अस्थी विसर्जन
अस्थी विसर्जन
विहिरी कधीच आटल्याईत...
नद्या कोरड्याठाक पडल्याईत..
धरणांचाही बुड दिसू लागलाय..
एकंदरीत हा दुष्काळ
जरा भीषणच आहे, म्हणायला हवं!!
हंडाभर पाण्यासाठी
चार चार मैल पायपीट करावी लागतेय..
तीनचार वर्षाच्या लेकरांपासून
सत्तरीच्या आज्जीपर्यंत
घरातल्या साऱ्याच माणसांना,
टिपूसभर पाण्यासाठी वणवणावं लागतंय..
एकंदरीत हा दुष्काळ
जरा भीषणच आहे, म्हणायला हवं!!
जिथे माणसांना धड प्यायला पाणी नाही,
तिथे तर मग जनावरांची बातच नको...
खंगुन गेलीयेत सारीचं बिचारी,
चारा छावण्याही फेल गेल्यात..
पाणी देणार कुठून
आणि आणणार तरी कुठून ?
एकंदरीत हा दुष्काळ
जरा भीषणच आहे, म्हणायला हवं!!
आणि आपण मात्र
वारेमाप उधळतोय पाणी..
अगदी बापाची पेंड असल्यासारखी..
आपल्याला ना कसलं घेणं ना देणं..
थेंब... चार थेंब मुतून
अगदी हंडाभर पाणी फ्लश करतोय आपण,
कारण...
आपल्याला कुठे ठाऊक की काय असतो दुष्काळ..
आणि आपल्याला काय करायचं त्याच???
आपल्याला तर मिळतंय ना
हवं तेव्हा, हवं तितकं पाणी.....
आपण नाही विचार करायचा कसला..
बिनदास्त नासवायचं,
हवं तसं, हवं तितकं वापरायचं..
पाण्याचं टेन्शन आपण कसचं नाही येऊ द्यायचं!!!
आपल्याला कुठे ठाऊक की काय असतो दुष्काळ..
आणि आपल्याला काय करायचं त्याच???
आपण टेन्शन घ्यायचं
तर ते शनायाचं..
धोनीच्या ग्लोव्हजच्या परमिशनचं..
त्याच्या ग्लोव्हजवर असलेल्या बॅजचा विषय
आपल्यासाठी जरा जास्तच मोलाचा...
मीडियाकडून तर आता नाहीतच काही अपेक्षा..
कुठे अशीही परिस्थिती आहे,
हयाची धग कदाचित त्यांच्या
एसी कॅबिन पर्यंत पोहोचतच नसेल,
आणि जरी जाणवतं असेल
तरी जाणूनबुजूनच करतील कानाडोळा...
चाटत राहतील पाकिटातलं लोणी..
सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर होऊन...
वारंवार बिंबवत राहतील क्षुल्लकश्या गोष्टी..
अश्या पद्धतींने की जणू काही
तेच काही प्रश्न देशासमोर उरलेत..
"बलिदान" चिन्ह कोरलेलं बॅज घातलं
म्हणून डोक्यावर उचलून घेऊ आपणही..
खूप आश्वासन दिली म्हणून
पुन्हा पुन्हा निवडून देऊ आपणही...
चंद्रावर जाऊ, मंगळावर जाऊ...
सारी दुनिया सेकंदात फिरुन येऊ
मोठी स्वप्ने बघू,
मोठ्याल्या इमारती बांधू
पण तेव्हाच मात्र
आपलेच काही समाजबांधव
तडफडत असतील...
घोटभर पाण्यासाठी मरत असतील..
मेल्यानंतर अस्थी विसर्जनाला तरी पाणी मिळेल का
नक्कीच असा विचार करत असतील!!!