मन उधान वाऱ्याचे
मन उधान वाऱ्याचे
या मना संबंधित लिहायचे तर हजार शब्द देखील कमी पडतील.
असो मनाचं सगळ्यात उत्तम आणि सुंदर विश्लेषण समर्थांनी केलेले आहे. "त्यामध्ये नको रे मना
क्रोध हा खेदकारी
नको रे मना
काम नाना विकारी
मना श्रेष्ठ धारिष्ट
जीवी धरावे
मना बोलणे नीच
सोशीत जावे
स्वय सर्वदा नम्र
वाचे वदावे
मना सर्व लोकांसी
रे निववावे
असं खूप काही मनाला प्रबोधन केल आहे .
त्यानंतर बहिणाबाई चौधरी
" मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्यानं चालल्या
मन सुटल अंतर किती मोकाट आहे क्षणात इकडे क्षणात तिकडे त्याचे अगदी योग्य वर्णन
पाण्यावरल्या रे लाटा
मन जहरी जहरी
त्याच न्यारं रे तंतर
अरे ईचू साप बरा
त्याले उतारे मंतर
मन किती जहरी आहे, एखाद्याचा काटा काढायचा झाला तर, आधी सगळे बेत मनामध्ये ठरवले जातात. अरे त्याच्यापेक्षा साप-विंचू बरा, किमान त्याला एखादा मंत्र तरी उतरवण्यासाठी असतो. पण मनातलं जहर एकदा भरलं की ते उतरवता येत नाही.
त्यानंतर पुराणांमध्ये देखील मनाची महती आहे
"मन, बुद्धी, अंतकरण यातील अंतकरण पंचका मध्ये मनाचा समावेश आहे.
यातील प्रत्यक्षात मन काय आहे? कसा आहे? दाखवता येईल का हो? नाही! हे माझं शरीर सर्वांना दाखवता येतं, पण
" हा माझा आत्मा"
हे माझे मन"
असं नाही दाखवता येत. पण ते मन असतं !
हीच तर परमेश्वरी किमया आहे .
सारे व्यवहार मनोराज्यावर चालतात. चांगल्या किंवा वाईट गोष्टी प्रथम मनात येतात, मग बुद्धीला पटतात, मग मेंदू तुम्हाला आदेश देतो.
त्यानुसार तुम्ही गरिबांसाठी एक पाणपोई किंवा अन्नछत्र देखील घालू शकता. आणि बॉम्ब स्पोट देखील करू शकता.
हे मनाचे कारभार !
जगात चालणारे सारे कारभार, मनावर अवलंबून आहेत.
"मनाला पटलं म्हणून केलं" "मनाला वाटलं म्हणून केलं"
" मनात भरलं नाही"
" मनाने घेतलं नाही"
माझ्या मनाने मी बोलले नाही, माझा बोलविता धनी कोणी दुसरा आहे.
"मनापासून धन्यवाद"
" मनापासून आभार"
" मनापासून दिलं" "मनापासून घेतलं"
त्या सगळ्या शब्दशक्तीत मन हा शब्द आला कोठून?
मुळात हा दोन अक्षरी शब्द, अगदी सरळ काना नाही मात्रा नाही हे "मन "आलं कुठून? पण मनाचं कर्तुत्व मात्र केवढ?
आपल्याला जेव्हा एखादी काही स्वप्न पडतात,
तेव्हा ती आपली सुप्त इच्छा असते. आणि आपण
"मनी वसे ते स्वप्नी दिसे" असं म्हणतो .
म्हणजे जे आपल्या सुप्त मनात असतं ते आपल्याला स्वप्नात दिसतं.
ती एक भावना आहे का? प्रथम मनामध्ये भावना कुठून येतात ?
का येतात? कशा येतात?
हे सगळे एक कोडेच आहे.
बॉलीवूड च्या गाण्यांमध्ये तर कित्येक ठिकाणी मन हा शब्द आलेला आहे.
"तोरा मन दर्पण कहलाये"
" नाचे मन मोरा, मदन तित्ता दिगी दिगी "
"मन ही मन मे लड्डू फुटे, नैनो मे फुल जडिया फुठे'
" मन चंगा तो काठवट मे गंगा"
आणि मराठी मध्ये
"मना तुझे मनोगत, मला कधी कळेल का?
मन शुद्ध तुझं गोष्ट
आहे पृथ्वी मोलाची
तू चाल पुढं तुला र
गड्या भीती कशाची
" अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले"
सुरेश भटांची प्रसिद्ध कविता "मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तुला न सांगता तुझा
वसंत रोज पाहतो"
"मनाचिये गुंती
गुंफियेला शेला
बाप रखुमादेवीवरु
विठ्ठले अर्पिला '"
असं किती त्या मना बाबत बोलावं आणि लिहावं तरी कमीच पडणार आहे.
"मन भरून आलं"
" मनाला आनंद झाला"
" मनाला समाधान वाटलं"
" मन उदास झालं "
"माझ्या मनाने कौल दिला"
" माझ्या मनाला वाटलं"
" मनोमीलन होणे" "मनातल्या मनात झुरणे"
" मनाचे खच्चिकरण होणे"
" मन खंबीर असणे "
म्हणजे तुमच्या शरीरात चालणारे शरीराचे सर्व व्यवहार शेवटी त्या मनावर अवलंबून आहेत
जे दिसत नाही, सांगता येत नाही, दाखवता येत नाही, ते सारं मन आपल्याकडून सारं करून घेत .
" मनाला आवर घालणे "
"मन काबूत ठेवणे*"
" मनाला लगाम घालणे" "*** किती गोष्टी करायच्या.
आमचा हनुमान सुद्धा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धीमताम् वरिष्ठ असा आहे म्हणजे तो कोठेही मनाच्या वेगाने जाऊ शकतो
आता वेड्या रुग्णांना मनोरुग्ण असं म्हटलं जातं. माझी पहिली पदवी "मनोविकृती तज्ञ परिचारिका" अशी होती. म्हणजे त्या मनात जेव्हा काहीतरी विकृती निर्माण होते, तेव्हा त्या व्यक्तीला त्या भावना कंट्रोल करता येत नाहीत.
शास्त्रज्ञांनी इथपर्यंत शोध लावलेला आहे की, शरीरातील डोपामीन नावाचे संप्रेरक कमी जास्त झाले की त्यानुसार मनाचे व्यवहार होतात.
डोपामीन कमी झाले की रुग्ण उदास होतो. ज्याला डिप्रेशन असे म्हटले जाते. डोपामिने चे प्रमाण अधिक झाले की रुग्ण अति उल्हासित होतो, त्याला मॅनिया असे म्हटले जाते. आणि कधीकधी बायपोलर मेनिया म्हणजेच मेनिया आणि डिप्रेशन याचे एकामागोमाग एक एपिसोड येत राहतात .
आपल्या स्वतःला सुद्धा असं होतं,
"बघा कधीकधी आपल्याला खूप उल्लास होतो, आनंद वाटतो. काहीही कारण नसताना आपण खुश असतो. आणि कधीकधी उगाचच उदासीन असतो, दुःखी असतो. काही गोष्टींमध्ये जेव्हा लोकांचा विश्वास बसत नाही तेव्हा त्याला तुमच्या मनाचे खेळ आहे असे संबोधन केले जाते.
असा हा "मनोबोध "खूप झाला.
आता करूया
"मन उधान वाऱ्याचे
मन गूज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते"
आता जेवढे पण लिखाण आपण केलं ना? ते देखील आपल्या मनाला वाटलं, पटलं ,म्हणून! हो की नाही? तर बा मनारे आता आवर तुझा पसारा,
बास झाले गुड बाय !
परत एकदा कधी तरी उतरता येईल स्वतःच्याच मनात वेळ मिळाल्यावर आता थांबते.