यश असचं असतं
यश असचं असतं
यश खेचून आणावं लागतं. ते आयत आपल्याला मिळत नाही. त्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. मग तो व्यवसायिक, नोकरदार असू दे, किंवा कोणी उच्च पदाधिकारी असू दे. पण यश मिळाल्यानंतर त्याचे आनंदाश्रू असतात ते सर्वांचे सारखे असतात. त्यात भावना असतात. एक निर्मळ मन लपलेल असतं. पवित्र्य राखलेल असतं. याचा स्वानंद म्हणजे गगनाला टेकलेले हात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
अपार कष्टातून मिळालेले यश याचा आनंद आपण सांगू शकत नाही. फक्त डोळ्यावाटे बाहेर पडत राहतो. आनंदाश्रुंनी चेहरा चिंब भिजतो. कष्टाचे मिळालेले फळ आनंद देऊन जाते. मग हा आनंद, हर्ष अश्रूंना वाट रिकामी करून देतो.
असाच एक किस्सा माझ्या बाबतीत घडला. अगदी कालच.
माझी 'रमाची पाटी ' ही शॉर्ट फिल्म आहे.26 डिसेंबर 2022 ला यूट्यूब वर आली.
याला अनेक बक्षीसे मिळाली.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जवळजवळ आतापर्यंत या फिल्मला साठच्या पुढे भरपूर पुरस्कार प्राप्त झाले.
माझ्या दिग्दर्शकाने ही फिल्म शॉर्ट फिल्म स्पर्धा फेस्टिवल मधे पाठवली.
काल त्याचा निकाल लागला. चक्क मी लिहिलेली माझी फिल्म 'रमाची पाटी ' याला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
मी खूप खूप आनंदी झाले. माझा आनंद चेहऱ्यावर झळकत होताच, पण नयनावाटे देखील मनसोक्त बरसत होता.
मी लगेच माझ्या मैत्रिणींना प्रियजनांना फोन करून सांगितले. आईला फोन केला तेव्हा माझ्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. ती घाबरली, "ताई काय झालंय?काय झालयं? " म्हणू लागली. मी जरा शांत झाले आणि मग तिला आनंदाची बातमी दिली.
असा हा आनंद,परिश्रमानंतर मिळणारा हा हर्ष, गगनात मावणारा नसतो.
म्हणून म्हणावेसे वाटते यश असंच असतं, यश असंच असतं.....