जीवन सुंदर आहे
जीवन सुंदर आहे
"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" हे रेडियो वरील गाणे ऐकत असतानाच एक बातमी वाचण्यात आली. एका वीस वर्षीय युवतीने नदीत उडी मारुन आत्महत्या केली. त्या बातमीने रेडियो वरील गाण्याचे माझे लक्ष पार उडून गेले आणि त्या मुलीच्या अश्या कृतीने तिच्या आई-बाबावर आणि त्या परिवारावर काय प्रसंग ओढवाले असेल याची साधी कल्पना जरी केली तरी ह्रदय धडधड करायला लागले, छातीचे ठोके वाढले. नेमके आयुष्याला आत्ता सुरुवात होऊ लागली होती आणि तिने आपल्या हाताने आपले आयुष्य संपविली होती.
जीवन सुंदर आहे ते जगता आले पाहिजे असाच काहीसा संदेश त्या गितातून देण्याचा कवीचा प्रयत्न आहे. आपण जीवन जगण्याचा कधीही मनातून प्रयत्न करीत नाही. आपण आपली जीवन क्रिया समजून घेतली नाही त्यामुळे त्याचा त्रास आपणास नक्की होतोच. त्यासाठी सर्व प्रथम आपण आपल्या परीने आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्नच करायला हवा. फार लवकर हताश होणे, नाराज होणे यामुळे मनात नैराश्य निर्माण होते. मग आपले विचार एका वेगळ्याच दिशेने धाव घेते. मनात न्यूनगंड निर्माण होते. त्या मुलीला घरात काही त्रास होता का ? नव्हता ? हे प्रश्न महत्वाचे नाही तर या टोकापर्यंत ती का गेली ? याचा ही विचार केला पाहिजे. वास्तविक पाहता अश्या घटना सहजासहजी किंवा एका क्षणी घडलेल्या नसतात तर खुप दिवसापासून त्यांच्या मनात याची सल बोचत असते. वारंवार त्याच विषयावर चिंतन करून मन बधीर होत राहते आणि असे पाऊल उचलले जाते. त्यामुळे कुटुंबात वादविवाद, भांडण असे प्रकार शक्यतो होऊ देऊ नये. घरातील सर्वाशी प्रेमाने वागत रहावे शक्यतो या गोष्टी पाळले तर असे प्रकार होत नाहीत. मुलांमुलींनी सुद्धा फार लहानसहान गोष्टी मनावर न घेता सामंजस्यपणाने विचार करून परिवारामध्ये आंनदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. जीवनात सुख आणि दुःख हे एका पाठोपाठ एक येतच असतात.
प्रत्येकांच्या जीवनात जसे दुःखाचे दिवस असतात तसे सुखाचे देखील असतात. फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला तसा असला पाहिजे. याबाबतीत एक कथा सांगावीशी वाटते. एक राजा होता आणि त्याने आपल्या सर्व सल्लागार मंत्र्यांना सांगितलं की, मला असा एक उपदेश सांगा जे की केंव्हाही कामाला येईल. सल्लागार लोकांनी खूप विचारांती एक चिठ्ठी लिहून दिली आणि म्हटलं की, खूप दुःख किंवा खूप सुख मिळालं तरच ही चिठ्ठी उघडायची आणि वाचायचं. राजाने ती चिठ्ठी आपल्या अंगठ्याच्या खाली ठेवली. काही दिवसांनी शत्रूने त्यांच्या राज्यावर हल्ला केला आणि राजाचा त्यात पराभव झाला. राजा शत्रूच्या तावडीत न सापडता जंगलात खुप दूर पळून गेला. राजा आता एकटाच होता, त्याच्यासोबत कोणतेच वैभव नव्हते, नोकर चाकर नव्हते, तो खूप दुखी कष्टी झाला. त्याचवेळी त्याला सल्लागार मंत्र्यांनी दिलेली चिठ्ठी आठवली. त्याने ती बाहेर काढली आणि वाचू लागला. त्यात लिहिलं होतं, ' हे ही दिवस निघून जातील. ' रोजच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला. क्षणभरापूर्वी मी एक राजा होतो पण आता माझ्याजवळ काहीच नाही. पण उद्या कदाचित वेगळं असू शकते. त्या चिठ्ठीमुळे राजाच्या मनात सकारात्मक विचार आले आणि त्याने हळूहळू सैन्य जमा केले आणि आपलं गतवैभवाचे राज्य परत मिळविला. राजा आज खूपच खुश होता.तेंव्हा त्याला परत त्या चिठ्ठीची आठवण झाली, त्यात लिहिलेलं वाक्य आठवलं. राजा स्वतः शी म्हणाला आजचे उद्या राहत नाही मग ही सारी संपत्ती, धन दौलत जमा करण्यात काय अर्थ आहे. चला दान करू या असा विचार करून त्याने सर्व प्रजेला दान देऊन राज्यातील जनतेला सुखी ठेवलं. राजा भित्रा असता किंवा त्याच्या डोक्यात नकारात्मक विचार आले असते तर तो आपले जीवन संपवून टाकलं असतं. सकारात्मक विचार हे नेहमीच आपणाला ऊर्जा देत असतात.त्याचसोबत आजचा दिवस उद्या कधीही नसतो म्हणून संघर्ष करीत जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याच्या जीवनात संघर्ष नाही, त्याचे जीवन सपक अळणी सारखे वाटते, त्यात कुठलीच चव नसते. म्हणून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला मग पहा खरोखरच जीवन सुंदर असल्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.