अगंबाई सासूबाई
अगंबाई सासूबाई
आसावरी एक सालस महिला असते. कमी वयातच विधवा होते..एक मुलगा सोहम आणि सासरे ह्यांच्या सोबत राहते. तिची परिस्थिती जेमतेम असते पण ती स्वतःच्या इच्छा आकांक्षाना बाजूला सारून सासरे आणि मुला चे हट्ट पुरवण्यातच धन्यता मानते. मुलाचे लाड पुरवून त्याला पूर्णतः बेजबाबदार बनविते. परिणामतः तो मुलगा म्हणजेच सोहम माझे हट्ट पुरविण्या साठीच आई आहे असे समजून तिला गृहीत धरतो.. सोहम चे लग्न शुभ्रा शी होते. ती अत्यन्त समंजस आणि परखड विचाराची असते. तिच्या लक्षात येते की तिची सासू आसावरी कधीही स्वतःचा विचार करत नाही. दुसऱ्यांसाठी जगण्यातच धन्यता मानते. अभिजीत राजे जे प्रसिद्ध शेफ असतात एकदा आसावरी कडे ओ एल एक्स वर तिच्या सासऱ्यांनी टाकलेला कॅमेरा घ्यायला येतात. तेव्हा आसावरी ला बघताच तिचा साधेपणा दुसऱ्या साठी च जगण्यात धन्यता मानण्याचा तिचा स्वभाव त्यांना आवडतो. आसावरी ही अभिजीत राजेंची मोठी फॅन असते. त्यांच्या टीव्ही वरच्या रेसिपी आवर्जून बघून घरच्यांसाठी बनवते.. अभिजीत राजेंना घरी बघून खुप खुश होते पण सेलिब्रिटी घरी आल्यामुळे भांबावून जाते.. जेव्हा तो तिला सांगतो की तो ओ एल एक्स वर टाकलेला कॅमेरा घ्यायला आला तेव्हा ती नाराज होते कारण तो कॅमेरा तिच्या पतीची शेवटची आठवण असते पण सासर्यांचा मान राखण्यासाठी ती तो देते. आणि नेहमी दुसऱ्याचा विचार करणारी आसावरी ची ही घालमेल अभिजीत राजेंना कळते तेव्हा ते तिला कॅमेरा परत करण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या भेटी गाठी वाढत जातात. आणि अभिजीत आसावरी शी लग्न करण्याचा निर्णय घेतो. ह्या लग्नाला आसावरी च्या मुलाचा आणि सासर्यांचा विरोध असतो पण सून शुभ्रा सासर्यांना मनवून त्यांचे लग्न लावून देते. पण असावरीचा मुलगा सोहम त्या दोघांच्या लग्नानंतर ही खुप त्रास देऊन लग्न मोडण्याचा प्रयत्न करतो. पण सर्व संकटावर मात करून आसावरी आणि अभिजीत राजे लग्न टिकवतात.