बदल
बदल
पूर्वी :
अचानक वीज जायची
बसायचो अंगणात
कानगोष्टी आणि भेंड्या
चालायच्या चांदण्यात.
पाणी कधी गायब व्हायचं
धावायचं विहिरीवर
हंडे कळश्यांची चळत
चढायची डोक्यावर.
गहू तांदूळ रॉकेल साखर
मिळायचं रेशनवर
लांबच लांब रांग उभी
असायची दुकानावर.
पैसा कमी, यंत्र नव्हती
माणुसकी पुष्कळ होती
सख्खी नाती होतीच तरीही
मानलेलीही सख्खीच होती.J
सणवार सुखदुःख
सारं सगळ्यांच होतं
शेजाऱ्याचं शेजाऱ्याशी
घरोब्याचं नातं होतं.
आत्ता :
आज काळ बदलला
पैसा खूप, घरं मोठी
आईवडील आले तरी
कपाळावर पडते आठी
शेजारचं सोडून द्या हो
घरात कोण कळत नाही
सुसंवाद विसरून जा
संवादाचाच पत्ता नाही.
सोशल साईट्सवर प्रेम
दुरूनच नाती जपायची
समोर माणूस येताच
ओळखही विसरायची.
बदलायला हवं चित्र
जपायला हवं मैत्र
नव्या पिढीला द्यायला हवा
माणुसकीचा कानमंत्र.