तिच्या पाठीशी उभा तो
तिच्या पाठीशी उभा तो
सख्यांनो आज थोडा वेगळा विषय, नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना, नारीशक्ती चा महोत्सव, सृजनाचा उत्सव, स्त्रीचा, तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान.
मी रागिणी मी अनुरागिणी, मी रणरागिनी,
मी दया-क्षमा-शांती
मी तितिक्षा मी मी उपरती
मी लक्ष्मी आणि सरस्वती मीच दुर्गा
मी कुमारी, मी माता, मी प्रौढा
मी रंभा ,मेनका ,उर्वशी
मी मी नटेश्वराची अर्धांगिनी, माझ्यावाचून सारे रिक्त जगी.
मैत्रिणींनो आपण म्हणतो ना प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण हे देखील तितकेच खरे आहे की, प्रत्येक यशस्वी नामवंत स्त्रीच्या मागे एक पुरुष देखील उभा असतो.
किंबहुना तोच पुरुष तिची प्रेरणा असतो, तोच तिला प्रेरणा देतो, नामवंत करतो.
आपण काही उदाहरणे पाहू या .
पहिले उदाहरण :-न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाई रानडे.
ज्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून, आपल्या पत्नीला शिक्षण दिले. जगाच्या व्यवहारात उभे राहायला शिकवले, अहो बाहेरच्या जगाशी भांडण सोप असत .
पण घरच्यांशी भांडणं फार कठीण.
आणि म्हणूनच महादेव रानडे यांच्या निधनानंतर देखील शिक्षण क्षेत्रात रमाबाईंनी भरीव कार्य केले.
दुसरे उदाहरण आहे गोपाळराव जोशी आणि आनंदी बाई जोशी,
ज्या काळामध्ये जात-पात, शिवाशिव ,कर्मकांडे या गोष्टींना प्राधान्य दिले जात होते. त्या काळात साता समुद्राच्या पलीकडे जाणे म्हणजे पाप होते .
अशा वेळी त्यांनी आपल्या अशिक्षित पत्नीला प्रथम स्वतः शिकवले, आणि डॉक्टर बनण्यासाठी परदेशामध्ये पाठवले. ही काही सोपी गोष्ट नव्हे.
मंडळी तिसरे उदाहरण आहे, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीदेखील आपल्या अशिक्षित पत्नीला प्रथम शिकवले .आणि मग मुलींच्या शाळेवरती शिक्षिका म्हणून नेमले. त्यासाठी त्यांना चिखल शेणाचा मारा खावा लागला. परंतु आपल्या ध्येयापासून कोणीच ढळले नाही. या तिन्ही पुरुषांनी सुधारणेची सुरुवात, आपल्या घरापासून केली.
यानंतर आता एक उदाहरण आहे.
सासरा आणि सुन या नात्याचं,
मल्हारराव होळकर आणि अहिल्याबाई होळकर.
मल्हारबांनी अहिल्याबाई मधील गुण हेरून ,त्यांच्या वरती राज्य कारभार सोपवला.
पतीच्या निधनानंतर अहिल्याबाई सती निघाल्या होत्या, परंतु मल्हारबांनी त्यांना अडवले आणि म्हणाले मी तुला मुलापेक्षा जवळची मानतो. मी तुला अहिल्याबाईं न म्हणता अहिल्योबा म्हणतो, नको जाऊस तु सती! हे सारे एवढा मोठा राज्य कोणी सांभाळायचं? ऐका सुनबाई आमच !
खरे तर तेव्हा मल्हाराव एखादा दत्तकपुत्र घेऊ शकत होते. एखाद्या लेकावळ्याला राज्य देऊ शकत होते. एखादा नातेवाईक राज्यावर बसवू शकत होते. परंतु त्यांनी एवढं मोठं राज्य अहिल्याबाईच्या स्वाधीन केलं आणि आपल्याच सुने वरती विश्वास दाखवला.
तिला नावारूपाला आणले. अर्थात आईल्याबाई देखील त्या गोष्टीला पात्र होत्या. योग्यतेच्या होत्या.
अजून एक आत्ताच नवीन उदाहरण आहे.
ते म्हणजे मलाला यूसुफजई आणि तिचे वडील जियाउद्दीन युसुफजई. त्यांच्या समाजात, त्यांच्या जगात, स्त्रियांनी बुरखा घातलाच पाहिजे. ही जबरदस्ती होती.
"फक्त चूल आणि मूल" या गोष्टी करण्यासाठीच अल्लाहाने स्त्री निर्माण केली आहे अशी त्यांच्या समाजाची विचारधारा असताना ,जियाउद्दीन यांनी आपल्या मुलीला शिक्षणाचे आणि पोशाखाचे स्वातंत्र्य दिले. तिला विचाराचे पंख दिले. आणि भरारी घ्यायला शिकवले. मुलींच्या शिक्षणासाठी तर त्यांनी स्वतः देखील शाळा उभारली होती .
ती आणि म्हणूनच तालिबान सारख्या कट्टर संघटनेला देखील ती विरोध करु शकली. आणि मृत्यूच्या दाढेतून फक्त वडीलांमुळे बाहेर आली.
सख्यांनो की अशी 5 उदाहरणे, ज्यामध्ये पती बाप आणि सासरा सगळ्यांनी आपल्या मुलींला, सुनेला, बायकोला पूर्णपणे सपोर्ट करून एक नवा आदर्श ठेवलेला आहे.