माणसा तू हे जाण
माणसा तू हे जाण
कित्येक युगांपासुन
मानव रडला होता
अन्यायाने त्याचा श्वास
कोंडुन ठेवला होता ||1||
माणसासारखा माणुस
अस्पृश्य ठरवला होता
पिळवणुकीने त्याचा गळा
खुप वेळा चिरला होता||2||
उध्वस्त झालेली त्याची स्वप्ने
राखरांगोळी संसार होता
जुलुमांच्या हातांनी
बाजार मांडला होता||3||
क्रांतीकारकांनी पेटवला
स्वातंत्र्याचा नंदादीप
सत्याग्रहाची धार पाहुन
सूर्य सुद्धा ओशाळला होता||4||
स्वातंत्र्याची ज्योत तेवली
बलिदानाच्या समईने
सत्याग्रहाच्या मार्गाने
शत्रू नरमला होता||5||
समता, बंधुता, न्यायाची
बाग येथे फुलवली होती
एकत्मतेच्या सिंचनाने
संविधान बहरले होते||6||
आभाळासम भव्य मन
पृथ्वीसारखी सहनशीलता
सुर्यासारखे तेज भीमाचे
चंद्रासारखी शितलता||7||
त्यांनी पाजले सर्वांना
समतेचे निर्मळ पाणी
जागवली मनामनात
मानवतेची राष्ट्रीय गाणी||8||
मुंगीपासुन गिधाडापर्यंत
वेलीपासुन झाडापर्यंत
वाडीपासुन शहरापर्यंत
तुम्ही दिला कायद्याचा आधार||9||
तुम्ही मानवतेचे बी
संविधानात रुजवले
सर्वांना एकच मतदान
लोकशाहीचे पाठ गिरवले||10||
हळूहळू सर्वांना समजतेय
संविधानातील तुमची करुणा
तिच्या निर्मळ वहाण्याने
बदलतेय इथली धारणा||11||
मुलभूत हक्क व कर्तव्यांची
आम्हाला झाली जाणीव
नितीमान समाजाची
भरुन निघतेय उणीव||12||
भारतीय संविधान
कायद्याची खाण आहे
देश कसा चालवावा?
याची पक्की जाण आहे||13||
संविधान सर्वोच्च मानून
देश चालवायचा आहे
विकासाची भगीरथ गंगा
देशात पोहचवायची आहे||14||
चुकीच्या गोष्टींसाठी
आम्ही भांडणार नाही
देशहित सर्वोच्च मानून
स्वार्थाला थारा देणार नाही||15||
आम्ही घेतला तुमचा वसा
त्याग आणि समर्पणाचा
सत्य व न्यायासाठी
आता मागे हटणार नाही||16||
सार्वभौम, समाजवादी भारत
संविधानाचा आहे प्राण
धर्मनिरपेक्ष गणराज्य भारत
माणसा तू हे जाण||17||
सामाजिक, आर्थिक, न्याय
हे आहे आमचे स्वप्न
राजनैतिक,सांस्कृतिक न्याय
विकासाचे आहेत रत्न||18||
विचार, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य
संविधानानेचं दिले आम्हाला
विश्वास, श्रद्धा उपासनेचे
मोल जाणुन घ्या सकळा||19||
राष्ट्राची एकता वाढवू या
एकात्मता पक्की करु या
संकल्प आपण करु या
मानवाचे मुक्तीदाते बनू या||20||