बालपण
बालपण
माझे शिक्षण फलटण शहरी झाले. जन्म माझा पुण्यातला पण कर्मभूमी माझी फलटण.
माझे शालेय शिक्षण पूर्ण फलटण मध्ये झाले. फलटण या शहराची माझी शैक्षणिक नाळ जोडलेली आहे.
खूप आठवणी आहेत.त्यातील काही आठवणी मी शेअर करते. शाळेत जाताना आम्हाला नदी पार करावी लागत असायची. नदी पार करून मग आम्हाला शाळेमध्ये जाता येत होते. फलटण आणि मलठण असे दोन भाग होते. आम्ही मलठण मध्ये राहायला होतो.
शाळा सकाळी सातला असायची. शाळेत जाण्यासाठी किमान एक तास आम्हाला लागायचा. त्यावेळी दप्तर म्हणजे एक पिशवी. आपले सामान टाकायचे पाठीवर दप्तर घ्यायचं आणि चलायचं शाळेमध्ये. दादा सोडवायला असायचे.
पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आलं तर, त्या पाण्यातून आम्हाला जावं लागायचं. पूल होता पण तो दुसऱ्या बाजूने होता आणि तो खूप लांब वाटायचा अंतर. त्यामुळे आम्ही नदीतूनच जात असायचो. नंतर, नंतर त्या पाण्याची एवढी भीती वाटायला लागली की त्या पाण्यामध्ये जाऊन आपण बुडेल की काय असं वाटायचं. खूप पाणी आले,खूप पाऊस झाला,नदीला पूर आला की शाळेला बुट्टी मारायची. बुडालेला अभ्यास दोन-तीन दिवसांनी तो पूर्ण करून घ्यायचा.
पाचवीला दुपारी शाळा सुरू झाली. आता मात्र आम्ही रमत गमत शाळेमध्ये जायचं. रस्ता ओळखीचा झाला होता. त्यामुळे वडील काय आम्हाला सोडवायला यायचं नाहीत. मी आणि लहान भाऊ आम्ही शाळेमध्ये निघायचो.
रस्त्यात बकुळीचे झाड होते. झाडाखाली पडलेली फुले वेचायची. सुंदर गजरा तयार करायचा. आणि रोज एका बाईंना द्यायचा. एक आपण घालायचा. मैत्रिणीला द्यायचा.त्या फुलांचा सुगंध अजूनही माझ्या मनावर राज्य करत आहे.काही फुले वहीत ठेवायची माझी सवय होती. आजही ही सवय मोडता आली नाही.
माझे लक्ष खेळांपेक्षा अभ्यासाकडे जास्त होते. त्यामुळे कायम मी आई-वडिलांची शाब्बासकीच घेतली होती. शिक्षकांच्या शाब्बासकिस व बक्षीसास कायम पात्र ठरत होते.
मी व माझे मित्र वंदना आम्ही दोघीजणी खूप जीवाभावाच्या मैत्रिणी होतो. एकमेकांच्या घरी जाणे,वाढदिवस साजरे करणे,खेळणे,अभ्यास एकत्र करणे यात आमचा दिवस संपून जायचा.
मला मैदानी खेळाकडे जास्त ओढ नव्हती . आजही मैदानी खेळांपेक्षा मला बैठे फार आवडतात.
पूर्वी महानगरपालिकेकडून रांगोळी स्पर्धा,किल्ले स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. आम्ही सहभाग घेत असू. मला मोर काढायला खूप आवडतो. कायम माझ्या रांगोळी मध्ये मोराचा समावेश असतोच. त्या वेळी इयत्ता पाचवी मध्ये माझा पहिला नंबर आलेला मला चांगला आठवत आहे. आणि मला छान बक्षीस दिलेले मला आठवत आहे. सर्व शिक्षकांनी माझ्या नातेवाईकांनी आणि तिथल्या मान्यवरांनी माझे केलेले कौतुक आजही माझ्या स्मरणात आहे.
माझे आई आणि बाबा किल्ले स्पर्धा मध्ये सहभागी होत असायचे. त्यातही त्यांचा नंबर कधीच चुकला नाही.
बालपणीच्या अशा काही आठवणी असतात की त्या कधीच विसरता येत नाहीत.
वंदना माझी प्रिय मैत्रीण आहे. शाळेत स्नेहसंमेलनावेळी आमची जोडी कायम ठरलेली असायची.माझी उंची जरा कमी म्हणून मला स्त्री पात्र असायचे तिला पुरुष पात्र असायचे. जरा वंदी चिडायची पण जोडी आम्हांला आमचीच हवी असायची.वर्गा मध्ये आमच्या दोघींचा पहिला दुसरा नंबर येत असे. कधी माझा पहिला नंबर आला तर ती रागवायची. तिचा नंबर आला तर मी रुसायची. अशी अभ्यासाची प्रगती मध्ये आमची चढाओढ असायची.
वर्गातल्या सर्व मुली मिळून आम्ही एकमेकींचे वाढदिवस साजरा करायचो. प्रत्येकाच्या घरी जाऊन तिला गिफ्ट देणं. तिच्या आईने केलेले पदार्थ मस्त ताव मारणे. हे सुख सध्या नाही.
खूप साऱ्या आठवणी आहेत की त्या आता मी लिहिल्या तर माझा लेख खूप मोठा होईल. तर आता थांबते.
आम्ही मैत्रिणी आता जरी 57 वर्षे वयाची उलटली तरी, आम्ही आजही एकत्र आहोत. आम्ही आजही एकत्र येऊन दंगा मस्ती करतो. जीवन उपभोगतो. सुखदुःख वाटतो. तेवढेच मन शांत होते. दि.17/03/2024 ला आम्ही चौघीजणी एकत्र भेटलो. आमची रोहिणी नावाची मैत्रीण पुण्याला आली होती. तिच्या मुलाच्या हॉटेलवर आम्ही एकत्र यायचे ठरवले. अंजली, वंदना, रोहिणी, वसुधा अशा चार यार त्या दिवशी एकत्र येऊन मनसोक्त गप्पा मारल्या.
बालपणीचा काळ सुखाचा
हा ठेवा आहे अमृताचा
दुःखाच्या समयी पेटारा खोला
अनुभव घ्या मित्रांनो आनंदाचा