STORYMIRROR

Deepali Thete-Rao

Others

4  

Deepali Thete-Rao

Others

मला समजायला लागलंय हळूहळू.....

मला समजायला लागलंय हळूहळू.....

2 mins
162

आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर

जे जे मला दुखवत गेले

त्या त्या सगळ्यांना न दुखावता

सोडून देणं आताशा

मला जमायला लागलंय.......


संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी

वाद न घालता

तेथून दूर निघून जाण्यातच

खरी परिपक्वता असते हे आताशा

मला समजायला लागलंय......


माझ्या बरोबर घडणाऱ्या

अनेक वाईट गोष्टींचा उहापोह करून

त्यात शक्ती खर्ची घालून

आजूबाजूला जे जे उत्तम आहे

त्या कडे बघण्याचा

दृष्टिकोनच बदलून जातोय

हे जाणवायला लागलंय......


आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत

स्वतःला सावरून,

शिकून मोठं होणं

जमायला लागलंय....


कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर

काहीही न बोलणे

म्हणजे त्यांना संमती असणे

गरजेचे नाही...

कदाचित

त्यांच्या पार जाण्याची तयारी करणं आताशा मला जमायला लागलंय.....


कधी-कधी तुमचं काहीही न बोलणं

किंवा कोणतंही प्रत्युत्तर न देणं...

खूप काही बोलून जातं

तुम्हाला डिवचणाऱ्या लोकांना

प्रत्युत्तर देण्याची किंवा

वाद घालण्याची क्रिया

त्यांना अजून शक्ती देऊन जाते

त्यांना हव्या असलेल्या

अशा गोष्टीमध्ये समाधान देऊन जाते,

हे मला आता उमजायला लागलंय...


आपण लोकांवर किंवा

त्यांच्या विचारांवर

बंधन आणू शकत नाही

पण आपण स्वतःच्या मनावर

मात्र बांध घालू शकतो

आपण अशा लोकांच्या वागण्याला

किती मनावर घ्यायचे,

त्यांना किती महत्त्व द्यायचं,

त्यांनी बोललेल्या वाईट साईट गोष्टी

किती डोक्यात साठवून ठेवायच्या

आणि स्वतःचे आयुष्य

खराब करून घ्यायचं

हे ठरवणं गरजेचं असतं

बऱ्याचदा असे वागणारे

किंवा बोलणारे लोक

दुसऱ्याबद्दल वाईट बोलताना

स्वतःचा हीन दर्जाही

दाखवून देत असतात

अशा लोकांच्या आधारहीन शब्दांची आताशा मन मजा घ्यायला लागलंय....


मी इतके दिवस

ज्याचा प्रकर्षाने शोध घेत होते

ती मनःशांती, समाधान....

मला मिळालं

जेव्हा ठरवलं की

मी अशा लोकांपासून लांब राहावं

जे मला चांगलं म्हणत नाहीत

कारण त्यांच्या दृष्टीने

मी जर चांगली नाही

तर मी स्वतःला

त्यांच्या साच्यात बसवणे योग्य नाही कुठलेही वादविवाद

किंवा खोल... अथांग... नसलेले संबंध

मला नको आहेत

समोर दुसऱ्याला चांगलं म्हणून

मागे वाईट वागणाऱ्या... बोलणाऱ्या

वरवर संबंध ठेवणाऱ्या

लोकांना आता मी

कटाक्षाने दूर ठेवायला हवं

हे पटायला लागलंय........


कधीकधी परिस्थितीला

आहे तसंच सोडून देणं

आणि शांत राहणं सोईचं ठरतं

लोकांना कुठल्याही गोष्टींचं

स्पष्टीकरण देत बसणं

आणि त्यांनी तुम्हाला

समजून घेण्याची अपेक्षा करणं

बावळटपणाचं आहे कळल्यावर

मी आताशा मला

त्या दृष्टीनं घडवायला लागलीय.....


माझ्या स्वतःच्या आनंदाचा ठेवा

मला सापडलाय

आणि उशीरा का होईना

पण मी आताशा त्या वाटेवर

समाधानानं पावलं टाकायला लागलीय.......


Rate this content
Log in