रास्त गोष्ट
रास्त गोष्ट
लोक म्हणतात काळाप्रमाणे चालायला हवं
ससा कासवाच्या गोष्टीला आता बदलायला हवं
म्हणे आजच्या युगात कासवासारखं संथ राहून कसं जमेल?
'रेस' जिंकण्यासाठी स्लो आणि स्टेडी राहून कसं चालेल
सश्यासारखं धाव धाव धावायचं,
मात्र गोष्टीतल्या सश्याप्रमाणे विश्रांतीसाठी मध्येच झोपायचंही नाही
जणू असाच अलिखीत नियम झालाय..
ससे बनू लागलेत सर्वच..आणि
कासवांप्रमाणे संथ आणि शांत जगणार्यांनाही जगू देत नाहीत माणसातले ससे
सशांचं श्वासाकडे लक्ष नाही,त्यांना एकामागून एक यशाची शिखरं गाटायचीत
पैसा कितीही असला तरी कमीच,आणि चंगळवाद बोकाळतोय
झटपट पळताना,हवं ते नाही मिळालं तर ससे वेडेपिसे होतात
दुसऱ्याचा पाय खेचून हवं ते मिळवायला बघतात
नीती,नियम भ्रष्ट झाले तरी चालेल,
पण हवं ते इंस्टंटली मिळायलाच हवं
आणि नाही मिळाले तर?... ससे आत्महत्या करतात ..
ससे झाडे तोडत,इमारतींचे मजले बांधत सुटली आहेत
एव्हढ्यावरही थांबले नाही... ससे कासवांना म्हणतात,
"किती संथ गतीने जगतोस"
जेव्हा ते कासवांना हतबल करून जीवनाच्या शर्यतीत नुसतं धावायला सांगतात तेव्हा..
प्रत्येक श्वास मनापासून जगणारी कासवं, जमत नसतानाही धावायला लागतात
आणि यामुळे ... भर तारुण्यातही आजकाल
सशांबरोबर कासवंही हार्ट अटॅक आणि कॅन्सरचे बळी पडतायत ...
म्हणूनच...
'स्लो अँड स्टेडी विन्स द रेस' असा संदेश देणारी जुनी गोष्टच रास्त आहे ..
कारण जिंकण्यापेक्षा जिवंत राहणं उजवं आहे...
शांततेचा श्वास घेत,इतरांना मदतीचा हात देत..
शर्यतीत हार आली तरी त्यातही अनोखी जीत आहे..