Dr.Smita Datar

Others

4  

Dr.Smita Datar

Others

चावडीवर

चावडीवर

3 mins
22.3K


  फेसबुक आणि ट्विटर च्या या आभासी जगात खरच व्यक्त होतात का माणस ? या आभासी जगात वावरणारे मुख्यत: तीन प्रकारचे लोक ...

गट क्रमांक १.   या जगात वावरायचं आहे, पण दबकत दबकत प्रवेश करून अंदाज घ्यायचा आहे की मी इथे यायला योग्य आहे ना? म्हणजे नुसतेच वाचणारे...

गट क्रमांक २. या जगात मुशाफिरी करून सावध ( बहुधा चांगल्याच ) प्रतिक्रिया देणारे. थोडक्यात मित्र मैत्रिणींशी साट लोट अबाधित ठेवण्यात मग्न असलेले पामर आत्मे.

गट क्रमांक ३.  हे जग आमचच आहे, आम्ही लिखाण पोस्टल नाही, तर फेसबुक चा मार्क झुकेरबर्ग कंगाल होईल अशी खात्री बाळगणारे, फेसबुक ..ट्विटर ची रोजची वारी करणारे वारकरी . यांच्यात माशी शिंकली तरी त्याची बातमी होतेआणि ती वेगाने वारावाही ( viral चा मराठी भाऊ ) होते.मूल झालं , टाक बातमी, ते मोठ झालं , टाक बातमी, लग्न झालं बातमी, लग्न मोडलं ..बातमी . हेच लोक फेसबुक चा उपयोग स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पण बेमालूमपणे करत राहतात. नव लेखक , नव नट यात आघाडीवर आहेत.

                   हाच वर्ग बरेचदा समाजाची दिशाभूल पण करताना दिसतो. गट क्रमांक १., या गट क्रमांक ३ ला आपला आदर्श मानतो.आणि गट क्रमांक १ आणि २ हळूहळू गट कमांक ३ च्या मुख्य प्रवाहात सामील होऊन यथावकाश मुख्य प्रवाहाच्या धारेला लागतात.

                   आणि सुरु होते, पुन्हा एक अविरत स्पर्धा . आपली..आपल्याशीच. विरंगुळा म्हणून सुरु झालेली मन की बात, हलकी होण्या ऐवजी मणामणाचं ओझं वहायला लागते.आणि सुरुवात होते, मानसिक ताणाची. दिवसभरात आपलं हे जनदर्शन कितींना भावलं , याची गणती सुरु होते. स्वतःच्याच बरे वाईट पणाची मापं काढली जातात.

                   गट क्रमांक ३.वाले काही सुदैवी महाभाग यातूनच माणसांची बेट तयार करण्यात यशस्वी ठरतात आणि प्रत्यक्ष भेटतात. या थेट भेटीमुळे ते माणूसपणाचा धागा विणू शकतात. म्हणजे परत प्रवास आभासी जगाकडून भासमान जगाकडेच होतो. हाडा मासाच्या माणसांशी ही भावनांची खेळी जेव्हा खेळली जाते, तेव्हाच नाती घट्ट होतात.

                  म्हणजेच फेसबुक, ट्विटर इत्यादी सामाजिक स्थळ ही फक्त स्थळ राहतात . गरज पुन्हा माणसांचीच लागते.आणि ही स्थळ बनतात फक्त माध्यम . आणि माध्यम हे जीवन असू शकत नाही. ते जगण्याचं साधन असू शकत. व्यक्त होण ही गरज खरी, पण व्यक्त व्हायला लागतो तो ही शेवटी माणूसच.

                 पूर्वी असायची तशी ही चावडी. गाव गप्पा मारण्याच हक्काच ठिकाण .  ही चावडी, हे या सोशल मिडिया वारकर्यांच हक्काच ठिकाण आहे. पण चावडीवर माणसाच खर रूप दिसू शकत का ? का ते फक्त घरात, माजघरात व्यक्त होत? चावडीवर माणस घालतात , ते असतात मुखवटे, तो मुखवटा उतरवून माजघरात वावरतो तो असतो  चेहरा.तेव्हाच त्या चेहऱ्याची खरी ओळख होते. हे समजण्यात यशस्वी झालो, म्हणजे जिंकलं.

                दर काही वर्षांनी समाजात बदल होत असतात. चावडीची नावं बदलतात फक्त. आपण चावडीवर काय आणि किती बोलायचं, हे आपणच ठरवायचं.

              .....मानसोपचार तज्ञ श्रीरंग बेडेकर अनघाशी गप्पा मारत होते आणि डोंगरभर फेसबुक फ्रेंड्स असून एकट वाटण्यार्या अनघाला स्पष्ट दिसायला लागलं होत, भासाच धुकं हलके हलके विरायला लागलं, म्हणून असेल कदाचित.

                                                                                                         


Rate this content
Log in