आई
आई
माझी आई नावाप्रमाणेच विजयाई होती.पुर्वीचा काळ सूनांना सासरी फार त्रास असायचा. माझी आई माहेरी सावत्र आईच्या हाताखाली दिवस काढले. सावत्र आईने कधीच माझ्या आईला माया केली नाही की जवळ घेतली नाही...द्यायची फक्त त्रासच त्रास....सावत्र आईला मुल नव्हतं पण सवतीची मुलं तीला चांगले वाटत नव्हते या मुलांचा ती सावत्रआई द्वेष करायची. माझी आई नोकरीच्या गड्याच्या घरी चालले म्हणून सावत्र आईची नजर चुकवून शाळेत जायची....शाळेत पण ती खूप हुशार होती.सावत्रआईच्या त्रासात कशी तरी सातवी पर्यंत शाळा शिकली. पुर्वीच्या काळी सातवी बोर्ड परीक्षा पास झाली की नोकरी लागायची आणि आईला मास्तरीन बाईची नोकरी मिळाली पण या सावत्रआईने नोकरी करू दिली नाही...
आईला तीन बहिणी व एक भाऊ होता.आजी व चार लेकरं असे पाचजण सावत्र आईच्या त्रासाला फार कंटाळून गेले होते.माझी आई दिसायला जेवढी देखणी,तेवढीच वाघिणीसारखी धीट होती...आई वयात यायच्या अगोदरच आईचं लग्न बालवयातच मामानी(आईच्या मामांनी) स्वतः करून दिलं...ते ही शेतक-याला माझे वडील दिसायला काळेसावळे पण उंचापुरा,पिळदार मिशा असलेला रांगडा गडी पैलवान होते...
वडीलांच्या घरी पाच बहिणी,दोन भाऊ असे एकूण सात अपत्ये आजीला जिवंत होती.मी लहान असताना आजीच्या तोंडून ऐकायची आजीला तेरा लेकरं होती.त्यातली सात वाचली आणि सहा मेली.माझी आई पाच नंदाना अंघोळीला पाणी काढून द्यावं, स्वयंपाक करावं प्रत्येक नंदेला काय हवं नको ते पहावं...मोठी भावजय आईसारखी असते हे वाक्य नेहमी आजोबांच्या तोंडून आईला ऐकवत असतं...संध्याकाळी दिवा लागला की देवासमोर दिवा लावायचा आणि सासू सास-यांच्या पाया आई पडायची.वाकून नमस्कार करायची...
माझ्या आईला मूल होण्याअगोदरपासून सर्व नंदाची बाळंतपणं, लग्न, पाळणाखेळणा माझ्या आईने केला.आणि आईला माझा मोठा भाऊ झाला.नंतर मी झाले तीन वर्षानी माझ्या पाठीवर लगेचच लहान भाऊ झाला.मला व्यवस्थित चालताही येत नव्हतं तर माझा लहान भाऊ ओल्या अंगातच राहीला.दीड वर्षात दोन मुलं सांभाळनं आईला कठीण जाऊ लागलं पण म्हणतात ना "आईची माया आभाळाहून मोठी" माझी आजी मला आईच्या अंगावरचं दूध पिऊ देत नव्हती...पोरीला काय करायचं म्हणून तोंडची अमृताची धार हिसकावून घ्यायची.पोराला पाज म्हणून मुलाला पाजायला सांगायची मला बाहेर घेवून जायची. एक स्त्री म्हणून बालपणीच माझ्यावर अन्याय झाला आहे.तरीही आजी बाहेर गेली की आई मला चोरून अंगावरचं दूध पाजायची..
माझ्या आईला वेगळं काढून दिलं आजी आजोबांनी कारण "गरज सरोआणि वैद्य मरो" त्यांचं कामं झालं आणि चुलत्यांना बस ड्रायव्हरची नोकरी लागली म्हणून आजी आजोबांनी आई व वडीलांना बाहेर काढलं...आज परिस्थिती फार वेगळी आहे आजच्या काळात मुलं आईवडीलांना घराबाहेर काढतात...तरीही माझी आई डगमगली नाही.रहाण्यापुरतं घर घेतलं आणि वडीलांना लोकांची शेत करण्यासाठी विनवू लागली...घरची शेती वाटून दिली नाही.तरीही आईने तिच्या वडीलांकडून एक म्हैस आणून तीचे दूध विकून आम्हांला घडवलं, शिकवलं आईला नेहमी वाटायचं मी शिकले नाही पण माझे मुलं शिकले पाहिजेत..रात्रंदिवस कष्ट करून एका म्हशीचे चार म्हशी करून दूध विकून माझ्या मोठ्या भावाचं बी.एड् केलं आणि माझं डि.एड् केलं...आणि दोन्ही मुलं नौकरीला लागली. लहान भाऊ मात्र म्हशीना सांभाळायचा म्हणून तो फक्त दहावी पर्यंतच त्याचं शिक्षण झालं...पण आम्ही त्याची जाणीव ठेवून आजही त्याला वेळप्रसंगी मदत करतोय...
शेत वाटून मागितलं की सास-याचा मार दोन वेळा आईनेच खाल्ला.मुलांना चांगले संस्कार दिले.चांगलीच शिकवण दिली.अनूयाविरूध्द पेटून उठवायला आईनेच शिकवणं कारण तीच्यावर लहानपणापासूनच अन्याय होत आला होता.संपूर्ण आयुष्यभर कष्ट उपसून खरे सुखाचे दिवस आई बघणार होती तर नियतीला ते बघवले नाही. माझ्या आईला लिव्हरचा कॅन्सर झाला आणि लिव्हर डॅमेज झाले.
सावत्र आईने शेवटच्या मावशीचे लग्न करू दिले नाहीत तर माझ्या आईने घरी आणून लहान बहिणीचे लग्न केले...इतकी आपुलकी, एवढी माणुसकी,आई मध्ये होती.जो कोणी माणूस तिच्याकडे केला त्याला ती लगेचच मदत करायची आणि आम्हां भावडांना सांगायची की अडचणीत असलेल्या माणसाला मदत करावी "वेळ आली की गाजराचं ही केळ होतं" असे वाक्य आईच्या तोंडून पडायचे..वेळ सारखी राहात नाही असं आई नेहमी म्हणायची...
नियतीला सुखाचे दिवस बघवले नाहीत मोठा भाऊ शिक्षक झाला. मी शिक्षिका झाले आणि आईला आनंद झालेला आता माझ्या कष्टाचं चीज झालं म्हणणारी आई चार दिवस सुखाचे पहायचे म्हणलं तर कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडली.पाण्यासारखा अमाप पैसा खर्च केला.केमोचे डोस दिले.पण आई अठरा महिन्यातच आहे का नाही झाली.मला तर अजूनही विश्वास बसत नाही की माझी आई नाही...माझ्या डोळ्यासमोर हातात हात घट्ट धरला आणि अखेरचा श्वास घेतला...
अख्खं गांव अजूनही नांव काढतं...गल्लीत जर कुणाच्या घरी साप निघाला की आई पकडायची माणसं बाजूला भित भित मागे व्हायचे पण आई पुढे पुढे व्हायची...एकवेळ तर साप पाहून वडीलच आईच्या हाताला धरून उभे राहिले..आईच्या मागे दडू लागले.आणि आम्ही जोरजोरात हसायला लागलो.तसा साप बिळात शिरला जसा साप बिळात शिरला तसा आईने एक बेडूक आणला त्याच्या पायाला दोरी बांधली आणि बेडूक बिळात सोडला. बेडकाला पाहून साप बिळाबाहेर आला की आईने त्याला लगेच मारला.अस्सल नाग होता.लेकराबाळांच्या घरात घुसलेला साप आईने मारून जणू सर्वाचा जीव वाचवला होता.तेव्हापासून आडनाव नागराळे पडले असावे...
अशी इतकी धीट,धाडसी आई काळाने झडप घालून जशी एखाद्या घारीनीने सापाला पटकन उचलून न्यावं तसे काळाने माझ्या आईला एका दिवसातच उचलून नेले... माझ्या आयुष्याची पायाभरणी करताना माझ्या आईचे कष्ट अनंत आहेत...तिचे मोल न फिटणारे आहे.जगात काहीही मिळेल पण उसने मायबाप आणि त्यांची माया कधीच मिळत नाही.ज्याला आईवडील आहेत त्याला त्यांची कदर नाही...माझ्या प्रत्येक श्वासाला माझी आई आठवते.
"आईच्या मायेला जगी तोड नाही
आई असे ॠण आहे ज्यास व्याज नाही
आई तुझ्याविन जीवनास माझ्या साज नाही
ये परतुनी मिनु तुझी वाट पहातच राही
माझी आईच माझ्यासाठी आहे देवी
म्हणून मी कोणत्याच देवीला जात नाही..." ✒
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~