जीवनातील सुखानुभव
जीवनातील सुखानुभव
लहान वयात लग्न झाले.त्या वेळी मी बारावीला होते.फलटणमधे राहणारी मी पुणे शहरात स्थित झाले. लग्नानंतर मी एस.पी.काॅलेजला होते. एस. वाय.बी.ए.ला असतानाच जुळ्या कन्यारत्नांना जन्म दिला अवघ्या एकोणीस वयात. त्यानंतर शिक्षण मागे पडले. मला बी.ए.ची डिग्री हवी होती. पण जुळ्या मुलींमुळे पुढे काॅलेज बंदच झाले माझे. मी डी.एड.केले.मला नोकरी पण लागली.पगार अवघा सव्वाशे रूपये होता. कालांतराने एक मुलगा झाला.
पण पुढील शिक्षण घेतले नाही ही सल सतत मनात होती. माझ्या जुळ्या मुलींचे बी.ए.झाले.मुलगा बारावी झाला.पण मी ...तिथेच होते.नोकरी,घर,पतीचे आजारपण आणि घरची जबाबदारी. पण डिग्री घ्यायचीच हे ठरवले व बी.ए.लास्ट वर्षाला ॲडमिशन घेतलेच. एकीकडे पतीला मुलीने ॲडमीट केले होते तर दुसरीकडे माझी सुप्त इच्छा पूर्ण होत होती.
पती हाॅस्पिटलमधे मुलींनी जबाबदारी घेतली.माझे घर,नोकरी बी.ए.चे पेपर आणि पतीची सेवा ही कसरत चालली होती. पतीचे मोठे मेंदूचे ऑपरेशन झाले. माझे पेपर संपले. सर्व लगीनघाईच होती. पती ठीक होत होते.मुलींनी एम.ए.ला ॲडमिशन घेतली. मुलगा बी.इ.च्या पहिल्या वर्षाला जावू लागला
आणि तो दिवस आला माझ्या रिझल्टचा दिवस. मी काॅलेजला गेले बरोबर भाऊ होता. नाव पाहिले बोर्डवर..पास झाले .विशेष म्हणचे सेकंड हायेस्ट ५९.६% गुण मिळाले होते.
हा माझ्या जीवनातील अत्यंत सुखद अनुभव होता.मुली एम.ए. होत होत्या. माझी डिग्रीची इच्छा पूर्ण झाली. मुलगा छान शै.मार्गाला लागला होता.आणि पतीची तब्येत सुधारत होती...