मुलांची वृत्ती
मुलांची वृत्ती
मुले म्हणजे देवाघरची फुले. या फुलांना फार जपून बोलावे लागते. त्यांचे मन सांभाळावे लागते. मुलांच्या कलेने घ्यावं लागते. अभ्यास करायचा नाहीच म्हटलं तर मुले करतच नाहीत. आणि जर अभ्यास करायचा मनावर घेतलं तर अतिशय सुंदर रित्या अभ्यास पूर्ण करून दाखवतात. गाणं म्हणण्याची हुक्की आली तर गाणं म्हणतात. नाचायचे मला म्हणून सरळ नाचतात.
अगदी रडायची जरी हुक्की आली ना तरी रडत बसतात हो. अशा ह्या लहान मुलांच्या अनेक खोड्या असतात. या खोड्यांना आपण वृत्ती म्हणूया.
परवाच वर्गामध्ये सकाळी सकाळी गेले वर्ग चालू झाला, छान अभ्यासाला सुरुवात झाली. एक मुलगा मधूनच उठला. मोठ्याने म्हणाला बाई तुम्हाला काहीतरी म्हणायचं. मी म्हटलं "बोल काय म्हणतोयस." तो म्हणाला "बाई तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणायचय. "मला थोडे आश्चर्य वाटले. असे का बर मधेच हा मुलगा उठला असेल? मी त्याला बोलले "बाळा का उठलास आणि का मध्येच बोललास?" तो म्हणाला "आहो! तुम्हाला मी कुठे आज गुड मॉर्निंग म्हणालो". मला अगदी खळखळून हसायला आले. मी हसयला आले तर सर्व वर्ग हसू लागला. मी त्याचे कौतुक पण केले. त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.
आता जरा उपक्रम प्रकल्प चालू आहेत. कागदावर मी छान लिहून घेते मुलांकडून. आणि प्रत्येक वाक्याला एक मार्क. चित्र,अक्षर, शब्द , वाक्य या प्रत्येकाला मार्क विभागून देते. मुलांना लेखनासाठी अंदाजे दोन तास तरी देते. कारण ही मुलं चिमुरडी आहेत त्यांचे लेखन हळूहळू होते. काही मुलं भरभर लिहितात काही मुलं हळू लिहितात. असाच एक उपक्रम घेतला. वाचन पाठ ची वाक्ये लिहून घेतली.त्या उपक्रमाला दहा मार्क दिले. मुले लिहीत होती. जसे पूर्ण होईल तसं दाखवत होती. दोन मुलांचे राहिले होते. मी प्रत्येक मुलांना गुण पण देत होते. मुलांना सांगितले दहा पैकी दहा आणि नऊ गुण ज्या मुलांना मिळणार त्या सर्व मुलांना उद्या मी बक्षीस देणार. मुलांनी स्वच्छ सुंदर अक्षर काढून वेळेमध्ये पूर्ण करून मला दिले होते फक्त दोन मुले राहिली होती.
एक प्रनिकेत दुसरा आशिष. प्रणिकेतने नऊ अंकापर्यंत पर्यंत लिहून झालेले होते. आशिषचे मात्र बरेच लेखन शिल्लक होते.
मी मात्र आता फळा पुसून टाकला होता. आणि अचानक मला रडण्याचा आवाज आला. पाहते तर आशिष हमसून,हमसून खूप मोठ्याने रडत होता. त्याला विचारले "काय झालं आशिष?" तो काही बोलत नव्हता. त्याला म्हणलं "मी फळा पुसला म्हणून रडतोय का?" त्याने नकारात्मक मान हलवली. मग विचारले "लेखन अपूर्ण आहे म्हणून रडतोय का?" परत नकारात्मक मान हलवली. पण रडणे काही थांबले नव्हते. रडता रडता त्याचे एक वाक्य मात्र ऐकू आले " तुम्ही मला मार्क देणार नाही " आणि मी लगेचच त्याला जवळ घेतलं,समजावून सांगितलं. तुला तुझे मार्क मिळतील. तू जेवढे दिले तेवढे मार्क तुला मी देणारच आहे. पण यापुढे लेखनाची गती तुला वाढवावी लागेल,भरभर लिहावं लागेल. तो खुश झाला छान हसला आणि जागेवर जाऊन बसला. जागेवर जाताना सोहम नावाच्या मुलाचे केस मात्र ओढले. आणि एकच हशा पिकला. कारण हा आशिष अतिशय शांत आहे. तो बोलत नाही जास्त. पण त्याचे हे वागणे सर्वांना नवे होते. त्याला विचारले "असे का त्याचे केस ओढले?" तो म्हणाला "तो माझ्यावर खूप हसला म्हणून.त्याचे जोरात केस ओढले". सोहमला पण हे अनपेक्षित होते. सोहम पण त्याचा मनमुराद आनंद घेत होता. तो पण खूप मोठ्याने हसत होता. आणि वर्गात एक आनंदाचा उत्साह साजरा झाला.
अशा ह्या मुलांचा दर दिवशी एक नवीन वृत्तीचा अनुभव येतो.
नवीन स्वभाव पाहायला मिळतात. नव चेतना इतरांमध्ये जागवल्या जातात. चढाओढी मध्ये भरभर,छान, सुबक लेखन शिकतात. बाईंकडून शाबासकी मिळवतात. बक्षीस मिळवतात.