जल हेच जीवन
जल हेच जीवन
थेंबे थेंबे तळे साचे म्हण आहे खरी,
मग थेंब थेंब पाणी साचवून पाहू तरी.
बारा महिन्यात चार महिने पावसाचे,
फक्त भारत देशातच ते अनुभवायचे.
ताळतंत्र त्यांचा कधी नसे बरोबर,
कधी येई लवकर तर कधी जाई भरभर.
कधी कोसळे धो धो सगळं वाहून नेई,
तर कधी झलक दाखवून परतुन न येई.
शेतकरी उत्साहाने बी बियाणे रुजवी,
तर कधी हंगामात धो धो पडून धान्य कुजवी.
अशा अवचित अवेळी येणाऱ्या पावसावरी,
विसंबून राही अमुचा गरीब बिचारा शेतकरी.
झाडाची कत्तल करताना विचार नाही केला,
मात्र जंगले कापून गावाचा शहर होऊन गेला.
काळे घन गेले तोंड फिरवून जरी पालटला जून,
पाण्यासाठी वणवण करी सासू आणि सुन.
जल हेच जीवन कायम लक्षात ठेवणे,
पाण्या शिवाय जीवन हे मरणंच असणे.
पावसाचे पाणी साठवणे नामी उपाय समजा,
पाणी अडवा पाणी जिरवा ह्याच आमच्या गरजा.
वनमहोत्सव नको फक्त फोटो मिरवायला,
तर प्रत्येकी एक झाड नवे लावून उगवायला.
वृक्षारोपण करून जतन करा त्यास लेकरापरी,
कालांतराने हिरवाई दाटेल आपल्या अवनीवरी.
पाण्याचे मोल जाणा जपून सारे वापरा रे,
आपले उद्योग धंदे, वीज सगळे जलावरच रे.
नदी नाले साफ ठेवा प्रवाहात अडचण आणू नका,
पाण्याचा गैर वापर मुळीच करू नका.
कारखान्याचे पाणी नदीत सोडायचे नाही,
दुषित तिचे पाणी मुळीच करायचे नाही.
पृवीवर जल म्हणून आहे इथे जीवन वस्ती,
जलसंवर्धन करून सुंदर बनवा इथली सृष्टी.