचा खर्च कोणी करायचा?
अर्धा अर्धा करायचा, की संपूर्ण खर्च मुलीकडच्यानी करायचा.
मुलीला दागिने कीती घालणार ?
हुंडा किती देणार?
हे सारे ठरवून घेतले जायचे. त्याला याद्या करणे असे म्हणतात .
त्यानुसार लग्न डोंबिवली मुक्कामी, म्हणजे मुलगी तिथेच राहत होती तिच्या गावाला लग्न करून द्यायचे. लग्नाचा संपूर्ण खर्च मुलीकडच्यांनी करायचा, पोशाख मुलाचा मुलांनी, मुलीचा मुलीने ,इत्यादी सारी बोलणी झाली .
आणि अचानक मुलीची सासू हुंड्यासाठी अडून बसली.
मला हुंडा पाहिजे?
पाच हजार हुंडा पाहिजे. तेव्हा पगार होता अडीच हजार, आणि सासूबाईला हुंडा पाहिजे 5000/-
मुलगी पण नोकरीवाली, शिकली, सवरलेली.
ती म्हणाली मी हुंडा देणार नाही.
पाहिजे तर हे लग्न मोडा! सासुबाई म्हणाल्या मला हुंडा पाहिजे.
आणि बैठकीमध्ये वादावादी सुरू झाली.
शेवटी मुलगा हुशार !
त्याने काय केल?
मुलीला म्हणाला "जरा दोन मिनिटं बाहेर ये"
मुलगी तावातावाने बाहेर आली.
हे बघ मला काही सांगू नकोस?
काही झाले तरी मी हुंडा देणार नाही.
तू गोड बोलून माझ्याकडे गळी उतरवू नकोस!
अगं मी काय सांगतो ऐक तर खरं !त्याने शांतपणे सांगितलं .
काय?
त्याने गुपचूप पाचशे रुपयांच्या पाच नोटा तिच्या हातामध्ये ठेवल्या, आणि विचारले आता एक रुपया तरी तू घालशील का?
तेव्हा ती हसत म्हणाली नक्कीच घालेन!
आणि तिने आत जाऊन आपल्या वडिलांच्या कानात काहीतरी सांगितले.
आणि तुम्ही हो म्हणा असे सांगितले.
तिच्या वडिलांना देखील आश्चर्यच वाटले, की अचानक एकाएकी आपल्या मुलींमध्ये हा बदल कसा झाला?
तिच्या म्हणण्यानुसार त्यांनी होकार दिला.
आणि सासूबाईंना हुंडा देखील दिला.
त्या देखील खुश,मुलगी देखील खुश.
परंतु तो हुंड्याचा पैसा कोणी दिला?
हे शेवटपर्यंत दोन्ही घरच्या मंडळींसाठी रहस्यच राहिले.
