दिंडी चालली पंढरी
दिंडी चालली पंढरी
दिंडी चालली चालली
चंद्रभागेच्या तीराला
होतो गजर हरिनामाचा
भक्त नामात रंगला
वर्षभर वारकरी संप्रदाय, या दिवसाची वाट पाहत असतो .
कधी एकदा आपण, विठुनामाच्या गजरात तल्लीन होतो. आणि नाचत-नाचत पंढरीला जातो.
विठूरायाची सावळी मूर्ती डोळ्यामध्ये साठवतो. आपली सुख दुःख त्याला सांगतो, मन भरून त्याचे दर्शन घेतो, आणि पुन्हा परतीच्या रस्त्याला लागतो.
गेले दोन वर्ष झाले या उत्सव सोहळ्याला" ग्रहण" लागले आहे .पण जरी शरीराने आपण दिंडीमध्ये नसलो . तरी आपण मनाने वारी चालतो आहोत.
आपली मानस वारी चालूच आहे, या वारीतले अनेक संत सज्जन, प्रत्येक वेगवेगळ्या मनाच्या प्रवृत्ती आहेत .
आता वारीमध्ये हौशे ,गौशे, नौशे ,सगळे असतात.
पण म्हणून काही वारीला कमीपणा येत नाही .
आता आपल्या बरोबर संतांची मांदियाळी चालत आहे .
एकीकडे "हेचि दान देगा देवा!
तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी हेचि माझे सर्व जोडी
न लगे मुक्ति आणि संपदा
संत संग देई सदा
तुका म्हणे गर्भवासी
सुखे घालावे आम्हासी
म्हणजे हे परमेश्वरा मला मोक्ष नको, मला तू वारंवार जन्माला घाल. परंतु प्रत्येक वेळी तुझे गुण गाण्याची बुद्धी दे. तुझे भजन करण्याची बुद्धी दे. संतांचा संग दे .असे आळवणारे तुकोबाराय ,
दुसरीकडे, ज्यांच्या घरी श्रीखंड्या बनून स्वतः भगवंतांनी बारा वर्षे कावडी ने पाणी वाहिले, पूजेसाठी चंदन उगाळून दिले, असे ते पैठण चे नाथ महाराज जे स्पृश्यास्पृश्यतेच्या पलीकडे गेले होते आणि सर्व भुता ठाई परमेश्वर पाहत होते म्हणून तर त्यांनी काशीहून आणलेले कावड वाळवंटातल्या गाढवाला पाजलेली होती .
एकीकडे सगळ्या जगासाठी "पसायदान" मागणारे,
जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे
अशी परमेश्वराला विनंती करणारे, ज्ञानेश्वर माऊली. ज्यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेताना, आजही अनुभूती जाणवते, आणि खरोखरी येथे पॉझिटिव्ह एनर्जी चा झरा वाहत आहे असे आपल्याला वाटते. असे ज्ञानराज माऊली.
पायरीशी बसून भक्ती करणारे संत चोखामेळा, दक्षिण द्वारापाशी आपल्या कुटुंबातील सर्वच्या सर्व 13 माणसे घेऊन समाधी घेणारे नामदेव महाराज.
संत बहिणाबाई ,सोहीराबाई, जनाबाई, अशा अनेक संतांची मांदियाळी त्यांची विचारधारा बरोबर घेऊन आपण दिंडीला जाऊया.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई,
एकनाथ ,नामदेव,
चोखामेळा, सावता माळी, तोचि आमचा आधार.
किंवा आशाबाईंनी म्हटलेच आहे ना !
विठु माझा लेकुरवाळा
संगे गोपाळांचा मेळा
निवृत्ती हा खांद्यावरी
सोपानाचा हात धरी बंका कडेवरी
पुढे चाले ज्ञानेश्वर
मागे मुक्ताई सुंदर
असं स्वतः विठूमाऊलीनी आपली ही लेकरं आपल्या अंगाखांद्यावरती गोळा करून , ही वारी चालू ठेवलेली आहे.
******†*****†*****†***
आपण आयुष्यभर एक वारी चालत असतो त्या वारीमध्ये ज्याप्रमाणे हौशे, गौशे, नौशे, सामील होतात. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याच्या वारीमध्ये, चांगले-वाईट, हितचिंतक, सुष्ट-दुष्ट, उदार ,चोर, सारी सारी मंडळी भेटतात.
त्यांचा समावेश करत करतच आपण आपल्या आयुष्याचे ध्येय, आपल्या आयुष्याचा शेवट म्हणजे विठू माऊलीची त्याच्या अनुषंगाने आपण चालत असतो.
शेवटी सगळे जीव एकत्र येऊन आपले ध्येय असते
खेळ मांडीयेला /वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
देह अभिमान /विसरली याती
एक एका लोटांगणी जाती
निर्मळ चित्ते, झाली नवनीते
ए पाषाणा पाझर फुटती रे
तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावयास भवसागर रे
***†****†****†"*********
दिंडी, वारी ,आणि आषाढी या गोष्टी मध्ये मी अजून एक माझी आठवण समाविष्ट करू इच्छिते.
ती म्हणजे मी तेवीस वर्ष मनोरुग्णालय ठाणे येथे नोकरी केली.
तेथे आम्ही आमच्या मनोरुग्णांची दिंडी काढत असू.
कमीत कमी 70 ते 100 लोक आमच्या दिंडी मध्ये सामील व्हायचे,
एका रुग्णाला विठ्ठल, एका रुग्णाला रुक्मीणी करून, काही रुग्ण वारकरी बनायचे.
खांद्यावर ,डोक्यावर तुळशी वृंदावन, कपाळी केशरी गंध कस्तुरीचा टिळा बुक्का लावून तयार व्हायचे.
सर्व साजशृंगार भाड्याने ड्रेपरी आणून का होईना, पण रुग्णांना नटवत होतो, सजवत होतो.
त्यांच्या कपाळी गंध केशर कस्तुरी बुक्का लावत होतो. विठ्ठल रुक्मिणी ला मुकुट, पितांबर, रुक्मिणी ला छानशी साडी.
जे असतील ते घरामधील मोत्याचे अलंकार, नकली अलंकार आणून, नटवून, सजवून, आम्ही पूर्ण फीमेल सेक्शन भर आमची दिंडी काढायचो.
पुढे काही ठराविक नर्सेस, आणि आया, हातामध्ये टाळ घेऊन नाचत अभंग म्हणायचो
ऊदा " ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम!
"विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला!
आमच्याबरोबर आमचे रूग्ण देखील खूप आनंदाने सामील व्हायचे, ते देखील टाळ घेऊन नाचायचे, भजन म्हणायचे. त्यांना कोणी मनोरुग्ण म्हणणार नाही इतक्या सुंदर ते दृश्य असायचे
आता मात्र, हा सगळा आनंद सोहळा, मेंटल हॉस्पिटल सोडल्यापासून त्याला मुकले आहे.
आणि त्या काळातील सर्व मावशा, रिटायर होऊन गेल्यामुळे आता कोणी दिंडी काढते की नाही माहित नाही .
आयुष्यात खूप महत्त्वाची दिंडी होती. खुप समाधान मिळत असे.
आम्ही प्रत्येक वार्ड समोर जाऊन, विठ्ठल-रुक्मिणी ला घेऊन उभे राहायचो,
मग त्या वार्डमधील कर्मचारी वृंद, विठ्ठल रुक्मिणी ला ओवाळत असे, त्यांच्या पायावरती दूध पाणी टाकत असे. आणि त्यांच्या वरून उतरून काही पैसे आमच्या झोळीत टाकत. त्यांच्या पाया पडत, अशा रीतीने आम्ही सर्व वार्डमध्ये त्यांना फिरवत असू .
त्यानंतर जे पैसे जमले असतील, त्यामध्ये तेवढीच खिशातील भर घालून, आम्ही रुग्णांना चुरमुरे फरसाण आणून, रिक्रिएशन हाॅल मध्ये कांदा वगैरे कापून सुकी भेळ बनवत असू. आणि शंभर दीडशे पेशंटला ती वाटत असू. अशी ही मजा मजा होती. आता फक्त आठवणी
