वैचारिक स्नान
वैचारिक स्नान
*वैचारिक स्नान*
स्नान म्हणजे - जसे शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज स्नान आवश्यक असते, तसेच मन आणि विचार शुद्ध ठेवण्यासाठी वैचारिक स्नान अत्यंत गरजेचे असते.विचार महत्वाचे असतात. चांगले विचार, वाईट विचार हे मनात रुंजी घालत असतात.
माणसाच्या जीवनात विचारांना अनन्यसाधारण महत्व आहे.
चांगले विचार जीवनाला योग्य दिशा देतात, तर नकारात्मक विचार, वाईट विचार मनात कटुता निर्माण करतात.
आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस बाह्य स्वच्छतेकडे जास्त लक्ष देतो. समाजात वावरताना आपण छान दिसले पाहिजे.पण मनातील राग, मत्सर, द्वेष, अहंकार आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी वेळ देत नाही.
असे विचार मनात साठत गेले असता चेहऱ्यावर त्या भावना स्पष्ट दिसतात. डोळ्यातून त्या जाणवतात.
म्हणूनच मनाला जोड हवी सकारात्मकतेची, प्रेरणेची आणि शांततेची, कोणाचे मन दुखावणार नाही अशा चांगल्या विचारांची.
मग काय करावे बरं?? तर उत्तम पुस्तके वाचणे, संतांचे विचार ऐकणे, चांगल्या व्यक्तींचा सहवासात राहणे आणि मुख्य म्हणजे आत्मपरीक्षण करणे. म्हणजेच वैचारिक स्नान होय.
वैचारिक स्नानामुळे मन प्रसन्न राहते, विचार शुद्ध होतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. संकटसमयी सकारात्मक विचार माणसाला खंबीर बनवतात. ज्या मनात चांगले विचार असतात, तेथे आनंद, समाधान आणि प्रेम कायम वास करते.
म्हणूनच प्रत्येकाने रोज काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवावेत. चांगले विचार आत्मसात करून मनातील वाईट विचार दूर करावेत .
कारण स्वच्छ विचार हेच सुंदर जीवनाचे खरे रहस्य आहे.त्यात यश प्राप्त होते.
मनातील कलुषता सारे
चांगल्या विचारांनी धुवून टाकुया
सकारात्मकतेच्या जलाने
जीवन सुंदर फुलवून दाखवूया...
वसुधा नाईक, पुणे
मो. नं. 9823583116
