अन्न हे पूर्णब्रम्ह!
अन्न हे पूर्णब्रम्ह!
अनिल आणि सुनील अगदी जीवाभावाचे मित्र . बरोबरच शाळेत जायचे, यायचे. अभ्यास पण बरोबरच करायचे.
अनील मध्यमवर्गीय , तर सुनील श्रीमंत वर्गामधला. दोघांच्या खाण्यापिण्याच्या सवयी अगदी पूर्णपणे वेगळ्या होत्या. अनिल रोज सकाळी नियमित व्यायाम करे आणि नाश्ता पण दमदार करे. पोहे उपीट तर कधी पराठा फळे अशा पदार्थांची रेलचेल असे. सुनील रात्री टि व्ही बघत बसे. सकाळी उशीरा उठे. व्यायामाला वेळच उरत नसे. संध्याकाळी अनिल वेगवेगळे मैदानी खेळ खेळे. त्याचे शरीर सुदृढ आणि निरोगी होते.अनिल खूप वेळा त्याला खेळायला बोलवायचा पण सुनीलला मोबाईल गेम्स खेळायच्या असल्याने तो येत नसे.
शाळकरी वय हेच खरे तब्बेत कमवायचे वय असते.सुनीलचे खाणे पिणे , दिनक्रम सारेच विसंगत होते ,त्यामुळे त्याला सतत खा खा सुटत असे . अनिल मात्र एकदा खाल्ल्यावर जेवणापर्यंत मधेअधे काही खात नसे. त्याची पचनशक्तीही त्यामुळे चांगली होती.
दोघेही दहावीला आले. सर्वांनी सुनीलला दिनक्रम बदलायला सांगितले पण हा कोणाचे ऐकेल तर ना!! दिवाळी जवळ आली. अनिलचा दिनक्रम व्यायाम , वेळचेवेळी खाणे , मर्यादित वेळ खेळणे त्यामुळे तो अगदी व्यवस्थित होता. सुनीलने फराळावर ताव मारला आणि रोज वेगवेगळे पदार्थ खाऊन त्याचे पोट बिघडले.
अशा अवस्थेत त्याला अभ्यास करणेही अवघड झाले.परिणामी प्रिलीम परीक्षेला त्याला बसताच आले नाही.
सर्व मुलांचे फॉर्म भरायची वेळ आली. सुनीलला आधी पण बेतास बातच मार्क्स होते. मुख्याध्यापकांनी त्याला व वडीलांना बोलावले. वडीलांनी सर्व परिस्थिती सांगितली .माझे ऐकत नाही ,मित्राचे ऐकत नाही. मला काय करावे कळत नाही " बोलताना त्यांच्या व सुनीलच्या डोळ्यांत पाणी आले.
मुख्याध्यापक सर म्हणाले
" तुला अनिलसारखा सोन्यासारखा मित्र मिळाला आहे. त्याचा तू उपयोग करुन घे. तुझ्या सवयी बदल. वेळच्यावेळी ताजे सकस अन्न खा. तुझी तब्बेत चांगली होईल. तू चांगला अभ्यास कर "
वडीलांनी अनिलला बोलावून घेतले. त्याने पुन्हा सर्व सुनीलला समजावून सांगितले .आतता मात्र सुनीलला सर्व पटले. तो घळाघळा रडू लागला .
आता त्याने आपला दिनक्रम बदलला. वेळच्यावेळी खाण्याला , व्यायामाला ,तसेच झोपेच्या वेळेलाही प्राधान्य दिले. दोघे मिळून झटून अभ्यास करु लागले .
परीक्षा जवळ आली तसे अनिलने सुनीलला अजिबात टेन्शन घ्यायचे नाही असे सांगितले. परीक्षा छान पार पडली.
सुट्टीत दोघेही सुनीलच्या मामाच्या गावाला गेले. खूप खेळले. मजा केली.
परत आल्यावर निकाल तोंडावर आला. सुनीलला पेपर चांगले गेल्यामुळे , चांगला आत्मविश्वास होता.
निकाल लागला . अनिलला 85% आणि सुनीलला 78% मार्क्स मिळाले. दोघांनाही आनंद झाला. दोघेही पेढे घेऊन मुख्याध्यापकांकडे गेले
सरांनी दोघांनाही शाबासकी दिली. सर म्हणाले "योग्य व्यायाम आणि योग्य खाणे वेळच्यावेळी घेतले तरच तब्बेत चांगली रहाते. हे तत्त्व तू आयुष्यभर पाळ. दोघेही जीवनात यशस्वी व्हा "असा प्रेमभराने आशिर्वाद दिला.एका विद्यार्थ्याला त्यांनी सन्मार्गाला लावले. डोळ्यातील कृतार्थतेचे अश्रू त्यांनी हलकेच पुसले.