मला काय हवंय
मला काय हवंय


खरं सांगायचं तर भौतिक सुखातलं तरी मला काहीच नको आहे. कारण भौतिक सुख माणसाला कितीही मिळालं तरी ते कमी पडतं.
त्याचं असं आहे झोपडपट्टीतल्यांना वाटतं माझं हक्काचं घर असावं चाळीतल्याला वाटतं माझा वन आर के तरी असावा वन बीएचकेला वाटतं टू बीएचके असावा, थ्री बीएच केला वाटतं बंगला असावा, फार्म हाऊस असावं ,म्हणजे ही यादी काही संपत नाही.
आर्थिक सुबत्ता आली की माणसाच्या गरजा वाढतात मग कालपर्यंत पंख्याखाली झोपणाऱ्यांना एसी लागतो.
महाराष्ट्राच्या बाहेर देखील न गेलेल्यांना फॉरेन ट्रीप करायची असते.
पायी चालणाऱ्याला वाटतं किमान सायकल तरी असावी ,सायकल वाल्याला वाटतं टू व्हीलर स्कूटर असावी, त्यांना वाटतं कार असावी, कारवाल्यांना विमान प्रवास पाहिजे असतो.
माझी आई म्हणायची ज्याच्या पायात चप्पल आहेत त्यांनी अनवाणी माणसाकडे पहावं, आणि आपल्याकडे चप्पल आहे त्याच समाधान मानावं.
ज्याच्याकडे चप्पल नाही त्याने आपल्याला धडधाकटपणे दोन पाय आहेत याचे समाधान मानावं. थोडक्यात अल्पसंतुष्ट राहावं.
माणसाची ही आसक्ती आणि हाव काही केल्या सुटत नाही.
साई सच्चरित मध्ये सांगितलं आहे की बाबा म्हणतात
" मी तर द्यायला बसलोय पण येणारे फक्त संसारिक गोष्टी मागतात, कुणाला मुलगा हवा, कुणाला चांगली नोकरी हवी, कुणाला अजून काय हवं पण अध्यात्मातील उन्नती कोणीच मागत नाही.
लोकं म्हणे तिरुपतीला गेले की धंदा बिजनेस मध्ये परसेंटेज सांगतात म्हणजे मला एवढा नफा व उद्या 20% तुला देईन असा तो पैशाचा देव प्रसिद्ध आहे.
अहो माझ्यासारख्या अत्यंत मागास खेड्यात वाढलेल्या आणि शिकलेल्या मुलीला ,देवकृपेने चांगली नोकरी मिळाली अगदी ओपन कॅटेगरीत असून देखील अधिकाराची जागा मिळाली.
जिथे लवकर एक प्रमोशन होत नाही तिथे माझी दोन दोन प्रमोशन झाली.
चांगल्या वस्तीमध्ये घर झाले, चांगला नवरा मिळाला, मुले चांगली निपजली, म्हणजे न मागता सारं काही मिळत गेलं मी कधीही परमेश्वरापुढे हात पसरून काही मागितले नाही .
म्हणजे जेव्हा आपण गर्दीमध्ये दर्शनाला उभे राहतो, तेव्हा त्याचा मुखचंद्रमा बघतानाच वेळ निघून जातो.
मग मागायचं कधी? बाहेर आल्यावर मैत्रिणी कधी नातेवाईक कधी सोबत असणारे कोण विचारायचं काय मागितलं मी म्हणायची काहीच नाही.
असं कसं होईल
असं थोडाच आहे देवदर्शनाला गेले की तुम्ही मागायसाठीच जा तुमच्या स्वार्थासाठी जा.
देवदर्शनाला गेले की गणपतीच्या दर्शनाला गेले की बाहेर असणाऱ्या उंदराच्या ,आणि शंकराच्या दर्शनाला गेले की नंदीच्या , इतकेच काय पण देवीच्या दर्शनाला गेले की बाहेर असणाऱ्या वाघ सिंहाच्या कानात देखील सांगणारी माणस आहेत. आपल्या मागण्या देवापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या कानात सांगतात.
पण या उलट माझे वडील म्हणायचे
" न मागे तयाची रमा होय दासी"
आणि खरंच मला कधी काही मागावं लागलं नाही अगदी छोटीशी इच्छाजरी असेल तरी काही कालांतराने की आपोआप पूर्ण होत गेली.
एक छोटसं उदाहरण सांगते आयुष्यातल्या 37 वर्षाच्या नोकरी पैकी 23 वर्ष ठाणे मेंटल हॉस्पिटल ला नोकरी केली ,आणि आमच्याकडे रिटायरमेंटचा सेंड ऑफ फार दणक्यात होत असे. आता मी मेट्रन म्हणून मालवणी येथे होते ,तर माझी खूप इच्छा होती की माझी रिटायरमेंट मेंटल हॉस्पिटल येथील जो आमचा रेक्रेशन हॉल आहे तेथे व्हावे. पण ही इच्छा पूर्ण होण्याची सुताराम शक्यता नव्हती.
पण काय योगायोग पहा रिटायरमेंटच्या आठ ते पंधरा दिवस आधी त्या रिक्रिएशन हॉलमध्ये आमचे एक ट्रेनिंग लागले.
त्या ट्रेनिंगला आमचे मोठे मोठे ऑफिसर्स हजर होते, आणि मला ओळखणारे एक डॉक्टर भंडारी म्हणून आहेत. त्यांनी स्वतःहून माझ्या रिटायरमेंट बद्दल घोषणा केली आणि मला स्टेजवर बोलावून आमच्या डीडींच्या हस्ते बुके देऊन माझा सत्कार केला. भाषणात मी ते बोलून देखील दाखवले म्हणजे एखादी इच्छा असेल तर ती कशी पूर्ण होते पहा
हो तर विषय भरकटला मला हवे आहे काय तर मला भौतिक सुखातलं काही नको आहे.
देवदयेने सारं काही मिळालेल आहे. अगदी आनंदी सुखी समाधानी मी आहे .
माझी कोणतीही बकेट लिस्ट नाही. छोट्या मोठ्या इच्छा प्रत्येकाच्या मनात होतातच पण तीव्रतेने ती गोष्ट हवीच असं काही नसतं.
पण एक मात्र माझी अजून परमेश्वराकडे मागणी आहेच .
कारण मी पण शेवटी सर्वसामान्य जीव ज्याला सगळ्याच गोष्टीचा मोह सुटलेला नाही.
देवा ! जो काही माझ्या आयुष्याचा अंतिम दिवस असेल ,तोपर्यंत मला हाती पाय धडधाकट हिंडते फिरते ठेव ,कोणावर अवलंबून नको, कोणाला त्रास नको.
आणि शेवटी
यमुना जी का तट हो
छैय्या को बन्सी वट हो
मेरा सावला निकट हो
जब प्राण तन से निकले
उस वक्त भूल न जाना
उस वक्त शाम आना
उस वक्त जल्दी आना
राधे को संग लाना
जब प्राण तन से निकले
एक भक्त की है अर्जी
खुदगर्ज की है गर्जी
आगे तुम्हारी मर्जी
जब प्राण तन से निकले