कुटुंब - जोड - वेळ
कुटुंब - जोड - वेळ
पूर्वीचा काळ,
खरंच होता चांगला,
साधे घरं साधी माणसं,
कुठे होता बंगला?
घरं जरी साधंच पण,
माणसं होती मायाळू,
साधी राहणी चटणी भाकरी,
देवभोळी अन श्रद्धाळू.
सख्खे काय चुलत काय,
सगळेच आपले वाटायचे,
सुख असो दुःख असो,
आपुलकीने भेटायचे.
पाहुणा दारात दिसला की,
खूपच आनंद व्हायचा हो,
हसून खेळून गप्पा मारून,
शीण निघून जायचा हो.
श्रीमंती जरी नसली तरी,
एकटं कधी वाटलं नाही,
खिसे फाटके असले तरीही,
कोणतंच काम रुकलं नाही.
उसनं पासनं करायचे पण,
पोटभर खाऊ घालायचे,
पैसे आडके नव्हते तरीही,
मनमोकळं बोलायचे.
कणकेच्या उपम्यासोबत,
गुळाचा शिरा हटायचा,
पत्रावळ जरी असली तरी,
पाट, तांब्या मिळायचा.
लपाछपी, पळापळी,
बिनपैशाचे खेळ हो,
कुणीच कुठे busy नव्हते,
होता वेळच वेळ हो.
चिरेबंदी वाडेसुद्धा,
खळखळून हसायचे,
निवांत गप्पा मारीत माणसं,
ओसरीवर बसायचे.
सुख शांती समाधान 'ते'
आता कुठे दिसते का?
पॉश पॉश घरामधे,
'तशी' मैफिल सजते का?
नाते गोते घट्ट होते,
किंमत होती माणसाला,
प्रेमामुळे चव होती,
अंगणातल्या फणसाला.
तुम्हीच सांगा नात्यामध्ये,
राहिला आहे का राम?
मुलीकडे आईचा हो,
असतो का मुक्काम?
सख्खे भाऊ, सख्ख्या बहिणी,
कुणीच कुणाला बोलत नाही,
मृदंगाच्या तालावरती,
गाव आता का डोलत नाही.
प्रेम, माया, आपुलकी हे,
शब्द आम्हाला गावतील का?
बैठकीतल्या सतरंजीवर,
पुन्हा पाहुणे मावतील का?
