प्रिय पाऊस
प्रिय पाऊस
पावसास पत्र
प्रिय पाऊस
पत्रास कारण की ,
खरेतर तू काही आमचा गुलाम नाही, की तुला आम्ही सांगावं बाबा इथं पड, तिथं नको पडू.
पण मनाला राहवत नाही म्हणून तुला एक विनंती मात्र करू शकतो
पावसा अशा अकाली, अवेळी " नको ना येत जाऊ"
नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी्
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली
पावसा शहरांमध्ये तू जास्त पडतो आणि गावाकडे खेड्यांमध्ये जिथे तुझी गरज आहे तिथे तू जातच नाहीस.
म्हणजे असं बघ, शहरांमध्ये धुवांधार पडलास की झोपड्यांमध्ये ,चाळींमध्ये पाणी शिरत, गरिबांचे संसार वाहून जातात. त्यांनी काडी काडी करून जमवलेलं तू एका फटक्यात सारं वाहून नेतोस. आधीच त्यांची फाटकी झोळी ,आणि मोडलेला कणा त्यात तू सारे भुईसपाट करतोस.
इकडे गावाकडे मात्र डोळ्यात प्राण आणून सारे तुझी वाट पाहत असतात .कधी कधी त्यांची उभी पिके करपून जातात तर कधी कधी तुझ्या अकाली येण्याने, झोडपण्याने , उभी पिके आडवी होतात आणि मग उभा बळीराजा पण आडवा होतो .त्याचं सारं कुटुंब उघडे पडत रे!
पावसा तू पंचमहाभूता मधील एक भूत, तुझ्याविना सृष्टी शुन्य होईल, बिरबलाच्या कथेप्रमाणे 27 मधून नऊ जर गेले तर खाली काहीच उरत नाही
पण म्हणून तू असा वेळीअवेळी येऊन देखील आमचा प्राण कासावीस होतोच, कधी ओला तर कधी सुका दुष्काळ बळीराजाच्या माथ्यावर येतो. पावसा तुला विनंती करतो सर्वांना तुझ्याकडून सुख दे, सर्वांना आनंद दे, आणि दरवर्षी न चुकता आमच्या भेटीला येत राहा. पण वेळच्या वेळी बरं का! नाहीतर मग अनाहूत पाहुणा सर्वांना नकोसा होतो बरं!
बर थांब ते आता कारण तुझ्या स्वागताची तयारी करायची
तुझी एक
सुजाण नागरिक