स्वतःला पत्र
स्वतःला पत्र
प्रिय आशा,
आज स्वतःलाच पत्र लिहिते. आता माहेरच्या नावाने, आशा म्हणणारे खूप कमी लोक राहिलेले आहेत. आयुष्याची पन्नाशी उलटून गेली. आता मागे वळून पाहताना काय साध्य केले आणि काय राहिले याचा लेखाजोखा केला तर खूप काही साध्य केले. खूप काही करायचे राहिले. कधी विचार देखील केला नव्हता एवढी चांगली स्थिती परमेश्वराने दिलेली आहे. तसे आयुष्य बऱ्यापैकी सुखात गेले. आता कोणत्याही गोष्टीला कष्ट केल्याशिवाय आणि खस्ता खाल्ल्याशिवाय काही मिळाले नाही. आपण काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नव्हतो .पण तरी देखील पुष्कळ गोष्टी साध्य झाल्या.
लहान वयात नोकरी, प्रमोशन, सारं काही छान झालं. पती परमेश्वर देखील चांगला मिळाला. मुले चांगली निपजली. आता आयुष्यात कशाची खंत नाही. आता काही गोष्टी माझ्याच वाट्याला का? याला उत्तर नसते वडिलोपार्जित संपत्ती बरोबरच वडिलोपार्जित दुखणीदेखील वाट्याला आली.
जे चांगलं झालं तेही परमेश्वराने केलं आणि जे दुःख झालं तो आपला कर्मभोग होता असा विचार करून सारं सोडून दे.
काही माणसे कायम आयुष्यभर दुष्टाव्याने वागत आलेली असतात. आपल्या मनात देखील त्यांच्याबद्दल खूप राग असतो. त्यांनी आपल्याशी वागलेले, आपल्याला वागवलेले, अनेक प्रसंग डोळ्यासमोर असतात ,पण शेवटी आयुष्यभर द्वेष मनात ठेवून आपल्याला त्रास होतो. त्यापेक्षा क्षमा करणे हे सोपे नाही, परंतु करायला शिक. झाले गेले विसरायला शिक.
आयुष्याच्या या टप्प्यावरती "न उल्हासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली" अशी वृत्ती आता राहू दे जाताना सोबत द्वेषाचे गाठोडे बरोबर घेऊन जाऊ नको कारण त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल त्यापेक्षा जे पण चालल आहे ते परमेश्वरी इच्छेने होत आहे असे समजले तर आयुष्य छान जाईल सोपे जाईल. बाकी तुला काही जास्त सांगायला नको तू सुज्ञ आहेस समजदार आहेत कलाकार आहेस तुझी ऊर्जा तुझी प्रज्ञा इतर गोष्टीत वाया जाण्यापेक्षा तिला तुझ्या कलाक्षेत्राकडे वळव.
तुझीच लग्नानंतरची.
सौ ज्योती