होळी - उधाण उत्साहाचे
होळी - उधाण उत्साहाचे
फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला विविध रंगांची उधळण करीत येणारा , लहान थोरांच्या मनाला भुरळ घालणारा होळीचा सण संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच बिहार,उत्तर प्रदेश, पंजाब व पश्चिम बंगाल मध्ये मोठया उत्साहात साजरा केला जातो.
महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील राजवाडी होळी ही या लोकोत्सावातील रंगीबेरंगी वेशभूषा, आभूषणे व अलंकार यासाठी प्रसिद्ध आहे.
होळीच्या बाबतीत एक प्रसिद्ध आख्यायिका आहे. हिरण्यकश्शपूने परमेश्वराचे नाम:स्मरण करण्यास बंदी घातल्यानंतर खुद्द त्याचा मलगा प्रल्हादच परमेश्वराचे नाम:रण करू लागला. हिरण्यकश्शपू बहिण धुंडा राक्षशीण हिला आगीत जाळणार नाही असा वर प्राप्त झाला होता. त्यामुळे हिरण्यकश्शपूने तिला लाकडे व गोवरयांची होळीकरून प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसावयाला सांगितले. परंतु परमेश्वरावरील निस्सीम भक्तीमुळे विष्णूभक्त प्रल्हादला काहीही इजा झाली नाही व दुष्ट इच्छा मनातठेऊन भक्त प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न करणारी धुंडा राक्षशीण आगीत जळून खाक झाली. यावेळी लोकांनी भक्त प्रल्हादला वाचविण्यासाठी घरोघरी लाकडे व गोवरयांची होळी करून अग्नी देवाची विनवणी केली होती. लोकांच्या प्रार्थनेच्या बळाने भक्त प्रल्हादचा जीव वाचला. तेव्हापासून होळीची प्रथा सुरु झाली.
मला आठवते बालपणीची होळी … महाशिवरात्रीनंतर छोट्या होळींची शृंखला सुरु होते. छोटी होळी म्हणजे बालमनाची संध्याकाळची मौज! रोज संध्याकाळी आंबा, भेंडी ,जांभूळ अशा झाडांची फांदी खांद्यारून मिरवत बाळ गोपाळांची फौज होळीच्या शेतामध्ये शिरायची.
तिथे नाच-गाणी व नंतर होळीला अग्नी असा हा नित्यक्रम तेरा दिवस चालायचा. त्यानंतर चौदाव्या दिवशी येणाऱ्या "कोंबड-होळी" ला बाळ -गोपाळांच्या जोडीला तरुणाईची विशेष साथ असते. कोंबड होळीला अग्नी द्यायची वेळ नेहमी पेक्षा थोडी ऊशीराची! या रात्री मोठी मंडळीदेखील आवर्जूनउपस्थित असते, ती दुसऱ्या दिवशी मोठी होळी आणण्यापासून ते अग्नी देण्यापर्यंतच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी!
पंधरावा दिवस उगवतो तो उत्साह आणि आनंद घेऊनच! सकाळी वडीलधारी मंडळी बालगोपाळांना घेऊन सुपारीची होळी आणायला निघते तेव्हा सारयांच्या चेहरयावरून प्रचंड उत्साह ओसंडून वाहतांना दिसतो.
सुपारीच्या वाडीत जाऊन होळीची निवड केली जाते.होळी घेऊन निघण्यापूर्वी होळीच्या बुंध्याची गुलाल अगरबत्ती लावून पूजा केली जाते.मग वाजत गाजत मिरवणुकीने होळीचे आगमन होते. यानंतर बुजुर्ग मंडळी होळीचा मखर बनविण्यात गुंग होऊन जाते.
स्त्रीमनालाही होळीचे विशेष आकर्षण आहे.होळीच्या रात्री भटजींच्या हस्ते पूजन झाल्यानंतर सर्व स्त्रिया मोठ्या श्रद्धेने पुरणपोळी, पापडी, मोदक यांचा नैवेद्य होळीला अर्पण करतात.
नवीन लग्न झालेली जोडपी होळी भोवती प्रदक्षिणा घालून होळीला ऊस व नारळ अर्पण करतात. लहान मुले गळ्यात विविधरंगी हरकडे (साखरीच्या
पाकळयांची माळ) घालतात. गोड हरककडयातला एखादा तुकडा हळूच तोंडात
टाकतात. होळीच्या ठिकाणी स्त्रियांचे फेर धरून नाचगाणे सुरु असते लहान मुलेकाही करमणुकीचे कार्यक्रम सादर करतात. अशाप्रकारे मध्यरात्रीपर्यंतची वेळ भूर्रकन निघून जाते.
होळीच्या दुसरया दिवशी धुळवड असते. या दिवशी एकमेकांवर रंग उधळले जातात. यावेळी आपल्या जोडीदाराला रंगविण्याची संधी कुणी दवडवत नाही. ही अनुभूती निराळीच असते. प्रत्येक रंग आपल्याला काहीतरी सांगत असतो. केशरी रंग मांगल्याचे प्रतिक आहे तर हिरवा रंग समृद्धीचे ! सफेद रंग शांतता दर्शवितो, लाल -गुलाबी रंग प्रेमाचे, तर पिवळा रंग मैत्रीचे प्रतीक आहे. म्हणजेच आपण रंगांची उधळण करीत असतांना प्रेम, मांगल्य, शांतता, समृद्धी, मैत्री अशा भावनांची मुक्त उधळण करीत असतो.
काळाच्या ओघात यातल्या बरयाच गोष्टी आता दिसेनाश्या झाल्या आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, वृक्ष संवर्धनासाठी आता झाडांची कत्तल थांबवणे क्रमप्राप्त झाले आहे. पंधरा दिवस "होळी रे होळी" म्हणत हुंदडणारी बालपणीची मुले आता अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेली दिसत आहेत. मुलांच्या बरोबरीने धावणारा तरुणवर्ग आता विविध अभ्यासक्रमांच्या पूर्वपरीक्षांत अडकलेला आहे. लहान मुलांच्या मागे पूर्वी होळीसाठी आपला वेळ देणारा प्रौढ वर्ग प्रपंचामध्ये पूर्वीपेक्षा जास्त गुरफटलेला आहे. फेर धरून नाचणारी महिला मुलांच्या शाळा शिकवण्यांत, गृहपाठ करुन घेण्यात, त्यांना वेळेवर शाळेच्या बस थांब्यावर सोडण्यात गुंतलेली दिसते.
वसंत ऋतूच्या आगमनाचा संदेश घेऊन येणारी ही होळी "पारंपारिक वैर विसरून,जात-पात, भाषा-प्रांत विसरून, विविध रंग जसे एकमेकांत मिसळतात
तसे माणसाने एकरूप व्हावे" हा संदेश देखील देऊन जाते. आपण मनात वाईट विचारांची होळी करून, जळणाऱ्या होळीतून प्रल्हाद म्हणजेच आनंद-उल्हास बाहेर काढून सर्वत्र पसरवू या !