माझे कुटुंब
माझे कुटुंब
पती पत्नी*
*आई बाबांची लाडकी उज्वला ,आता मोठी झाली सतराव्या वर्षात पाऊल ठेवले,व तिला एका मावसभावाच्या लग्नासाठी फलटणवरून पुण्याला आई समवेत यावे लागले.
दि.६/६/१९८४ रोजी सकाळी भावाच्या लग्नातच मला लग्नासाठी मागणे आले.मी बारावीची परीक्षा दिली होती.
वैभवने मुलगी तर पाहिलीच नाही पण त्याच्या घरच्यांनी पाहिले.लग्न ठरले. मी देखील वैभवला पाहिले नव्हते. दि.२८/१०/१९८४ ला डायरेक्ट आम्ही दोघे आमच्या साखरपुड्यातच भेटलो.फक्त फोटो पाहिला होता.
साखरपुडा झाला.मग मात्र आम्ही भेटायचो.मी फलटणला हे पुण्याला.तरी हे भेटायला फलटणला यायचे. आम्ही पत्र पाठवायचो.पत्रातून भरभरून बोलत असू.अजूनही छत्तीस वर्ष झाले आमची पत्रे मी सांभाळून ठेवली आहेत.
१२/५/१९८५ ला आमचे लग्न झाले. वैभव फारच रसिक आहेत.प्रेम देणे व घेणे यात फारच माहीर बाबा हे वैभव. आम्ही हनीमूनला "महाबळेश्वरला " गेलो. तर लोक समजत होते.या लहान मुलीला वैभवने पळवून आणले.लोक शंकेच्या नजरेतून पाहायचे. मला फार मजा यायची.समजत तर काहीहीही नव्हते.
लग्नाला दीड वर्ष व्हायच्या आत मला जुळ्या मुली अवघ्या एकोणीस वयात झाल्या. आमची जबाबदारी वाढली.घरात सर्वच हौते.त्यामुळे मुलींची काळजी कमी होती.
वैभव मला संसारात पूर्ण साथ देत होते.मुलींनाही छान सांभाळत होते.
मुली मोठ्या झाल्या.मग जरा मी नोकरीच्या शोधात लागले.नोकरी मिळाली.बालवाडी कोर्स केला.नंतर डी.एड. ही केले .वैभवने त्या वेळीही उत्तम साथ दिली.
नंतर मुलगा झाला.मग काय आभाळ ठेंगणे झाले. वैभव व मी प्रेमात छान राहत होतो.
काही दिवसाने वैभवला हार्ट ॲटॅक आला.मला याचे गांभीर्य समजतच नव्हते.घरातील सारे अस्वस्थ मी मात्र नोकरी मुलांत व्यस्त.
कालांतराने यांचे मोठे लंगचेही ऑपरेशन झाले.ब्रेनट्युमर यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या.एक रूबी हाॅल ,पुणे तर दुसरे लिलावती हाॅल मुंबई... इथून जरा माझी व यांची प्रेमाची परिभाषा बदलली.
माझे प्रेम हे आता यांची सेवा करण्यातच असे झाले.तर यांचे प्रेम म्हणजे मुलेबाळे पत्नी यांची जबाबदारी कशी पार पाडू हे दिसू लागले. तर यांची नोकरीही ४/२/२००० साली व्हाॅलेंटरी रिटायर्डमेंट घेतल्याने संपली. सर्व जबाबदारी त्या दिवसापासून माझ्या खांद्यावर आली.
यांची चिडचिड होवू लागली.पण मी शांततेत घेत होते. झाले आता यालाही एकवीस वर्ष पूर्ण.
दोन्ही मुलींची लग्ने झाली.पाच नातवंडे आहेत आता. मुलगा अमेरिकेत शिकायला गेलाय एम.एस. करत आहे.
आता वैभव जरा वेगळ्या वळणाला लागलेत.घर सोडून वैभव जास्त लांब जावू शकतच नाहीत. तरीही १/५/२०१९ ला आम्ही अमेरिका फिरून आलो. आणि पुण्याच्या जवळपास असणारी प्रेक्षणिय स्थळांना भेटी देतो. दोघांतील प्रेम कमी होवू देत नाही.
कधी कधी होतात वाद ..पण मुरलेल्या लोणचे म्हटले की जरा हे होणारच हो की नाही बर....
प्रेमानं माणूस जिंकावे
प्रेमानं मन जपावे अन
प्रेमानं माणूसही जपावा.....
कितीही अवघड वाटा आल्या या संसारी तरी मी हार नाही मानली.
वैभवशी या पुढेही संसार करीन नेटका मी ..माहेरचाही दीप उजळवीन मी नक्कीच.....